आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑक्टोबर २०१८ दुपारी
१.०० वा.
****
दहशतवाद ते
जलवायू परिवर्तन, आर्थिक विकास ते
सामाजिक न्याय, या सर्वांसाठी जागतिक सहकार्य आणि समन्वयानं काम
करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी व्यक्त केली आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन
की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते. या मालिकेचा
आज ४९वा भाग प्रसारित झाला. आज शांतता आणि सौहार्द यांचा
अर्थ केवळ युद्ध न होणे इतकाच नाही, तर गरिबातल्या
गरीब व्यक्तीचा विकास हेच शांततेचं खरं प्रतीक असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
येत्या
११ नोव्हेंबरला पहिल्या महायुद्धाला १०० वर्षं पूर्ण
होत आहेत, या युद्धाशी
भारताचा थेट संबंध नसला तरीही भारतीय सैनिकांनी सर्वोच्च बलिदान
दिलं, याचा शांततेची
पुनर्स्थापना हाच उद्देश होता, असं ते म्हणाले.
येत्या
३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रन फॉर युनिटी - एकता
दौड मध्ये सगळ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. यावेळी
त्यांनी सरदार पटेल यांचं स्मरण करुन त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सरदार
पटेल यांची वैचारिक परिपक्वता आणि धोरणात्मक कौशल्य यामुळेच आज आपण एकसंध भारत पाहू
शकत आहोत, असं ते म्हणाले.
३१
ऑक्टोबरला माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचीही पुण्यतिथी असल्याचं
सांगून पंतप्रधानांनी, इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण
केली.
पर्यावरण रक्षणावर तोडगा काढण्यासाठी आपल्याला आपल्याच
संस्कृतीचा अंतर्शोध घ्यायचा असल्याचं
सांगून पंतप्रधानांनी, देशातल्या विविध संस्कृती आणि त्यांचा निसर्गाशी असलेला
संबंध, याची माहिती दिली.
नुकत्याच
झालेल्या आशियाई पॅरा गेम्स आणि युवा ऑलिम्पिक
स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी सर्वांचं अभिनंदन
केलं. या खेळाडुंची प्रबळ इच्छाशक्ती आणि कोणत्याही विपरीत परिस्थितीशी लढून पुढे जाण्याची
त्यांची जिद्द सर्व देशवासीयांना प्रेरणा देणारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. यंदाच्या
हॉकी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. पुढच्या
महिन्यात भुवनेश्वर इथं ही स्पर्धा होणार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, या
स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या.
काल साजरा झालेल्या
इन्फंट्री दिनानिमित्त भारतीय सैन्याच्या सदस्यांना पंतप्रधानांनी वंदन केलं. तसंच
आगामी धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छटपूजा या
सणांच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
****
दिल्लीचे
माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मदनलाल खुराणा यांचं
काल नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. १९९२ ते १९९६ या
काळात ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते. २००४ मध्ये त्यांनी राजस्थानचं राज्यपाल पद भूषवलं
होतं. खुराणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख
व्यक्त केलं आहे.
****
माजी
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेले पेरानिवलम
आणि नलिनी यांची जन्मठेप रद्द करण्याची विनंती तामिळनाडू सरकारनं राज्यपालांकडे केली
आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानिस्वामी यांनी माध्यम प्रतिनिधींशी
बोलताना ही माहिती दिली. जनभावना आणि राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन या दोघांच्या
सुटकेची विनंती आपण केल्याचं पलानीस्वामी यांनी सांगितलं.
****
परराज्यातल्या संस्थेतून नर्सिंगची पदवी उत्तीर्ण
केलेल्या उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती नाकारणारी अट मागे घेण्यात आल्यानं राज्यातल्या
स्टाफ नर्स - परिचारिका पदाच्या ५२८ जागांसाठीच्या
भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या वतीनं घेतलेल्या
५२८ जागांच्या भरती प्रक्रियेत कर्नाटक राज्यातल्या संस्थेतून पदवी उत्तीर्ण असलेल्या
उमेदवारांना नियुक्तीस अपात्र ठरवण्यात आलं होतं. या निर्णयावर संबंधित उमेदवारांनी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितल्यानंतर न्यायालयानं या भरती
प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यानंतर संचालनालयानं परराराज्यातल्या उमेदवारांना
नियुक्ती नाकारण्याची अट मागे घेतल्यानं आता ही प्रक्रिया पुन्हा होणार असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
ओमान
मध्ये मस्कत इथं सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना
आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी सामन्याला
सुरुवात होईल. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारतानं जपानचा तीन - दोन असा
पराभव केला.
****
फ्रेंच
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत काल झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात
भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.
याबरोबरच फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं सर्व गटांमधलं भारताचं आव्हान संपुष्टात
आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment