Thursday, 28 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.03.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 March 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मार्च २०१९ दुपारी .०० वा.

****



 प्रत्यक्ष कर संकलनासाठी आयकर विभागानं अधिक प्रयत्न करण्याचे निर्देश केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटीनं दिले आहेत. येत्या ३१ मार्चला संपत असलेल्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात निर्धारित उद्दीष्टाच्या तुलनेत फक्त ८५ टक्के कर संकलन झालं असून, संकलनात सुमारे १५ टक्क्यांची तूट आहे. या पार्श्वभूमीवर सीबीडीटीच्या सदस्य नीना कुमार यांनी सर्व मंडळाच्या विभागीय प्रमुखांना पत्र लिहून, अर्थसंकल्पात व्यक्त केलेल्या बारा लाख कोटी रुपये उद्दीष्टापैकी, दहा लाख, एकवीस हजार, दोनशे एक्कावन्न कोटी रुपये एवढाच कर, २३ मार्चपर्यंत जमा झाल्याचं म्हटलं आहे. कर संकलन वाढवण्यासाठी, तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना कुमार यांनी या पत्रातून संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

****



 बडोदा बँकेत देना बँक आणि विजया बँकेचं विलीनकरण होण्यापूर्वी, सरकारनं बडोदा बँकेला पाच हजार कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयानं, एक अधिसूचना जारी केली आहे. एक एप्रिल रोजी या दोन्ही बँक, बडोदा बँकेत विलीन होतील. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये सरकारनं विलीनिकरणाची घोषणा केली होती. भारतीय स्टेट बँक आणि आय सी आ यसी आय बँकेनंतर, बडोदा बँक ही देशातली सगळ्यात मोठी तिसरी बँक असणार आहे.

****



 वातावरणातला बदल, हे सध्या जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी निसर्गाला अनुकूल जीवनशैलीचा अवलंब करणं आवश्यक असल्याचं, नायडू म्हणाले. जगात अनेक ठिकाणी विजेवरच्या वाहनांचा, सायकलचा वापर वाढला असून, लोक चारचाकी वाहनांचा एकत्रित वापर करत असल्याकडे नायडू यांनी लक्ष वेधलं. हिवाळ्यात उद्भवणाऱ्या वायू प्रदुषणाचं मूळ जाणून घेत, ही समस्या मुळापासून नष्ट करणं आवश्यक असल्याचं नायडू यांनी नमूद केलं.

****



 राम की जन्मभूमी या हिंदी चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. हा चित्रपट उद्या देशभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामुळे अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणात सुरू असलेल्या मध्यस्थीवर परिणाम होईल, असं याचिकाकर्त्यांनं म्हटलं आहे, मात्र या मध्यस्थी प्रक्रियेशी या चित्रपटाचा काहीही संबंध नसल्याचं, न्यायालयानं नमूद केलं आहे. न्यायमूर्ती एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं या प्रकरणाची पुढची सुनावणी दोन आठवड्यानंतर घेणार असल्याचं सांगितलं

****



 मध्ये रेल्वेनं, आपल्या सर्व स्थानकांवर, लिंबू सरबतासह इतर सर्व खुल्या सरबतांच्या विक्रीला बंदी घातली आहे. मुंबईत, कुर्ला स्थानकावर एक विक्रेता, लिंबू सरबत तयार करताना अस्वच्छ पाण्याचा वापर करत असल्याची एक चित्रफीत नुकतीच, सामाजिक संपर्क माध्यमांवरून प्रसारित झाली होती, त्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं मध्य रेल्वे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं. अशा सरबतांचे विक्रेते सरबतासाठी शुद्ध पाण्याचा वापर करत आहेत, किंवा नाही, याकडे सतत लक्ष ठेवणं शक्य नसल्यामुळे, अशा खुल्या सरबतांच्या विक्रीवर बंदी घातल्याची माहिती, मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी दिल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.

****



 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात १४ राज्यातल्या ११५ लोकसभा मतदारसंघांत येत्या २३ एप्रिलला मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या चौदा जागांचा समावेश असून, मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना या दोन जागांसह, जळगाव, रावेर, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणगंले या मतदार संघांमध्ये, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास, आज अधिसूचना जारी झाल्यानंतर प्रारंभ होईल.



 या सर्व मतदार संघांमध्ये चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपणार आहे.

 या पहिल्या टप्प्यात राज्यातले नागपूर, रामटेक, वर्धा, गडचिरोली-चिमूर, भंडारा- गोंदिया, चंद्रपूर, आणि यवतमाळ- वाशिम या सात मतदारसंघाचा समावेश आहे.

*****

***

No comments:

Post a Comment