Saturday, 13 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१३ जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 रेल्वे विभागाचं खाजगीकरण होऊ देणार नाही असं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे.लोकसभेत रेल्वेच्या अनुदान मागण्यांसंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देतांना ते बोलत होते. रेल्वे मंत्रालयाच्या २०१९-२० वर्षासाठी अनुदानाच्या मागण्या सभागृहानं काल मंजुर केल्या. यावर्षीच्या प्रवासी सुरक्षेसाठी सरकारनं साडे पाच हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 औरंगाबाद इथं बीड बायपास रस्त्यावर, रात्री एक च्या सुमारास चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया चं ए टीएम चोरुन नेलं. देवळाई परिसरात ही घटना घडली. या ए टी एम यंत्रात  २५ लाख रुपयांहून अधिक रोकड होती. चोरट्यांनी या ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरे देखील फोडले. चोरी करुन हे यंत्र पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ या वाहनातून पळवलं असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं.
****

 राज्य शासनानं खरीप हंगामाचा पीक विमा भरण्यासाठी येत्या २४ जुलै पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, लातूर जिल्ह्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यानं, पिक विमा भरता येतो की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात असून जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांनी याचे निकष जाहीर करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर-उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी केली आहे. शासनानं जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणीही मोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
****


 येत्या बुधवारपासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेला सुरूवात होत आहे.इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा येत्या १७ ते ३० जुलै दरम्यान तर इयत्ता बारावी पुरवणी परीक्षा १७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे.नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक़्षा १७ ते ३१ जुलै दरम्यान होणार आहे.
*****
***

No comments:

Post a Comment