Sunday, 14 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१४ जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 भारतातून पाकिस्तानातल्या दरबारसाहेब गुरूद्वाराला जाणाऱ्या शीख भाविकांसाठी तयार करण्यात येणार असलेल्या करतारपूर कॉरिडोर विषयी, भारत आणि पाकिस्तानच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळातल्या चर्चेला आज अटारी सीमेवर सुरवात झाली आहे. दोन्ही देशांमूधन येणारे रस्त्याचे भाग कोणत्या ठिकाणी एकमेकांना मिळणार आणि एकावेळी किती भाविकांना या मार्गानं प्रवेश देता येईल, याबाबत यावेळी बोलणी होणार आहे. पाकिस्तानच्या शिष्टमंडळात एका खलिस्तानी फुटीरतावादी नेत्याचा समावेश असल्याबाबत भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
****

 माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त काल नांदेड इथं ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचं व्याख्यान झालं. अर्धापूर इथं शंकरराव चव्हाण महाविद्यालयामध्ये शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं, तसंच जलसाक्षरतेवर परिसंवादही घेण्यात आला. जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 औरंगाबाद इथं नव लेखकांसाठी आयोजित स्वागत या उपक्रमात काल बालकवी विश्वनाथ ससे आणि विनोद सिनकर यांनी त्यांच्या लेखनासंबंधी आपली भूमिका मांडली. विचारवंत लेखकांची तहान, भूक हरवली तरी चालते, मात्र विचारांचे दारिद्रय परवडू शकत नसल्याचं प्रतिपादन प्रसिध्द कवी विश्वनाथ ससे यांनी यावेळी केलं. तर साहित्यिक विनोद सिनकर यांनी लेखनाचा प्रवास उलगडून बालसाहित्यातल्या उणीवांवर भाष्य केलं.
****

 जालना जिल्ह्याजाफराबाद तालुक्यातल्या येवता इथं पाण्यात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. किर्ती दळवी, आणि संस्कृती दळवी अशी या दोघींची नावं आहेत.
****

 हिंगोली तालुक्यातल्या ईडोळी शिवारात शेतात खुरपणी करताना विजेचा धक्का लागून एका ३८ वर्ष वयाच्या महिलेचा मृत्यू झाला. काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
*****
***

No comments:

Post a Comment