Thursday, 16 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.04.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१६ एप्रिल २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या आता दोन हजार नउशे सोळा झाली असून गेल्या चोवीस तासात दोनशे बत्तीस रूग्णांची भर पडली आहे. यापैकी दोनशे पंच्याण्णव जणांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. तर एकशे सत्त्याऐशी जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी मुंबईत सर्वाधिक म्हणजेच एकशे त्र्यांऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे. देशात ही संख्या बारा हजार तीनशे ऐंशी झाली आहे. यापैकी एक हजार चारशे ऐंशी जण बरे झाले आहेत.
****

 जालना जिल्हा रुग्णालयात श्वसनाच्या आजारानं ग्रस्त असलेल्या दोन महिलांपैकी एका ६० वर्षीय महिलेचा काल औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी इथं मृत्यू झाला. जालन्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी ही माहिती दिली. प्रकृती खालावल्यामुळे या महिलेला जालना जिल्हा रुग्णालयातून अधिक उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आलं होतं.

 दरम्यान, सारीग्रस्त एका महिलेवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या एकमेव कोरोना बाधित महिलेची प्रकृतीही गंभीर आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या एकमेव कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा चौदा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पहिला अहवाल नकारात्मक आला आहे. या रुग्णाचा दुसरा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, हा रुग्ण वगळता, हिंगोली जिल्ह्यात सध्या एकही सकारात्मक कोरोना विषाणू बाधित रुग्ण नाही.
****

 औरंगाबाद शहराशिधापत्रिकाधारकांच्या तक्रारीवरून एका रास्त भाव दुकानाचा परवाना निलंबि  करण्यात आला आहे. तर एका रास्त भाव दुकानदाराला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.  जिल्हा पुरवठा अधिकारी महेंद्र किरवले यांनी ही माहिती दिली आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीच्या काळात गरजू व्यक्तींना बावीस शिवभोजन केंद्रातून जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत चौसष्ट हजार एकशे चौऱ्यांण्णव थाळींचा लाभ गरजू व्यक्तींनी घेतला आहे.
*****
***

No comments:

Post a Comment