आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
शहाण्णव कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार
अठ्ठावीस झाली आहे. यापैकी एक हजार सहाशे अठ्ठावन्न रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून
सुटी देण्यात आली आहे. उपचारादरम्यान एकशे त्रेसष्ट बाधितांचा मृत्यू झाला असून एक
हजार दोनशे सात रुग्णांवर उपचार सुरू आहे.
****
आजपर्यंत राज्यातल्या तीन
हजार सहाशे एकसष्ट पोलिसांना कोरेाना विषाणूची लागण झाली असुन बेचाळीस पोलिसांचा कोरोना
विषाणूमुळे मृत्यू झाला असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. दोन हजार दोनशे
अठ्ठेचाळीस पोलिस या आजारातून बरे झाले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक व्यक्तींची पल्स ऑक्सीमीटरने
तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी
दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संबंधित
संनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कोरोना विषाणू
संसर्गाला प्रतिबंध करण्यासंदर्भात आवश्यक सूचना त्यांनी यावेळी संनियंत्रण समितीला
केल्या.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं रवी पवार या २६ वर्षीय तरुणाचा
अंगावर वीज पडून मृत्यू झाला. हा तरुण वडीलांसह शेतात
काम करुन घरी परतत असताना वीज कोसळली. यात वडील जखमी झाले,
तर मुलाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
****
सांगली
जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस पडतो आहे, तर जिल्ह्याच्या उर्वरित भागात
पावसाची संततधार सुरू आहे. वारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून २५० क्युसेक वेगानं
नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रासह १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून संवाद साधणार आहेत. काल दुपारी पंतप्रधानांनी २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी
कोविड प्रादुर्भाव आणि उपाययोजनांसंदर्भात संवाद साधला.
****
No comments:
Post a Comment