Sunday, 20 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.12.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

पुढील काही वर्ष आपली संपूर्ण ताकत आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशभरातल्या उद्योग समूह आणि व्यवसायांना केलं. ‘असोचेम फौंडेशन सप्ताह 2020 या कार्यक्रमात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण केलं. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते टाटा उद्योग समूहाला ‘असोचेम एंटरप्राईज ऑफ द सेंचुरी’ हा पुरस्कार देण्यात आला. टाटा समूहाच्या वतीनं रतन टाटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशाच्या विकासात टाटा उद्योग समूहाचं महत्त्वाचं योगदान आहे, असं मोदी म्हणाले.

****

देशातला कोविड संसंर्गातून मुक्त होण्याचा दर ९५ पूर्णांक ४६ शतांश टक्के झाला आहे. आतापर्यंत ९५ लाख ५० हजार ७१२ रूग्ण या विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत

****

देशातल्या ३३ राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशात कोविड-१९ चे उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या २० हजाराहूनही कमी असल्याचं सरकारनं म्हटल आहे. दरम्यान, देशात कोविड-१९ च्या उपचाराधीन रूग्णांच्या एकूण संख्येच्या ४० टक्के रूग्णसंख्या महाराष्ट्र आणि केरळ मधली असल्याचंही सरकारनं एका ट्विटमध्ये म्हटल आहे.

****

साखर कारखान्यांनी आपल्या उत्पन्न वाढीसाठी इथेनॉल निर्मितीसारखे अन्य पर्याय शोधण्याचा सल्ला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिला आहे. भारतीय साखर कारखानदार संघटना अर्थात इस्माच्या 86 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. साखरेच्या हमी भावात वाढ करण्याला नकार देतानाच कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या किमान वाजवी किंमत अर्थात एफ आर पी मध्ये कपात करण्यालाही त्यांनी नकार दिला.

****

दक्षिण मध्य रेल्वे डिसेंबर माहिन्यात तीन विशेष गाड्या सोडणार आहे. यामध्ये नांदेड - श्रीगंगानगर-नांदेड दरम्यान दोन विशेष गाड्या तर सिकंदराबाद-जयपूर-सिकंदराबाद दरम्यान एक गाडी सोडली जाणार आहे. या तिन्ही विशेष रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत.  अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही.

****

वाशीम जिल्ह्यातील “संत्रा ग्राम, ऑरेंज व्हिलेज” म्हणून ओळख असलेल्या मालेगांव तालुक्यातल्या मुंगळा या गावातल्या शेकडो एकर संत्रा फळ बागा बुरशीजन्य रोगामुळे धोक्यात आल्या आहेत. त्यामुळं इथले संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.

****

No comments:

Post a Comment