Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 June 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू
संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं,
असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे.
सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा
तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा
०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क
करू शकता.
****
** ऑनलाईन शिकाऊ वाहन
चालक परवाना तसंच वाहन नोंदणीच्या ‘सारथी ४ पूर्णांक शून्य’ या अद्ययावत प्रणालीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
** नांदेडमधील डॉक्टर शंकरराव
चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण भरला. एका दरवाजातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
** हिंगोली जिल्ह्यात सेनगाव जवळ राष्ट्रीय महामार्गलगतच्या खड्ड्यातील पाण्यात
चार चाकी मोटार पडून चौघांचा मृत्यू
आणि
** औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय आणि रुग्णालयात सहा कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
****
‘सारथी ४ पूर्णांक शून्य’ या अद्ययावत प्रणालीअंतर्गत
आधार क्रमांकांशी संलग्न असलेला ऑनलाईन शिकाऊ वाहन चालक परवाना तसंच वाहन नोंदणीच्या
ऑनलाईन प्रणालीचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या प्रणालीमुळे आता शिकाऊ वाहन परवाना मिळवण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज
नाही तसंच नवीन वाहन नोंदणीकरिता मोटार वाहन निरीक्षकांमार्फत वाहन
तपासण्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली आहे, त्यामुळे नवीन
वाहनांची नोंदणी वितरकाच्या स्तरावर तत्काळ होईल. वाहन वितरकांमार्फत सर्व कागदपत्र अंकेक्षित हस्ताक्षर प्रमाणपत्रासह ग्राहकांना प्राप्त होईल.
कर आणि शुल्क भरल्यानंतर लगेचचं वाहन
क्रमांक जारी होईल. मुख्यमंत्र्यांनी
यावेळी बोलताना भविष्यातही शासकीय
विभागांना शक्य असलेल्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई गर्व्हनंसवर आधारित
नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन केलं. या प्रणालीमुळे लोकांचं आणि यंत्रणेचं काम सोपं झाल्याचं सांगताना
मुख्यमंत्री म्हणाले....
दरवर्षी सुमारे १५ लाखांहून अधिक
शिकाऊ वाहन परवाने दिले जातात. आणि २० लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी होते. केव्हढी
वाहने रोजची रस्त्यावर येत आहेत. तेवढे नवीन चालक रोजचे रस्त्यावरती येत आहेत. हे रोजच
चालू आहे. जवळपास दोनशे अधिकाऱ्यांवरचा कामाचा ताण जो आहे तो कमी होणार आहे. आणि कामाचा
दर्जा त्याच्यामुळे वाढणार आहे. महाराष्ट्र राज्य हे नेहमीचं विकासात अग्रेसर राहिलेलं
आहे. जगभरामध्ये ज्या ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. त्या आपल्याला आपल्या
मराष्ट्रामध्ये पाहीजेतचं हा आपला हट्टहास आहे. आणि हे एक वेगळे लोकांचे येणे जाणे
आणि कारण नसताना त्यांचं वेळेचं अपव्यय, होणार काम अजून सोप केलं आहे.
****
रक्तदान करा आणि विश्वस्पंदन चिरंतन ठेवा या ब्रीद वाक्यासह
या वर्षी आजचा जागतिक रक्तदाता दिवस साजरा होत आहे. सुरक्षित रक्तदान
तसंच मानवी शरीरात सुरक्षित पद्धतीनं रक्त चढवण्याबाबतीत जागरुकता निर्माण व्हावी
या उद्देशानं तसंच मानवाला जीवदान देण्यासाठी ऐच्छिक आणि नि:शुल्क रक्तदान
करणाऱ्या रक्तदात्यांचं महत्व जगासमोर आणण्यासाठी देखील आजचा रक्तदाता दिवस साजरा
करण्यात येतो.
****
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी
सर्व रक्तदात्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. रक्तदात्यांनी स्वच्छेनं विनामूल्य रक्तदान
करुन अनेकांना जीवनदान दिलं आहे, म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आजचा दिवस
असल्याचं ते म्हणाले. रक्तदान शिबीर आयोजन करणाऱ्या विविध संस्था, संघटनांचे त्यांनी
आभार मानले. महाराष्ट्र रक्त संकलनात देशात अव्वल क्रमांकावर आहे. राज्यात एकूण
३४५ रक्त पेढ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन केलं जातं.
राज्यातल्या तरुण वर्गानं रक्तदानाची
महाराष्ट्राची परंपरा अशीच पुढे सुरु
ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
कोविड संसर्गात पालक मृत्युमुखी पडल्यानं निराधार झालेल्या
बालकांना थेट दत्तक घेण्याचं आवाहन करणाऱ्या बातम्यांची माहिती
राष्ट्रीय बालहक्क आयोगानं समाज माध्यमांकडे मागितली आहे. अशा बातम्यांचे मूळ
स्रोत, त्यांचे आयपी अॅड्रेस, आणि इतर माहिती
येत्या १० दिवसात सादर करण्याचे निर्देश आयोगानं फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि
टेलिग्राम या माध्यमांना पत्र लिहून दिले आहेत. देशात सज्ञान नसलेल्या मुलांच्या दत्तक विधानासाठी कायद्यानं प्रक्रिया निश्चित
केली आहे. या कायद्यातील तरतुदीनुसारच मूल दत्तक घेणं सर्वोच्च न्यायालयानं बंधनकारक केलं आहे. बेकायदेशिर मार्गानं दत्तक घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही
बालहक्क आयोगानं राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
****
नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारा डॉक्टर शंकरराव चव्हाण
विष्णुपुरी प्रकल्प काल १०० टक्के भरला.
त्यामुळे प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी
अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी
दिली आहे.
****
परभणी शहरात झालेल्या पावसामुळे सखल भागातल्या वस्त्यांमधील घराघरात पाणी
शिरलं, शहरातल्या जुना पेडगाव रस्त्यावरील चिद्रवार नगरात काही
घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं. जिल्ह्यात गेल्या ८ दिवसात दमदार पाऊस
झाला असून, सोनपेठ तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे १९८ पूर्णांक ४
मिलीमीटर तर गंगाखेड तालुक्यात सर्वात कमी १२६ पूर्णांक ६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात काल रात्री साडे दहा वाजता सुरू झालेला
पाऊस आज सकाळी सात वाजता थांबला. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस झाला असून सहा महसुल
मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धर्माबाद महसूल मंडळात सर्वाधिक ८५ मिलीमीटर पाऊस झाला, त्या खालोखाल
माहूर तालुक्यातील सिंदखेड, वाई, भोकर, हदगावमध्ये चांगला
पाऊस झाला आहे. औरंगाबाद शहरातही आज दुपारी पाऊस
झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सर्वाधिक पाऊस कणकवली
तालुक्यात १३५ मिलीमीटर इतका झाला असून, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात देखील पावसानं शंभरी
ओलांडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळपासून पडलेल्या मुसळधार
पावसामुळे काही घरांची हानी झाली, तर काही ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक बंद पडली.
****
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या
कामामुळे झालेल्या खड्यात चार चाकी मोटार पडल्यानं पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली. मृत लोणार
तालुक्यातील असून चौघांपैकी दोघांची
ओळख पटली आहे. अंकुश गायकवाड आणि त्र्यंबक थोरवे
अशी त्यांची नांवे असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हे चौघेही जण
शिक्षक असून ते मुख्यालयी जाण्यासाठी निघाले होते. सेनगाव ते
येलदरी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु असून रस्त्याच्या बाजूला एक मोठा खड्डा
झाला आहे. या पाणी साठलेल्या
खड्ड्यात रविवारी मध्यरात्री ही मोटार पडली. खड्ड्यातील
पाण्यात ती उलटी झाल्यानं पूर्णपणे बंद झाली. परीणामी मोटारीमधील कोणालाही बाहेर पडता आले नाही, त्यामुळे त्यातच चौघांचा गुदमरुन
मृत्यू झाला. खड्ड्यामध्ये वाहनाचा दिवा दिसल्याने
काही गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी
केली असता त्यांना खड्ड्यात मोटार पडल्याचं दिसून आलं. गावकऱ्यांनी तातडीनं याबाबत पोलिसांना
माहिती दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सहा कोविड बाधितांचा आज शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय- घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोविड संसर्गानं जिल्ह्यात आतापर्यंत एकूण तीन हजार ३४६ रुग्ण
दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४४ हजार ६९४ झाली असून
एक लाख ३९ हजार ६२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज १५४ नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आष्टी ५९,
केज २२, शिरुर २०, बीड १४, गेवराई ११, अंबाजोगाई नऊ, वडवणी सात, धारुर पाच, माजलगाव
चार, पाटोदा दोन आणि परळी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
पुण्यातल्या थिंसर टेक्नोलॉजिस या स्टार्ट अप कंपनीनं थ्री
डी प्रिंटेड मास्क तयार केला आहे. एन ९५ आणि तीन स्तर असलेल्या तसंच कापडी
मास्कहून हा थ्री डी मास्क अधिक प्रभावी असल्याचा दावा या कंपनीनं केला आहे. यात
थ्री डी प्रिंटींग तंत्रज्ञान आणि कोरोना विषाणू संसर्गाला
रोखणारी रसायनं वापरण्यात आली असून, विरुसीड्स या रासायनिक पदार्थाचं आवरण या मास्क साठी
वापरण्यात आलं असल्याचं या कंपनीच्या अधिकाऱ्यानी सांगितलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातल्या राष्ट्रीय
महामार्गाचा नऊ शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून आज सोनारी टोल नाक्यावर
शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या
कामासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करून तीन ते साडेतीन वर्षे झाली आहेत. तेंव्हा
पासून या नऊ शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.
//********//
No comments:
Post a Comment