Tuesday, 5 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग, प्रत्यक्ष सुरु; शाळा परत बंद करायची वेळ येणार नाही या निर्धारानं शिक्षण सुरू ठेवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

·      आगामी नवरात्रोत्सवासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी, घरगुती उत्सवात देवीची मूर्ती दोन फूट, तर सार्वजनिक मंडळांकरता चार फूट उंचीचं बंधन

·      राज्यादोन हजार २६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर ७३ बाधि

·      अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे महसुल राज्यमंत्र्यांचे निर्देश, 

आणि

·      केंद्र सरकारच्या नमामि गंगे प्रकल्पात औरंगाबाद आणि पुणे शहराचा समावेश  

****

कोविड पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा जवळपास दीड वर्षानंतर कालपासून सुरू झाल्या. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरी भागात  आठवी ते बारावीचे वर्ग, प्रत्यक्ष सुरु झाले. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला, यावेळी बोलतांना त्यांनी एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धारानं शिक्षण सुरू ठेवू या असा विश्वास व्यक्त केला. यावेळी 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या बोधचिन्हाचं अनावरणही मुख्यमंत्र्यांनी केलं. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शाळांनी सर्व नियमांचं पालन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ते म्हणाले...

कोणत्याही शिक्षकाला वाटलं की, त्याला स्वत:ला थोडसं बरं वाटत नाहीये त्याने टेस्ट करुन घेणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडे लक्ष देणेही गरजेचं आहे. याचं कारण प्रत्येक सीझन बदलत असतांना त्या त्या सीझनचे थोडेसे साथीचे रोग येत असतात. आणि त्याच्यामध्ये तो कोरोनातर नाहीना याची खात्री करुन घेणे हे फार महत्वाचे आहे. कुठलेही वर्ग, शिक्षणाची जागा ही बंदीस्त असता कामा नये. बंदीस्त दारं, खिडक्या उघड्या असल्या पाहिजे. जशी हसती खेळती मुलं तशी खेळती हवा. आणि एकदा उघडलेल्या शाळा आपण बंद होऊ द्यायची नाहीत या निर्धाराने आपल्या या आयुष्याला पुन्हा एकदा सुरुवात करुया.

****

औरंगाबाद शहरात आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या ४१३ शाळा सुरु झाल्या. शासनानं ठरवून दिल्याप्रमाणे आणि कोविड -१९ चे नियम पाळत सुरक्षेची संपूर्ण काळजी शाळांमध्ये घेण्यात आली. शहरातल्या मयुरबन कॉलनी इथल्या महानगर पालिकेच्या शाळेत, तुतारी अन् ढोल ताशाच्या गजरात आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्याचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी प्रवेशद्वारावर शिक्षिकांनी मुलांचं औक्षण करून स्वागत केलं.  

जालना जिल्ह्यातल्या दोन हजार ४०० शाळा कोविड नियमांचं पालन करत सुरु झाल्या. बीड जिल्ह्यात दोन हजार १०१ शाळा सुरू झाल्या, आठ ते दहा शाळा तांत्रिक कारणांमुळे सुरू होऊ शकल्या नाहीत. हिंगोली जिल्ह्यात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीच्या दोन हजार ९३१, तर शहरी भागातल्या ५७५ शाळा  सुरू झाल्या. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल शहरातल्या बाबानगर इथल्या महात्मा फुले शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देवून स्वागत केलं.

****

निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर मार्ड संघटनेनं संप मागे घेत असल्याचं एका पत्रकाद्वारे जाहीर केलं.

****

येत्या नवरात्रोत्सवासंदर्भात गृहविभागानं काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या. घरगुती उत्सवात देवीच्या मूर्तीची उंची कमाल दोन फूट, तर सार्वजनिक मंडळांकरता चार फूट असावी, देवीच्या आगमन तसंच विसर्जन मिरवणुका काढू नयेत, विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं, गरबा, दांडिया तसंच इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत, त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम घ्यावे, असं गृह विभागानं सांगितलं आहे.

****

राज्यात काल दोन हजार २६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ६१ हजार, ३७५ झाली आहे. काल २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३ हजार २३३ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल पाच हजार ३८९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ८६ हजार ५९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३१ शतांश टक्के झाला आहे.

****

मराठवाड्यात काल ७३ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातलया दोन, तर बीड जिल्ह्यातलया एका रुग्णाचा समावेश आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ नवे रुग्ण आढळले, बीड जिल्ह्यात १७, औरंगाबाद १५, लातूर पाच, परभणी तीन, तर जालना जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले. हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

आरोग्य विभागाकडून जालना जिल्ह्यासाठी प्राप्त २३ रुग्णवाहिकांचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. १०२ क्रमांकाच्या या नवीन रुग्णवाहिकांचा वापर गर्भवतींना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात सेवा देण्यासाठी मोफत केला जाणार असल्याचं, टोपे यांनी सांगितलं.

****

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिले. औरगाबाद इथं काल अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिकांचं नुकसान, जीवितहानी तसंच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात रस्ते, पुल यांचंही नुकसान झालं असून, त्याचाही प्रस्ताव सादर करावा, असं सत्तार यांनी सांगितलं.

****

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या शेतीचं अतोनात नुकसान झालं असून, केंद्र सरकारकडून शक्य ती मदत करण्याचं आश्वासन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलं आहे. कराड यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर, वैजापूर, खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

****

मराठवाड्यातल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना येत्या दसऱ्यापूर्वी विम्याची मदत आणि मदत अनुदान न मिळाल्यास, तीव्र आंदोलनाचा इशारा, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. अतिवृष्टीमुळे उस्मानाबादसह संपूर्ण मराठवाड्यात २५ हजार हेक्‍टरवरील पिकांचं नुकसान झालं असून, मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावून तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. उस्मानाबाद तालुक्यात करजखेडा, बेंबळी, दाऊतपूर, तेर इथं नुकसानीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

****

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काल अंबाजोगाई तालुक्यातल्या पठाण मांडवा, केज तालुक्यातल्या उंदरी, अरणगाव आदी गावांना भेट देऊन नदी काठच्या शेतांतल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली, तसंच स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

****

हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वच तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी, खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं.

****

नांदेड जिल्ह्यातले शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी काल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. देगलूर विधानसभा पोट निवडणुकीत भाजपने साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

****

आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत आज पुण्याच्या एस एम जोशी महाविद्यालयातले इतिहास विभागप्रमुख डॉ दिनकर मुरकुटे यांचं, 'वासाहतिक काळात शेतकऱ्यांच्या चळवळी', या विषयावर व्याख्यान आपण ऐकणार आहात. या काळात भारतीय शेती व्यवस्था ही आंतरराष्ट्रीय भांडवलशाही सोबत जोडली गेल्यानं शेतकऱ्यांना त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागल्याचं, डॉ मुरकुटे यांनी सांगितलं, ते म्हणाले....

शेतकरी विद्रोहाच्या जाणिवेचा उलगडा ज्या इतिहास कारांनी केला. त्या इतिहासकारांना सबार्टन इतिहासकार असं संबोधलं जातं. या सबार्टन इतिहासकारांनी केवळ मार्क्सवादांच्याच नव्हे तर सर्व प्रकारच्या अभिजनवादाला नकार देत शोषित अंकीतांच्या जाणिवेचा अभ्यास, शोषित अंकित जनवादी इतिहास म्हणून त्यांनी सुरु केला. शोषित वंचित जणांचे अनुभव, त्यांची दुर्लक्षित परंपरा, अस्मिता व जीवनस्तर यातून उभ्या राहणाऱ्या त्यांच्या ऐतिहासिक व्यवहारांचा मागोवा या इतिहास कारांनी घेतला.

आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून सायंकाळी सहा ३५ मिनिटांनी हे व्याख्यान प्रसारित होणार आहे.

****

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे राबवल्या जाणाऱ्या नमामि गंगे प्रकल्पात औरंगाबाद आणि पुणे शहराचा समावेश करण्यात आला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पात औरंगाबाद जिल्ह्यातल्या खाम आणि सुखना या नद्यांचं तीन टप्प्यात पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा सविस्तर अहवाल तयार करुन केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याचं, पांडेय यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या डोंगरकडा इथं नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल स्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पिक विमा देण्यात यावा, सोयाबीनचे दर पाडणाऱ्यांवर कारवाई व्हावी, केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

****

उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तसंच नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात अंबाजोगाई परिसरात काल विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

****

हवामान -

राज्यात येत्या आठ तारखेपर्यंत औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

****

No comments:

Post a Comment