आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१५ ऑक्टोबर २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
विजयादशमीचा सण आज साजरा
होत आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी देशवासीयांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू रामाचं व्यक्तिमत्त्व आणि मर्यादा-पुरुषोत्तम
म्हणून त्यांचं वर्तन सर्वांसाठी आदर्श आहे, या सणामुळे देशवासियांना राष्ट्रनिर्मितीसाठी
काम करायची प्रेरणा मिळेल, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनीही राज्यातल्या जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
देशाचा इतिहास नव्या पिढीला
समजायला हवा, विषमतेवर आधारित समाजव्यवस्था शाश्वत नाही, त्यामुळे समाजाला जोडणारी
भाषा वापरायला हवी, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
यांनी केलं आहे. नागपूर इथं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात मार्गदर्शन
करताना ते बोलत होते. या कार्यक्रमात शस्त्रपूजनही करण्यात आलं.
****
नागपूरच्या दीक्षाभूमीवर
आज ५६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक
समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी भगवान बुद्धांच्या प्रतिमेला माल्यार्पण
करून बुद्धवंदना केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सात नव्या संरक्षण कंपन्या देशाला समर्पित करणार आहेत.
यामुळे संरक्षण तयारीबाबत आत्मनिर्भर होण्याबरोबरच कार्यात्मरक स्वायत्तता, कार्यक्षमता,
नवीन कल्पना आणि वाढीसाठी मदत होणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ आणि वरणगाव
इथल्या आयुध निर्माणीचाही समावेश करण्यात आला आहे.
****
कोळशाच्या पुरवठ्याच्या कमतरतेमुळे
देशातल्या कुठल्याही वीज निर्मिती प्रकल्पात अडथळे येणार नाहीत अशी ग्वाही केंद्रीय
कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. झारखंडमधल्या कोळसा खाणीची पाहणी केल्यानंतर
ते बोलत होते.
****
मराठवाड्यात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या ९३ रुग्णांची
नोंद झाली, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment