Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०५ जानेवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत
देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं
चिंता वाढली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला
सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी
अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा.
मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात,
चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६
१२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· राज्यात कोरोना
विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य
सरकारची आज बैठक
·
पुणे
जिल्ह्यात पहिली ते
आठवीपर्यंतच्या शाळां बंद, महाविद्यालयं आणि उच्च शिक्षणाशी
संबंधित संस्था सुरू ठेवण्याबाबत आज संध्याकाळी निर्णय जाहीर करणार
·
कोविड संदर्भात राज्यात वैद्यकीय सुविधा उभारण्याच्या कामाला
गती देण्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे निर्देश
· राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ७५ रुग्णांची
नोंद
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे १८ हजार ४६६ तर मराठवाड्यात २३३ नवे रुग्ण
· अनाथांची माय ज्येष्ठ
समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचं निधन
· गंगाखेड शुगर अॅण्ड एजन्सीची
हिंगोली जिल्ह्यातली ४० हेक्टर जमीन अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात
आणि
· दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात बिनबाद २४ धावा, आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांवर
संपुष्टात
****
राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव
झपाट्यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बैठक बोलावली असून, यावेळी राज्यात
अधिक निर्बंध लावण्याबाबत चर्चा होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते.
सर्व साधारण मास्क वापरून फारसा फायदा होत नाही, असं वैद्यकीय
तज्ञांचं मत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी तीन पदरी किंवा एन नाईंटी फाईव्ह मास्क
वापरावेत असं आवाहन, पवार यांनी सर्व नागरिकांना केलं. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना
काढण्याची विनंती केंद्र सरकारला केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग
बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या वर्गांचे विद्यार्थी
ऑनलाईन वर्गांना हजेरी लावू शकतील. वाढता कोविड प्रादुर्भाव पाहता, शाळांचे प्रत्यक्ष
वर्ग बंद करणारं पुणे हे चौथं शहर ठरलं आहे. यापूर्वी मुंबई, नवी मुंबई तसंच ठाण्यातल्या
शाळा बंद करण्यात आल्या असून, ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळातले १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोना
विषाणूची लागण झाल्यानं आजची नियोजित मंत्रीमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
आणि खासदार अरविंद सावंत यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे
काल ही माहिती दिली. शिंदे यांना दुसऱ्यांदा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांची
प्रकृती उत्तम असून लवकरच आपल्या सेवेत हजर होईन असं त्यांनी आपल्यां संदेशात म्हटलं
आहे. तर खासदार सावंत यांनी स्वतः विलगीकरणात जात असल्याचं सांगितलं. संपर्कात आलेल्या
सर्वांनी आपली कोरोना तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन या दोन्ही नेत्यांनी केलं आहे.
****
उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल राज्यातली महाविद्यालयं
तसंच विद्यापीठांसंदर्भात आढावा बैठक घेतली. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कुलगुरू
या बैठकीला उपस्थित होते. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या कोविडविषयक
सुरक्षेबद्दल या बैठकीत चर्चा झाली. महाविद्यालयं आणि उच्च शिक्षणाशी संबंधित संस्था
सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय आज संध्याकाळी जाहीर करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं
आहे.
****
कोविड
संदर्भात राज्यात वैद्यकीय सुविधा उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश, केंद्रीय
आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी राज्य सरकारला दिले आहेत. काल राज्यातल्या कोविड स्थितीचा
आढावा घेताना त्यांनी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याचा
राज्य सरकारला सल्ला दिला. राज्यात कोविड उपचारासंदर्भातली काम संथगतीनं चालू असल्याबद्दल
त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने राज्यांना पुरेसा निधी दिलेला आहे, तो
आवश्यक सुविधांवर खर्च का झाला नाही, याकडे लक्ष देण्याची गरज डॉ पवार यांनी व्यक्त
केली. त्या म्हणाल्या..
केंद्राने पूर्ण बजेट सगळ्या
राज्यांना दिलंय. ए सी आर पी – 1, ए सी आर पी – 2 हे असे बजेट आहेत एक्स्ट्रा की जे
या कोविड काळामधे विशेष दिले गेले. राज्यांनी न मागता दिले. त्यातही ते राज्य सरकारांनी
खर्च करून ती ती व्यवस्था तयार करायची आहे. मग त्याच्यात बेडस् आले, आय सी यु आले.
व्हेंटीलेटर आले. ऑक्सिजन पाईपलाईनपासून अगदी मायनर गोष्टींना लक्षात घेऊन हे बजट दिलंय.
केंद्र सरकार कुठे कमी पडलंय आजपर्यंत हे आम्हाला कळू द्या. हेल्थ बजेट एक्स्ट्रा दिलं
गेलंय. एन एम एच व्यतिरिक्त तर ते खर्च झालं नसेल तर काय कारण आहे. काम चालू आहे. काम
करत नाही राज्य सरकार असा माझा अजिबात आक्षेप नाही. परंतू संथ गतीने चालू आहे. आपल्या
माध्यमातनं माझी विनंती आहे राज्य सरकारने थोडी गती वाढवावी.
****
राज्यात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ७५ रुग्णांची
नोंद झाली. या रुग्णांमध्ये
मुंबईतले ४०, पुणे जिल्ह्यातले १०, कोल्हापूर
आणि नागपूर प्रत्येकी तीन, अमरावती आणि सातारा जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका, तर पनवेल महानगरपालिकेत पाच, आणि नवी मुंबई, भिवंडी,
उल्हासनगर महानगरपालिकेत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५३ झाली असून, त्यापैकी २५९ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १८ हजार ४६६ रुग्ण
आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६७ लाख ३० हजार ४९४ झाली आहे.
काल २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
५७३ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १० शतांश टक्क्यांवर
कायम आहे. काल चार हजार ५५८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख १८ हजार ९१६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविड मुक्तीचा दर ९६ पूर्णांक ८६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ६६ हजार ३०८
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २३३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात
काल १०३ नवे रुग्ण आढळले. यात शहरातल्या ८७, तर ग्रामीण भागातल्या १६ रुग्णांचा
समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ३५, नांदेड २९, लातूर २८, परभणी १३, जालना
१२, बीड दहा, तर हिंगोली जिल्ह्यात काल तीन नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
बीड जिल्ह्यानं कोविड साथीच्या दोन्ही लाटेत नियंत्रण आणि उपचारासाठी चांगलं काम केलं असून, जिल्हा आरोग्य
यंत्रणेला आवश्यकतेनुसार मनुष्यबळ आणि
अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं राज्याचे आरोग्य मंत्री
राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. बीड जिल्हा
रुग्णालयात अद्ययावत कोरोना विषाणू निदान आणि संशोधन
प्रयोगशाळेचं लोकार्पण, काल टोपे आणि बीडचे पालकमंत्री
धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं,
त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा स्तरावर शक्य त्या नियुक्त्या करून कंत्राटी
स्वरूपात मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावं; अशी सूचना मुंडे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला केली.
****
अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचं
काल पुणे इथं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना महिन्याभरापूर्वी
रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म वर्धा इथं झाला. घरात मुलगी नको असताना त्यांचा
जन्म झाल्याने त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. त्यांना मराठी शाळेत चौथीपर्यंतच
शिकता आलं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न करून देण्यात आलं. मात्र, त्यानंतरही त्यांचा संघर्ष सुरूच राहिला.
पुढे सिंधुताई यांनी १९९४ मध्ये पुणे जिल्ह्यात
पुरंदर तालुक्यातल्या कुंभारवळण
गावात ममता बाल सदन संस्था सुरू केली. स्वतःची मुलगी ममताला त्यांनी दगडूशेठ हलवाई
संस्थेच्या माध्यमातून सेवासदन इथं शिक्षणासाठी दाखल केलं. तसंच स्वतः इतर अनाथ आणि बेवारस मुलांचा सांभाळ
करत आधार दिला. या ठिकाणी त्यांनी लहान मुलांच्या पालनपोषणासह शिक्षणाचीही
जबाबदारी स्विकारली. त्यांच्या या सामाजिक कार्याचा सन्मान
म्हणून जानेवारी २०२१ मध्ये त्यांना केंद्र सरकारतर्फे
पद्मश्रीनं
गौरवण्यात आलं आहे.
सिंधुताईंच्या अचानक जाण्याने समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व
आपल्यातून हरवलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली
अर्पण केली.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
डासाळा शाखेचे पाच लाख रुपये काल चोरट्यांनी लांबवले. डासाळा शाखेचे शाखाधिकारी केशव मांडे आणि रोखपाल
बालासाहेब जाधव हे दोघे सेलू इथून काल सकाळी रोख रक्कम घेऊन निघाले असता, मोटार सायकल वरून आलेल्या दोन चोरट्यांनी
या दोघांच्या डोळ्यात स्प्रे मारून पाच लाख रुपये असलेली पिशवी पळवली. पोलिसांनी चोरांचा पाठलाग करत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु
त्या रकमेतील पावणे दोन लाख रुपये रस्त्यावर फेकून चोर पसार झाल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गंगाखेड शुगर अॅण्ड एजन्सी लिमिटेडची हिंगोली जिल्ह्यातली सुमारे ४० हेक्टर जमीन काल अंमलबजावणी
संचालनालय - ईडीने सील करून ताब्यात घेतली. कळमनुरी तालुक्यात वाकोडी तसंच खापरखेडा शेतशिवारातली ही ३९ पूर्णांक
३७ हेक्टर जमीन, मुख्य शेतकरी अधिकारी नंदकिशोर रतनलाल शर्मा
यांच्या नावे आहे. ईडीने तहसीलचे मंडळ अधिकारी तसंच तलाठ्यांना सोबत घेऊन ही कारवाई
केली. यासंदर्भात सूचना देणारा फलक या जमिनीवर लावण्यात आला आहे.
****
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी
क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात, भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा
संघही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात २२९
धावांत सर्वबाद झाला. शार्दुल ठाकूरनं सात, मोहम्मद शमीनं दोन तर जसप्रीत बुमराहनं
एक गडी बाद केला. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तोपर्यंत भारताच्या दुसऱ्या डावात,
बिनबाद २४ धावा झाल्या. कर्णधार के एल राहुल आठ तर मयांक अग्रवाल १६ धावांवर खेळत आहे.
सामन्यात भारत तीन धावांनी आघाडीवर आहे.
****
परभणी महानगर पालिकेनं काल शहरात विना मास्क फिरणाऱ्या २३
नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली, या नागरिकांकडून चार हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
****
मराठवाड्यात येत्या ९ ते १५ जानेवारीपर्यंत कमाल तापमानात घट
होण्याची शक्यता आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान
विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येत्या
शनिवारी आठ तारखेला हलक्या पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment