Tuesday, 1 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.11.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 November 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ नोव्हेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि सी डॅकचा इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारची मंजुरी

·      नाणार रिफायनरीचा प्रकल्प राज्यातच होणार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांचे पाप आमच्या माथी मारु नका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन तर फडणवीस जनतेची दिशाभूल करअसल्याचा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा आरोप

·      राज्य सरकारच्या विविध विभागातल्या नोकर भरतीतले निर्बंध एक वर्षासाठी शिथील

·      राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

·      देशात आजपासून डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु

·      लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौड

·      पंढरपूरकडे कार्तिकी यात्रेसाठी पायी जाणाऱ्या दिंडीत मोटारगाडी घुसल्यानं सात वारकऱ्यांचा चिरडून मृत्यू

आणि

·      टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर ४२ धावांनी विजय

****

पुण्याजवळ रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्याची घोषणा, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या क्लस्टरमध्ये दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, तसंच यातून पाच हजार रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्टार्ट-अपला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याशिवाय सी डॅकचा एक इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्पही राज्यात होणार असल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं. साधारण एक हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प असणार आहे असं ते म्हणाले.

जवळपास २९७ एकर जागेवर हे क्लस्टर उभारलं जाईल. या प्रकल्पातंर्गत आय एफ बी रेफ्रिजरेशन कंपनीनं ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग या निमित्तानं राज्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

****

राज्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्याची घोषणा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकराचे आभार मानले आहेत. केंद्रानं राज्याला ही भेट दिली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ते म्हणाले...

महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून ते विकसित करतील. फ्यूचर - भविष्य हे इलेक्ट्रॉनिकमध्ये आहे. सर्वाधिक गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. त्यामुळे एक प्रकारे केंद्र सरकानं दिलेली ही भेटच आहे. यासोबतच लवकरच मला अपेक्षा आहे. केंद्र सरकार टेक्सटाईल पार्क देणार आहे. आणि टेक्सटाईल क्लस्टर त्यातून एक महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यामध्ये आता सादर झालेलं आहे. नविन वर्षात त्या संदर्भात बजेट पर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे किंवा बजेटच्या आधी देखिल ते घोषित होवू शकतं.

राज्याबाहेर जात असलेल्या प्रकल्पांबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यात येणार नाही, असं तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं होतं, असं सांगितलं. ते म्हणाले.

पहिला फेक नरेटिव्ह हा फॉक्सकॉनचा तयार करण्यात आला की, आमचं सरकार आलं आणि फॉक्सकॉन गेलं. फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही कोणाच्या काळात म्हटलं. उद्धव ठाकरेजींच्याच काळात म्हटलं आहे. त्यानंतर टाटा एअरबस गुजरातला जाण्याचा निर्णय हा टाटा एअरबस करतय २०२१ ची गोष्ट आहे. हे चालले आहेत यांना थांबवलं पाहिजे परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. एक साधं पत्रही गेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार असतांना टाटा एअरबस हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातनं गेलाय आणि त्याच्यावर कहर म्हणजे तर सॅफ्रॉन २०२१ मध्ये गेला त्याची फॅक्ट्री तयार झाली आहे. आणि त्यांची फॅक्ट्री तयार होवून तिचं उद्धाटन झालं. आणि इथं मात्र फेक नरेटिव्ह चालला आहे की, आमच्या सरकारच्या काळात ते गेलं.खोटं सांगावं तर त्याला काहीतरी लिमिट ठेवावी.

नाणार रिफायनरीचा प्रकल्प रद्द झालेला नसून हा प्रकल्प राज्यातच होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. यामध्ये ७५ टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या कंपन्यांचा आहे. एक लाख थेट रोजगार, पाच लाखांपर्यंत इतर रोजगार निर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मेडिकल डिव्हाईस पार्क आणि बल्क ड्रग पार्क राज्याला देण्याचं केंद्र सरकारनं कधीही आश्वासन दिलं नव्हतं, मात्र तरीही केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोष दिला जात आहे, असं फडणवीस म्हणाले. हे सगळे प्रकल्प आमच्या सरकारच्या काळात गेलेले नाहीत, त्यामुळे त्याचं पाप आमच्या माथी मारु नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परीषद संपल्यानंतर काही वेळातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आकड्यांचा खेळ करुन उपमुख्यमंत्री फडणवीस हे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. फडणवीस सांगत असलेले फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन वेगवेगळे प्रकल्प असल्याचं सांगतांना ठाकरे म्हणाले…..

देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेला प्रस्ताव त्यावेळी तामिळनाडुमध्ये गेला आणि नंतर दुसरा प्रस्ताव युएसला गेला. हा तो फॉक्सकॉनचा आहे, त्या फॉक्सकॉनमध्ये आणि वेदांता फॉक्सकॉनमध्ये जरी फॉक्सकॉन कंपनी ही एक असली तरी त्या दोन्ही प्रकल्पांमध्ये जमिन आस्मानाचं अंतर आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमी कंडक्टर चीप साठी होता, ज्या मोबाईल फोन साठी नव्हत्या. माझी ही विनंती राहील उपमुख्यमंत्री महोदयांना ही कृपा करुन महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोडून द्या, इथे बदनामीचा प्रयत्न सोडून द्या. दोन वेगळे प्रस्ताव आहेत. ते प्रस्ताव वेगवेगळ्या वेळेला आले होते. २०२० मध्ये जो प्रस्ताव अमान्य झाला, किंवा रद्द झाला, किंवा लॅप्स झाला, तो एवढ्यासाठी झाला, कारण जी फॉक्सकॉन कंपनी २०१५ मध्ये एमओयु सही करुन बसलेली, त्यांनी ती जागा घेतलीच नाही दुसरीकडे गेले, आणि म्हणून तो प्रकल्प रद्द झाला.

बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाईस पार्कसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. प्रस्ताव पाठवला नाही सं म्हणणं चुकीचं आहे. तत्कालिन उद्योग मंत्री सुभाष देसाई हे नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ कांत यांना या संदर्भात भेटले होते, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

****

प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यातला वाद मिटला असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा यांच्यासोबत चर्चा झाली. आमदार कडू आणि राणा यांची समजूत काढण्यात आली असून, दोघांनीही रागा- रागात आपण बोलल्याचं मान्य केल, त्यामुळे आता हा विषय संपला असल्याचं फडणवीस म्हणाले.

****

राज्य सरकारच्या विविध विभागातल्या नोकर भरतीतले निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. सुधारित आकृतीबंध अंतिम झालेल्या शासकीय विभागांना सरळसेवा कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदं भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झाला नसलेल्या विभागातल्या गट अ, ब आणि क मधल्या सरळसेवा कोट्यातील ८० टक्के रिक्त पदं भरण्यास अर्थ विभागानं अनुमती दिली आहे. मात्र वाहनचालक आणि गट ड संवर्गातल्या पदांच्या भरतीत यातून वगळण्यात आलं आहे. पदभरतीतली ही शिथीलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू राहील.

****

राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षेखालच्या पाच सदस्यीय घटनात्मक पीठापुढे सुनावणी होणार आहे. १६ आमदारांची अपात्रता आणि इतर कायदेशीर पेचावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

****

देशात आजपासून डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु होणार आहे. सुरुवातीला घाऊक क्षेत्रात सरकारी रोख्यांच्या व्यवहारासाठी, या डिजिटल रुपी चलनाचा वापर केला जाईल, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. या ई -रुपीचा वापर आंतर बँक व्यवहाराची कार्यक्षमता वाढवेल, तसंच यामध्ये प्रत्यक्ष रकमेची देवाण घेवाण होणार नाही, त्यामुळे  व्यवहाराचा एकूण खर्च कमी होईल, असं यात म्हटलं आहे. येत्या महिन्याभरात सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील डीजीएल रुपी चलन खुलं करण्याची रिझर्व्ह बँकेची योजना आहे.

****

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा संरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून, केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून, येत्या दहा दिवसात हे काम पूर्ण होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४७ वी जयंती काल देशभरात एकता दिवस म्हणून साजरी झाली. यानिमित्ताने देशभर एकता दौड काढण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत पटेल चौकातल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर पुष्पांजली अर्पण केली. यानंतर गृहमंत्री शहा यांनी मेजर ध्यानचंद मैदानावर आयोजित एकता दौडीचा शुभारंभ केला.

गुजरातमधल्या केवाडिया इथं आयोजित एकता दौड संचलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या हम एक है, हम श्रेष्ठ हे आणि एक भारत, श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना एकतेची शपथ दिली. तत्पूर्वी पंतप्रधानांनी केवाडिया मधल्या 'स्टॅचू ऑफ युनिटी' इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली.

राज्यातही सर्वत्र एकता दौड काढण्यात आली. औरंगाबादमध्ये आयोजित एकता दौडला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. विभागीय क्रीडा संकुल ते गजानन महाराज मंदीर या मार्गावर ही एकता दौड झाली. यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन देशातली एकता आणि एकात्मता जोपासण्याचा संकल्प करण्यात आला.

लातूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, ‍उस्मानाबाद, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, वाशिम, भंडारा, यवतमाळ, जळगाव, सोलापूर, बुलडाणा, वर्धा इथंही एकता दौड निघाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतिनिमित्त त्यांच्या कार्याला समर्पित विशेष टपाल पाकिटाचं अनावरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल मुंबईत करण्यात आलं.

****

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांनी दिल्लीत शक्ति स्थळ या इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

****

बीड जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांना सरसकट भरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेवून हा प्रश्न सोडवला जाईल, असं पालकमंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. जिल्हा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जिल्हा वार्षिक योजनेसाठीचे प्रस्ताव येत्या सात दिवसात सादर करावेत, या प्रस्तावांवर पुढील १५ दिवसात कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, बीड इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दौड रॅलीच्या सांगता कार्यक्रमात पालकमंत्री सावे सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यात भव्य क्रीडा संकुल निर्माण करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंबंधी काल जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानामार्फत भाविकांसाठी सेवा सुविधांची उपाययोजना करण्याबाबत,संच तुळजापूरला जागतिक दर्जाचं धार्मिक स्थळ अशी ओळख मिळवून देण्यासाठी अभ्यास समिती, तिरुपती बालाजी, शिर्डी, शेगांव आदी देवस्थानांच्या अभ्यास दौरा करणार असल्याचं, जिल्हाधिकार्यांनी यावेळी सांगितलं.

****

उस्मानाबाद इथल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया नाकारण्यात आली असून, ती पूर्ववत करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांना निवेदन दिलं आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, पायाभूत सुविधांची कमतरता, आदी निकषावरुन भारतीय चिकित्सा पद्धती परिषदेनं या महाविद्यालयात प्रवेश देण्यास मनाई केली असून, सरकारनं निकषांची पूर्तता तातडीनं करुन प्रवेश प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

****

पंढरपूरकडे कार्तिकी यात्रेसाठी पायी जाणाऱ्या दिंडीत मोटारगाडी घुसल्यानं सात वारकऱ्यांचा चिरडून मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात मिरज - सांगोला मार्गावर जुनोनी गावाजवळ हा अपघात घडला. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या अपघातात पाच वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोला इथं उपचार सुरु आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातल्या जठारवाडी गावच्या वारकऱ्यांची ही दिंडी आहे. दिंडीत ३६ वारकरी सहभागी झाले होते.

****

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं आयर्लंडचा ४२ धावांनी पराभव केला. या स्पर्धेत आज अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामने होणार आहेत.

****

औरंगाबाद ते पुणे महामार्गावर औरंगाबाद शहरातल्या नगरनाका ते ए. एस क्लब दरम्यानची जड वाहतूक आता ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. या महामार्गावरील पुणे -अहमदनगर ते जालना बीडकडे जाणारी जड वाहतूक पूर्वी प्रमाणेच ए.एस. क्लब, लिंक रोड, महानुभाव आश्रम, जुना बीड नाका, झाल्टा फाटा, केंब्रीज चौक मार्गे वळवण्यात आली आहे. तर औरंगाबाद शहरात येणारी आणि जाणारी जड वाहतूक साजापूर फाटा, शरणापूर फाटा, पडेगाव, नगरनाका, या मार्गाने वळवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचं, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत जिल्हा अंतर्गत मार्गावरील अपघात प्रवण स्थळांची माहिती घेवून त्याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

****

No comments:

Post a Comment