Saturday, 10 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  10 December  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० डिसेंबर २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      समृध्दी महामार्गाच्या उद्‌घा‌टनापूर्वी पंतप्रधानांनी कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावादावर भूमिका स्पष्ट करावी - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आवाहन.

·      लावणी सम्राज्ञी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

·      ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक करणाऱ्या परिपत्रकप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची राज्य शासनाला नोटीस.

आणि

·      औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाकडून शालेय विद्यार्थीनींना मोफत कराटे प्रशिक्षण.

****

हिंदूहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्‌घा‌टनासाठी उद्या महाराष्ट्रात येत असलेल्या पंतप्रधानांनी उद्‌घा‌टनापूर्वी कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्‌घाटन आज दुपारी जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथल्या संत रामदास कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या महदंबा साहित्यनगरीमध्ये ठाकरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

चुकणाऱ्यांचा कान धरण्याचा साहित्यिकांना अधिकार असून, राज्यकर्ते चुकत असतील तर साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून त्यांची चूक दाखवून द्यायला हवी, असं ठाकरे म्हणाले. मराठवाडा ही संतांची भूमी असून, या भूमीनं प्रत्येकाला संस्कार आणि शौर्य दिलं आहे. शेतकरी जशी शेतीची मशागत करतो तशीच साहित्यिक आपल्या बुध्दीची मशागत करत असतात, त्यामुळे साहित्यिकांनी आपली भूमिका परखडपणे मांडायला हवी, असं ठाकरे यांनी नमूद केलं.

संमेलनाचे अध्यक्ष प्रसिध्द साहित्यिक शेषराव मोहिते, स्वागताध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे यांचीही यावेळी भाषणं झाली. यावेळी मावळेत संमेलनाध्यक्ष बाबू बिरादर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, यांच्यासह साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. संमेलनाच्या उदघाटनापूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन दिवसीय साहित्य संमेलनात कथाकथन, परिसंवाद, कवी संमेलन, प्रकट मुलाखत, बाल मेळावा आदी कार्यक्रम होत आहेत. उद्या संमेलनाचा समारोप होणार आहे.

****

ज्येष्ठ गायिका लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या ८९ वर्षांच्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी पहिली लावणी गायलेल्या सुलोचनाबाईंनी मला नेसव शालू नवा, खेळताना रंग बाई होळीचा या आणि अशा असंख्य लावण्या गाऊन साठ वर्षांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांनी काही गुजराती चित्रपटातून तसंच उर्दू नाटकांतून भूमिकाही साकारल्या. त्यांना लता मंगेशकर पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ या नागरी सन्मानानं नुकतंच सन्मानित करण्यात आलं होतं.

शालीनतेनं सादर होणाऱ्या ठसकेबाज लावणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना बाईंनी ‘रंगल्या रात्री’ या सिनेमासाठी पहिल्यांदा लावणी गायली आणि फडावरची लावणी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय झाली. मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषांमधूनही त्यांनी अनेक गाणी गायली. लावणी गायनाचे अनेक कार्यक्रम केले. कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातला ठराविक हिस्सा त्या धार्मिक संस्थांना देत, तसंच गरजूंपर्यंत पोहोचवत. माझे गाणे माझे जगणे, या आत्मचरित्रातून त्यांनी लावणीच्या अनेक आठवणी जागवल्या आहेत. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागंल कोल्हा, मला हो म्हणतात लवंगी मिरची किंवा कसं काय पाटील बरं हाय का.. या सुलोचनाबाईंनी गायलेल्या लावण्या रसिकांच्या मनात चिरकाळ ताज्या राहतील, यात काही शंका नाही...

सुलोचनाबाईंच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे.

मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सुलोचना चव्हाण यांचा कलाप्रवास थक्क करणारा तसंच प्रेरणादायी असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

 

सुलोचना चव्हाण यांच्या निधनानं महाराष्ट्राची लोककला, लोकसंगीतातील दैदिप्यमान युगाचा अंत झाला, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चव्हाण यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं.

सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने लावणीचा अभिजात सूर हरपल्याची भावना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. तसंच नागपूर इथं विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं महानगर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी सुरक्षेसह इतर व्यवस्थांचा आढावा घेतला. पंतप्रधानांच्या हस्ते उद्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याचं लोकार्पण होणार आहे. जुलै २०२३ पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

शेतमाल हमीभाव, निर्यात, साठवणीसाठी शीतगृह, प्रक्रिया उद्योग अशा विविध विषयांसाठी राज्य शासनाच्या वतीने अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन त्यावर सकारात्मक निर्णय घेईल, असं राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने नाशिकच्या डोंगरे मैदानावर भरवलेल्या कृषी महोत्सवात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली. आधुनिक उपकरणाद्वारे शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीने शेती करत आहेत, शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सत्तार यांनी सांगितलं.

****

ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक करणाऱ्या परिपत्रकास आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. जिल्हापरिषेमार्फत नियुक्ती केल्या जाणाऱ्या वर्ग तीन च्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणं बंधनकारक करणारं नऊ सप्टेंबर २०१९ रोजी जारी केलेलं परिपत्रक अन्यायकारक आहे, तसंच ते परिपत्रक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९६१ च्या कलम २४८ चं पालन न करता आणि उच्च न्यायालयानं दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगानं काढलेलं नाही, असं या याचिकेत म्हटलं आहे. ही याचिका सुनावणीसाठी आली असता खंडपीठानं राज्य शासन आणि औरंगाबाद, परभणी, नांदेड आणि धुळे जिल्हा परिषदांना नोटीस बजावली. याबाबत पुढील सुनावणी २३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

****

औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या वतीनं शहरातील शालेय विद्यार्थीनींना स्वरक्षणासाठी मोफत कराटेचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज शहरातल्या जवळपास २०० विद्यार्थींनींना पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मैदानावर स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. विन चुंग असोसिएशनचे रामेश्वर चायाल आणि अश्विनी चायल यांनी हे प्रशिक्षण दिलं. दर शनिवारी हे प्रशिक्षण देण्यात येत असून शहरातल्या जास्तीत जास्त मुलींनी या प्रशिक्षणात सहभागी होण्याचं आवाहन पोलीस आयुक्त डॉ निखील गुप्ता आणि उपायुक्त अपर्णा गिते यांनी केलं आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्या परिषद निवडणुकीसाठी आज मतदान झालं.

****

No comments:

Post a Comment