आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८ डिसेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
राज्याच्या
विविध जिल्हयांमध्ये ७ हजारांहून अधिक ग्रामपंचायती आणि थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी
आज सकाळी मतदानाला
सुरूवात झाली. औरंगाबाद जिल्ह्यातही आज सकाळी साडेसात वाजता
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली. जिल्ह्यात एकूण २१६ ग्रामपंचायतींच्या
निवडणुका होत असून ७२५ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. या निवडणूकीची मतमोजणी २०
तारखेला होणार आहे.
***
भारत
आणि बांगलादेश यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं १८८ धावांनी जिंकला. बांगलादेशच्या
संघानं आज खेळ सुरू झाल्यानंतर चार गडी गमावत केवळ ५३ धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशचा
दुसरा डाव ३२५ धावांवर आटोपला. भारतानं दुसऱ्या डावात ५१३ धावांची आघाडी घेतली होती.
दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतला पुढचा सामना २२ तारखेपासून सुरू होणार आहे.
***
महात्मा
गांधी अभिमत विद्यापीठाच्या महागामी गुरूकुलाच्या यंदाच्या ऑरा औरंगाबाद या महोत्सवाचा
आज समारोप होत आहे. समारोप सोहळ्यात आज सायंकाळी भोकरदन तालुक्यात अन्वा इथल्या मंदिरात
महागामीच्या शिष्यांचं ओडिसी नृत्य आणि निरंजन भालेराव यांचं बासरी वादन होणार आहे.
***
नांदेड
जिल्ह्यात येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ऑटोरिक्षा वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात
येणार आहे. जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना ऑटोरिक्षा, योग्यता प्रमाणपत्र
संपुष्टात आलेली ऑटोरिक्षा चालत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं ही मोहीम राबवण्यात
येणार आहे.
***
हिंगोली
इथं ३ ते ५ जानेवारी दरम्यान राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात
आलं आहे. मराठा सेवा संघ आणि संलग्लित कक्षाच्या वतीनं दरवर्षी या व्याख्यानमालेचं
आयोजन करण्यात येतं.
***
औरंगाबाद-हैद्राबाद
रेल्वेगाडी पुढचे काही दिवस अडीच तास उशीरा सुटणार आहे.
//*********//
No comments:
Post a Comment