Friday, 3 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 03.03.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 March 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ मार्च २०२ सायंकाळी ६.१०

****

·      दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार - मुख्यमंत्र्यांची ग्वाही.

·      अंगणवाडी सेविका तसंच मदतनीसांच्या मानधनात सुमारे २० टक्के वाढीचा सरकारचा निर्णय.

·      इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर नऊ गडी राखून विजय.

आणि

·      मराठवाड्यात पुढच्या काही दिवसांत अनेक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता.

****

दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. येत्या दोन वर्षांत महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लावणार असून राज्याचं वेगळं चित्र देशासमोर उभं करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातली ५ लाख ३१ हजार हेक्टर नवीन जमीन सिंचनाखाली आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यासाठी ३८ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार, अतुल भातखळकर, संजय कुटे, सुरेश वरपुडकर, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अबु आझमी आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला

****

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात सुमारे २० टक्के वाढ करणार असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. मे महिन्यापूर्वी सेविकांची रिक्त पदं पूर्णपणे भरली जाणार आहेत. सर्व अंगणवाड्यांसाठी दीडशे कोटी रुपये निधीतून नवीन मोबाईल खरेदी केली जाणार आहे. अंगणवाड्यांच्या भाड्याच्या मुद्यावरही सरकार योग्य निर्णय घेणार असून, लाईट बिलासंदर्भातही थेट विभागाला देयक अदा करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं, मंत्र्यांनी सांगितलं. कंटेनर अंगणवाडीचं प्रायोगिक स्तरावर उद्‌घाटन होत असून, तीन महिन्यात दोनशे कंटेनर अंगणवाड्या सुरू केल्या जाणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं. मिनी अंगणवाड्यांचं श्रेणीवर्धन करून, त्यांचं पूर्ण अंगणवाडीत रुपांतर करण्याचा निर्णयही सरकारनं घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, आदिती तटकरे यांनीही यासंदर्भात प्रश्न विचारले. मोबाईल ॲपमधली माहिती मराठीतून भरण्याची व्यवस्था करावी, असे मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केले. या ॲपमध्ये नावाशिवाय इतर सर्व माहिती मराठीतून भरण्यासाठी व्यवस्था आहे, नावही मराठीत भरण्याची व्यवस्था केली जाईल, असं लोढा यांनी सांगितलं.

मात्र या प्रश्नांवर मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग केला.

****

जुन्या पेन्शन योजनेवर व्यवहार्य पर्यायांची चाचपणी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. मात्र, यासाठी व्यवहार्य पर्याय देण्याच्या अनुषंगानं चाचपणी सुरू आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मान्यताप्राप्त राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि शिक्षक संघटनांची भेट घेऊन त्यांच्याकडील व्यवहार्य पर्याय जाणून घेऊन त्यातून मार्ग काढला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

****

राज्यात द्रवरुप पेय औषधांचं उत्पादन करणाऱ्या सर्व कंपनीच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश विधानसभेचे तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले आहेत. तसंच औषधांची गुणवत्ता तपासण्याला अन्न आणि औषध प्रशासनामार्फत प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही शिरसाट यांनी यावेळी दिल्या. विधानसभा सदस्य ॲड.आशिष शेलार, विरोधी पक्षनेते अजित पवार, योगेश सागर, जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यात कफ सिरपचं उत्पादन करणाऱ्या चार कंपन्यांचं उत्पादन बंद करण्यात आलं असून, सहा कंपन्यांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं

राज्यात १०८ कंपन्या कफ सिरपचं उत्पादन करतात, त्यातल्या ८४ उत्पादकांची तपासणी करण्यात आली असून, १७ जणांचे नमुने त्रुटी ग्रस्त आढळल्याची माहिती त्यांनी दिली. पुन्हा यावर नव्याने तपासणी मोहीम राबवून कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राठोड यांनी दिली.

****

राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया येत्या देान महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, रोईंगपटू दत्तू भोकनळ आणि आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके यांना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी मुंबईत हल्ला झाला. देशपांडे हे शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना, तीन अज्ञातांनी त्यांना काठीने मारहाण केली. या हल्ल्यात देशपांडे हे जखमी झाले असले तरी, त्यांच्या प्रकृतीला काही धोका नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बॉर्डर - गावसकर मालिकेतल्या इंदूर इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या डावात विजयासाठी असलेलं ७६ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघाने आज सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी एका गड्याच्या मोबदल्यात साध्य केलं. या डावात आठ गडी बाद करणारा लायन प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. चार सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर आहे. मालिकेतला शेवटचा सामना येत्या नऊ तारखेपासून अहमदाबाद इथं सुरु होणार आहे.

****

मराठवाड्यात पुढच्या काही दिवसांत अनेक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार आणि पाच तारखेला, जालना तसंच बीड जिल्ह्यात पाच, सहा आणि सात तारखेला, तर परभणी जिल्ह्यात सात तारखेला पावसाची शक्यता आहे. काढणी झालेल्या किंवा सुरू असलेल्या गहू, हरभरा, रबी ज्वारी, आदी पिकांची सुरक्षित साठवणूक करावी, काढणीला आलेल्या हळदीसह फळपिकांची काढणी लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं दिला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या विविध कामांचा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज तालुकानिहाय आढावा घेतला. जिल्ह्याला दिलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचं उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी महसूल विभागानं गावनिहाय केलेल्या आराखड्याप्रमाणे मंजूर जलसंधारणाची कामं कृषी आणि जलसंधारण विभागानं समन्वयानं पूर्ण करावेत. तसंच जलयुक्त शिवार दोन अभियानास गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी या आढावा बैठकीत दिले.

****

छत्रपती संभाजीनगर मधील अ दर्जा असलेल्या जीवन विकास ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उद्यापासून दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या पत्रकार सुशील कुलकर्णी यांचं “प्रस्थापित माध्यमे आणि समाज माध्यमे” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर रविवारी महान संगीतकार पद्मभूषण संगीत कला निधी कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्त नाट्य गीतांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. यात गायक पंडीत विश्वनाथ दाशरथे, वैभव पांडे, वर्षा जोशी, राजश्री देव ओक हे मराठी नाट्यगीतं सादर करणार आहेत. हा कार्यक्रम टिळक नगर इथल्या व्यंकटेश बालाजी मंदिराच्या प्रांगणात संध्याकाळी सात वाजता होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

****

जालना शहरातल्या गांधी चमन चौकात आज काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं घरगुती गॅस सिलींडर दर वाढीच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

****

महिला शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाच्या मदतीनं पूरक व्यवसाय करुन प्रगती साधावी असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. शेती व्यवसायाला बळकटी देण्याचे काम महिला शेतकरी मोठ्या जोमानं करत असून, खऱ्या अर्थाने शेती व्यवसायाचा त्या कणा आहेत, असं मत वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केलं.

****

धाराशिव जिल्ह्यात चार मार्च ते १० मार्च दरम्यान गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे.

****

No comments:

Post a Comment