Friday, 2 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.08.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 02 August 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यपाल परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेला सर्व राज्यांचे राज्यपाल उपस्थित राहणार असून तीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणात सुधारणा आणि विद्यापीठांची मान्यता, आदिवासी क्षेत्र, आकांक्षी जिल्हे आणि तालुके तसंच सीमावर्ती भागांचा विकास, आदी मुद्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. यासोबतच ‘मायभारत’, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’, ‘एक पेड माँ के नाम’ आणि नैसर्गिक शेती या मोहिमांमध्ये राज्यपालांची भूमिका यासह राज्यपालांनी सार्वजनिक संपर्क वाढवणं, आणि राज्यातल्या विविध केंद्रीय संस्थांमध्ये उत्तम समन्वय साधण्यात राज्यपालांची भूमिका या विषयांवर देखील या बैठकीत चर्चा होईल.

****

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या संकलनात यावर्षी दहा दशांश तीन टक्के इतकी वाढ झाली आहे. हे कर संकलन एक लाख ८२ हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. आतापर्यंतची ही सर्वाधित वाढ आहे तसंच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदी विक्रीमधून सर्वाधिक महसूल प्राप्त झाल्याचं अर्थमंत्रालयानं सांगितलं आहे.

****

केरळमध्ये वायनाड इथं झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत तीनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, सात हजारांहून अधिक नागरिकांना निवासी शिबीरांमध्ये आश्रय देण्यात आला आहे. तपास  मोहिम अद्यापही सुरु असून आपत्तीग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          

****

हिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीमुळे झालेल्या घटनांमध्ये ५० जण बेपत्ता आहेत तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आपदग्रस्तांना शक्य ती सगळी मदत करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी प्रशासनाला दिले आहेत.

****

कोल्हापूर जिल्हयात पंचगंगा नदीला पुराचा धोका अद्यापही कायम आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातले ७३ बंधारे सध्या ओसंडून वाहत आहेत. कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग अद्याप बंद आहेत. सांगली जिल्ह्यातल्या कोयना आणि वारणा धरणक्षेत्रातील पाण्याचा विसर्ग आणि जोरदार पावसामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढली आहे.

****

अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा धरणाचा जलसाठा काल रात्री ८० टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाचे चार वक्र दरवाजे एका फुटाने उघडण्यात आले, त्यातून नदीपात्रामध्ये प्रतिसेकंद ९२ घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

****

स्वराज्य निर्मिंतीत मोलाचं योगदान देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ दूर्ग नक्कीच जागतिक वारसा यादीत समाविष्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ जागतिक वारसा नामांकनाबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग,पन्हाळा, लोहगड, खांदेरी, साल्हेर आणि तामिळनाडूतलल्या जिंजी इथल्या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत सिल्लोड इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थीं महिलांना लाभ प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं आज नियोजित पोलिस भरती रद्द करण्यात आली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या उमेदवारांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला, तेव्हाच संबंधितांनी भरती रद्द केल्याची सूचना उमेदवारांना द्यायला हवी होती, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

****

राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २९ ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबो इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता या सामन्याला सुरुवात होईल. नुकत्याच झालेल्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं निर्भेळ यश मिळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment