Monday, 24 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

·      हास्य कलाकार कुणाल कामराविरोधात एफआयआर दाखल-तोडफोड प्रकरणी ११ जणांना अटक

·      विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु; उपाध्यक्ष पदासाठी २६ मार्चला निवडणूक

आणि

·      विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन साजरा

****

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत आज एकमतानं मंजूर झाला. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. हा पुरस्कार देताना त्यांचा महात्मा, हा सन्मान कमी होऊ नये, अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. महात्मा ही लोकमान्यता आहे तर भारतरत्न ही राजमान्यता आहे, त्यामुळे त्यांचा महात्मा, हा सन्मान कुठेही कमी होणार नाही, असं फडणवीस यांनी यावर बोलताना सांगितलं.

****

 

 

हास्य कलाकार कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. संविधानानं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, कामरा प्रकरणाशी संबंधित स्टुडिओची सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस समोर असताना तोडफोड केली, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन असल्याचं, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तर, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी कुणाल कामरा याच्या अटकेची मागणी केली. यावेळी सभागृहात गोंधळ झाल्यामुळे विधानपरिषदेचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

दरम्यान, कुणाल कामरा याचे कॉल रेकॉर्ड तपासले जातील, त्याच्या बॅंक खात्यात कुठून पैसे येतात हे तपासले जाईल आणि त्याच्या मागे कोण आहे याचा शोध घेतला जाईल, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत सांगितलं. कामरा याच्याविरोधात याआधी अनेक गुन्हे दाखल असून, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र, कुणाल कामराने काही अयोग्य केलं असं वाटत नसल्याचं, म्हटलं आहे. नागपूर दंगलीतल्या नुकसान भरपाईप्रमाणेच, कामराच्या स्टुडिओ तोडफोड प्रकरणात संबंधितांकडून भरपाई वसूल केली पाहिजे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, कुणाल कामरा याच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल-एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या ४० शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्धही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. शिवसेना कार्यकर्ता राहुल कनाल सह ११ जणांना पोलिसांनी तोडफोड प्रकरणी अटक केली आहे.

****

विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. राज्यात जाती धर्माच्या आधारे अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेला सुरुवात करताना केली. जयंत पाटील, नाना पटोले यांनीही विविध मुद्यांवर सरकारवर टीका केली.

****

विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक २६ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज सादर करता येतील, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणी नियमानुसार योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन नार्वेकर यांनी दिलं.

****

मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचं, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. मत्स्य व्यवसायात राज्याला देशात पहिल्या तीन क्रमांकात नेण्याचा सरकारचा संकल्प आहे, असं राणे यांनी सांगितलं.

****

सातबाऱ्यात असलेली मृतांची नावं हटवून त्यावर वारसांची नावं घालण्याची मोहीम येत्या १ एप्रिल पासून राज्यभरात सुरू होणार आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. बुलडाणा जिल्ह्यात चिखली मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दीड महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे, वारसांची नोंदणी करताना succession certificate आवश्यक नाही, तहसीलदार सर्व माहिती घेऊन वारसांची नावं सातबाऱ्यावर लिहितील, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

****

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयक, महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक, तसंच महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक आज विधान परिषदेनं मंजूर केलं.

****

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या वसतीगृहांसाठी पंधराशे कोटी रुपये निधीची तरतूद केल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. एक वसतीगृह दहा कोटी रुपयांचं असावं अशी सरकारची कल्पना असून, वसतीगृहातली प्रवेश प्रक्रिया समाजकल्याण आयुक्तामार्फत राबवली जाईल असं शिरसाट यांनी सांगितलं.

****

केंद्र सरकारनं संसद सदस्यांच्या वेतन, दैनिक भत्ता आणि निवृत्तीवेतनात वाढ केली आहे. त्यानुसार आता संसद सदस्यांचं दरमहा वेतन एक लाख रुपयांवरून एक लाख चोवीस हजार रुपये, दैनिक भत्ता दोन हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये तर निवृत्तीवेतन दरमहा पंचवीस हजारवरून एकतीस हजार रुपये, असं करण्यात आलं आहे. याशिवाय, पाच वर्षांहून जास्त सेवेतल्या प्रत्येक वर्षाचं अतिरिक्त निवृत्तीवेतन दरमहा दोन हजारहून अडीच हजार रुपये, इतकं करण्यात आलं आहे. येत्या एक एप्रिलपासून हा निर्णय लागू होईल.

****

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही, कोणीही बोलतांना विचार करून बोलले पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडून पोलिसांवर जास्त ताण येईल, असं कोणीही बोलू नये, असं ते म्हणाले.

तत्पूर्वी पवार यांनी, ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रा.रं.बोराडे तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी महासचिव मधुकरअण्णा मुळे यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट घेतली.

****

दहावी - बारावीच्या परीक्षेच्या दरम्यान झालेल्या कॉपी प्रकरणांत राज्यात १ मार्चपर्यंत १४ प्रकरणांमध्ये FIR दाखल झाला असून, दहावीच्या ३२ आणि बारावीच्या १०२ केंद्रांवर गैरप्रकार झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. या केंद्रांना विभागीय मंडळं नोटीस देतील, तसंच संबंधित विद्यार्थांची विभागीय मंडळ स्तरावर चौकशी होईल आणि दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई होईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस आज पाळण्यात येत आहे. ‘होय आपण क्षयरोगाचा नायनाट करू शकतो; वचनबद्ध व्हा, प्रयत्न करा आणि परिणाम मिळवा’ अशी यंदाच्या क्षयरोग दिनाची संकल्पना आहे. जनतेनं क्षयरोग निर्मूलनासाठीची आपली कटिबद्धता दृढ करावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी आजच्या जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं केलं आहे. सर्व नागरिक मिळून क्षयमुक्त भारत घडवू शकतात, असा विश्वास देखील आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती संभाजीनगर इथे आज या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा पार पडला. या अभियानात जिल्ह्यातल्या ३२८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. यातल्या ३०४ ग्रामपंचायती कांस्य पदकासाठी पात्र ठरल्या, तर सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी राखणाऱ्या २४ ग्रामपंचायतींना 'महात्मा गांधी रजत सन्मान' प्रदान करण्यात आला.

****

गडचिरोली जिल्ह्यात कृत्रीम बुद्धिमत्ता-एआयच्या मदतीनं क्षयरोग रुग्णांचं निदान करण्यात येत आहे. डॉक्टर अभय बंग यांच्या, सर्च, या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या मॉ दंतेश्वरी रुग्णालयात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं वर्षभरात ८८ क्षयरुग्णांचं निदान करण्यात आलं आहे. Qure AI या कंपनीनं हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. यामध्ये रुग्णाच्या फुफ्फुसाचं क्ष-किरण चित्र Qure AI च्या सॉफ्टवेअरवर अपलोड केल्यानंतर, रुग्णाचा अहवाल काही सेकंदात डॉक्टरांना त्यांच्या मोबाईल ॲपवर मिळतो, त्यामुळे पुढील उपचार तसंच आवश्यक त्या चाचण्या घेण्यासाठीचा निर्णय लगेच घेता येतो. मात्र, या तंत्रज्ञानाचा रोगनिदानात उत्तम वापर होत असला तरी हे तंत्रज्ञान डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही, असं या रुग्णालयाचे प्रशासक डॉक्टर अश्विन राघमवर यांनी स्पष्ट केलं आहे.

****

छत्रपती संभाजी नगर इथल्या एमजीएम बहुविधाच्या संचालक स्नेहलता दत्ता यांचं आज सकाळी निधन झालं, त्या ८४ वर्षांच्या होत्या. एमजीएम महागामीच्या संचालक गुरु पार्वती दत्ता यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह एमजीएम हॉस्पिटल इथं दान करण्यात आला.

****

No comments:

Post a Comment