Saturday, 26 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.04.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 April 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ परत पाठवण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना निर्देश-महाराष्ट्र सरकारकडून परतीसाठी ४८ तासांची अंतिम मुदत-त्यानंतर कारवाईचा इशारा

·      शहरी परिवहन सेवेत आमुलाग्र बदलासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करु नये-सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना ताकीद

·      इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभुषण डॉक्टर के कस्तुरीरंगन यांचं निधन

आणि

·      राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेला प्रारंभ-मराठवाड्यात २८ ते ३० एप्रिलदरम्यान आयोजन

****

सर्व राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तत्काळ परत पाठवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. ते काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.

दरम्यान, महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत आपल्या देशात परत जावं, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. जे लोक या मुदतीनंतरही परत जाणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला, ते म्हणाले..

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

नागरिकांच्या 'इज ऑफ लिव्हिंग'साठी शहरी परिवहन सेवेमध्ये आमुलाग्र बदलाची आवश्यकता असून, त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत याबाबतच्या बैठकीत बोलत होते. याबाबत अंतिम निर्णयापूर्वी जनतेच्या सूचना आणि हरकती घेण्याचंही मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं. या प्राधिकरणात सर्व महानगरपालिकांचे महापौर तसंच आयुक्तांच्या समावेशाची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यांनी काल मुंबईत इंडिया ऑडिओ परिषद आणि पुरस्कार समारंभाला संबोधित केलं. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आकाशवाणी कटीबद्ध असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करु नये अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली आहे. यापुढे स्वातंत्र्य सैनिकांबद्दल असं वक्तव्य केलं तर स्वतःहून कारवाईचा इशारा न्यायालयानं दिला आहे. यापुढे अशी वक्तव्य करणार नाही, असं आश्वासन राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाला दिलं. त्यानंतर न्यायालयानं गांधी यांना बजावलेल्या समन्सला स्थगिती दिली.

****

देशभरात आज ४७ ठिकाणी १५ व्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ५१ हजारापेक्षा अधिक तरुणांना नियुक्तीपत्रं प्रदान केली जातील.

दरम्यान, पंतप्रधान उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२१ वा भाग असेल.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभुषण डॉक्टर के कस्तुरीरंगन यांचं काल बेंगळुरु इथे निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु, कर्नाटक माहिती आयोगाचे अध्यक्ष तसंच बेंगळुरु इथल्या नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ ॲडवान्स्ड स्टडीज चे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. २००३ ते २००९ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

****

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिव देहावर आज इटलीत रोम इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात दुखवटा पाळण्यात येत आहे.

दरम्यान, पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल दोन दिवसांच्या व्हॅटिकन सिटी दौऱ्यावर दाखल झाल्या. पोप फ्रान्सिस यांचं २१ एप्रिलला व्हॅटिकन सिटीत निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते.

****

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेला कालपासून प्रारंभ झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतून ही रथयात्रा सुरू झाली. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला येत्या १ मे रोजी ६५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मुंबईत होणाऱ्या महाराष्ट्र महोत्सवासाठी राज्यभरातून हुतात्मा स्मारक, तीर्थस्थळं तसंच गडकिल्ल्यांची माती आणि नद्यांचं पाणी आणलं जाणार आहे.

मराठवाड्यातील ही यात्रा २८ एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथून सुरु होऊन ३० एप्रिलला छत्रपती संभाजीनगर इथं पोहोचणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.

****

भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियानांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रबुद्ध नागरिक संमेलन घेण्यात आलं. भाजपचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, खासदार डॉ भागवत कराड आणि ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हा देश टिकवून समृद्ध करायचा असेल, तर बाबासाहेबांच्या विचारांशिवाय पर्याय नसल्याचं प्रतिपादन डॉ कांबळे यांनी केलं, ते म्हणाले…

बाईट - ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे

****

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयनं आंतरराष्टीय क्रिकेट समितीकडे भारत आणि पाकिस्तानला कोणत्याही स्पर्धेत एकाच गटात ठेवू नये, अशी मागणी केली आहे. मात्र दोन्ही संघ उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पोहोचले तर ती वेगळी बाब असेल, असं बीसीसीआयने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

****

पहलगाम हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना भारताच्या शेअर बाजारानं प्रत्येकी ४ लाख रुपये असे एकूण १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चंदन यांनी ही माहिती दिली.

****

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड इथं काल बंद पाळण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. लातूर इथंही काल बंद पाळण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या या बंदला लातूरकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला. दरम्यान, हिंगोली इथं आज बंद पुकारण्यात आला आहे.

****

बीड इथे मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. तीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात विविध खेळांसह योगासन तसंच कराटे प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

****

भगवान परशुराम जयंती येत्या २९ तारखेला साजरी होत आहे. या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर इथे पाच दिवस विविध कार्यक्रम होत आहेत, यामध्ये धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबीर, तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा, आरोग्य शिबिर, तसंच शोभायात्रेचा समावेश आहे.

****

नांदेड जिल्ह्यात येत्या १ मे पासून ३० सप्टेंबरपर्यंत 'कंपोस्ट खड्डा भरून आपलं गाव स्वच्छ ठेवू' हे अभियान राबवण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने काल जागतिक हिवताप दिन पाळण्यात आला. यानिमित्ताने शहरातून जनजागृती फेरी, हिवताप प्रदर्शन, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचााऱ्यांचा सत्कार आदी कार्यक्रम घेण्यात आले. यासोबतच हिवताप निर्मुलनाबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.

****

बीड पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत पोलीस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बडतर्फ केलं आहे. नागरगोजे हे परभणी इथं नियुक्त असतांना त्यांनी बीडच्या तत्कालीन पोलीस अधिक्षकांना शिवीगाळ केली होती. तसंच सातत्याने बराच काळ ते कर्तव्यावर येत नव्हते, या सर्व प्रकरणाची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.

****

धाराशिव तालुक्यातील वाघोली इथे काल शेतकरी, गावकरी तसंच शाळकरी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा करण्यात आला. यावेळी धाराशिव पाटबंधारे मंडळचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी पाणीवापर संस्थेच्या सर्व सभासदांसह उपस्थितांना जलसंवर्धनाचं महत्त्व पटवून दिलं.

****

हवामान

राज्यात काल सर्वाधिक ४५ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक चार अंश, धाराशिव ४२, बीड ४३ तर परभणी इथं ४३ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, मराठवाड्यात आज उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment