Friday, 2 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देशात सर्जनशील अर्थव्यवस्थेचा उदय-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन, पहिल्या वेव्हज परिषदेला मुंबईत सुरुवात

·      राज्याचा ६६वा स्थापना दिन काल सर्वत्र उत्साहात साजरा

·      सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय, तसंच पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाचा गौरव

आणि

·      मराठवाड्यात उन्हाचा जोर वाढला, परभणीत ४३ पूर्णांक सात अंश तापमानाची नोंद

****

देशात सध्या ऑरेंज इकॉनॉमी अर्थात सर्जनशील अर्थव्यवस्थेचा उदय होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ अर्थात ‘वेव्ह्ज’ परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही तर त्यासाठी संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावं लागेल, असं पंतप्रधान म्हणाले. क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातली ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करून, जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचं केंद्र बनवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

वेव्ह्ज हे फक्त एका परिषदेचं संक्षिप्त नाव नाही, तर खरोखर एक सांस्कृतिकतेची, सर्जनशीलतेची, जागतिक स्तरावर परस्परसंबंधांची लाट आहे, असं ते म्हणाले,

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वेव्ह्ज परिषदेमुळे देशातल्या आशय निर्मात्यांना जगभरातल्या गुंतवणूकदारांशी संपर्क निर्माण करण्याची संधी मिळत असल्याचं, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी - आय आय सी टी मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली.

सुमारे ५०० एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतली चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यातल्या १२० एकरमध्ये माध्यम आणि करमणूक शहर उभारण्यात येऊन यात अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं ते म्हणाले.

वेव्ह्ज ही केवळ एक परिषद नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एक चळवळ असल्याची प्रतिक्रिया अभिनेता शाहरुख यांनी दिली आहे.

****

महाराष्ट्र राज्याचा ६६वा स्थापना दिन काल सर्वत्र उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले.

मुंबईत दादर परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा चौक इथल्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र, निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचं, ते यावेळी म्हणाले.

****

मराठवाड्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला.

छत्रपती संभाजीनगर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या विकासात, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचं मोठं योगदान असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले.

बाईट - पालकमंत्री संजय शिरसाट

****

हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करत असून, जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु, असं ते म्हणाले.

****

धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. यानिमित्ताने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं, तसंच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस, शिक्षण, कृषी तसंच विविध नैपुण्य प्राप्त व्यक्ती, संस्थांचा गौरव केला.

****

परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असून, कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा या सर्व बाबींवर प्राधान्याने लक्ष देऊन जिल्ह्याचा विकास केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्या म्हणाल्या,

बाईट - पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

****

लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. सांस्कृतिक, वाणिज्य, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात लातूर जिल्ह्याने भरारी घेतली असून, दळणवळण सुविधा वाढवण्यासाठी लातूरच्या विमानतळ विकास कामाला गती दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

बीड इथं राज्याचे उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, तर नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते, तर परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरु इन्द्र मणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. गेल्या शंभर दिवसात सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे साध्य केल्याची माहिती त्यांनी दिली. या शंभर दिवसांच्या मूल्यमापनात महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या राज्यातल्या शासकीय कार्यालयात सर्वोत्तम जिल्हाधिकारी या श्रेणीत नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं पाचवा क्रमांक पटकावला. तर, सर्वोत्कृष्ट पोलीस महानिरीक्षक गटात नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने दुसरा क्रमांक मिळवला आहे.

****

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ करू, या मोहिमेचा शुभारंभ काल पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाला. ३० सप्टेंबर पर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

दरम्यान, शिरसाट यांच्या हस्ते काल संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान वर्ष २०२३ - २४ च्या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. सोयगाव तालुक्यातल्या जरंडी ग्रामपंचायतीला प्रथम, कन्नड तालुक्यातल्या नादरपुर ग्रामपंचायतीला द्वितीय, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या दुधड ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचं उद्घाटनही काल झालं.

****

बीड जिल्ह्यातही काल कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू, या अभियानाला सुरुवात झाली. घनकचरा आणि सांडपाणी या उपक्रमात निर्माण झालेल्या सुविधांचा वापर होण्याकरता ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेविषयक वर्तणुकीत बदल घडवून आणणं, सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करून वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचं महत्व पटवून देण, हा या अभियानाचा उद्देश आहे.

****

लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्याच्या रोहिणा गावात अंमली पदार्थाचा कारखाना उघडकीस आला होता. मात्र इथे बनवल्या गेलेल्या अंमली पदार्थांची व्याप्ती ही लातूर शहर किंवा जिल्ह्यात कुठेच नसल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलं आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थ किंवा गुटखा यावर येत्या काळातही पोलीस कठोर कायदेशीर कारवाई करतील असं त्यांनी सांगितलं.

****

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी यांना २०२३ चे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार दोन्ही खेळाडूंच्या समर्पणाचं आणि अनन्यसाधारण कामगिरीचं प्रतीक आहे, असं मांडवीय यांनी म्हटलं आहे.

****

हवामान

राज्यात काल सर्वात जास्त ४५ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. धाराशिव इथं ४२, छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक चार, तर परभणीत ४३ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या आठवड्यात हवामान कोरडं राहणार असून, शनिवारी छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment