Thursday, 17 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17 जूलै २०२५ रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      स्वच्छता हा देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जाणिवेचा मुख्य पैलू-स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन-इंदूर सलग आठव्या वर्षी देशातलं सर्वात स्वच्छ शहर

·      महाराष्ट्रात नवी मुंबईसह अनेक शहरांचा विविध श्रेणीत सन्मान

·      राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्रं सुरू करण्याचा निर्णय

·      विधानसभेत अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत विरोधकांचा सभात्याग

आणि

·      विकसित महाराष्ट्र २०४७ सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी व्हावं-छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन

****

स्वच्छता हा देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जाणिवेचा मुख्य पैलू असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज २०२४-२५ या वर्षासाठी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छता ही भारतीयांच्या मूळ स्वभावातच असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. त्या म्हणाल्या

बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या स्पर्धेत मध्यप्रदेशातल्या इंदूरने सलग आठव्या वर्षी देशातलं सर्वात स्वच्छ शहर असण्याचा बहुमान कायम राखला आहे. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात इंदूरला पहिल्या क्रमांकाचा, सुरतला दुसऱ्या क्रमांकाचा, तर नवी मुंबईला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध श्रेणींमध्ये एकूण ७८ पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तीन ते १० लाख लोकसंख्येच्या ‘स्वच्छ शहर’ श्रेणीत मीरा-भाईंदर शहराला गौरवण्यात आलं. या क्रमवारीत पुण्याने देशात आठवा तर राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

नवी मुंबईला नवीकरणासाठी, चंद्रपूरला नागरिकांच्या प्रतिसादासाठी गौरवण्यात आलं आहे. लोणावळी, पाचगणी, पन्हाळा, विटा, सासवड, देवळाली, प्रवरा आदी गावांनाही विविध श्रेणीत सन्मानित करण्यात आलं आहे.

****

देशातील दहा लाख नागरिकांना एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेचं प्रशिक्षण विनाशुल्क देण्याची घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. ते नवी दिल्ली इथं ‘सामान्य सेवा दिवस-डिजिटल भारताची दहा वर्षे’ या कार्यक्रमात बोलत होते. डिजिटल भारत ही संकल्पना आणि त्याचे लाभ घराघरापर्यंत पोचवण्यासाठी सामान्य सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी गौरव केला.

****

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे, विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्रं सुरू केली जाणार आहेत. सध्या काही जिल्ह्यात अशी केंद्रं सुरू असून, २३ जिल्ह्यांमध्ये पुढील पाच वर्षांत स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अकॅडमिक करिअर- राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था केंद्रं तसंच २८ नवीन तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. विधीमंडळाच्या दोन्ही सदनात माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज ही घोषणा केली. सध्या सहा ठिकाणी ही केंद्रं सुरू असून नांदेड, अकोला तसंच परभणी या तीन जिल्ह्यात अशी केंद्रं सुरू करण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

एक जानेवारी २०२५ पूर्वीच्या एक हजार चौरस फुटांवरील जमिनींना आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

राज्यात कृत्रिम वाळू धोरण तसंच गौण खनिज चोरीविरुद्ध कठोर कारवाईसाठी नवीन कार्यपद्धती तयार करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

****

जे शेतकरी सौर पंपासाठी कोटेशन भरणा करतात त्यांना १२० दिवसाच्या आत त्यांना जोडणी देत असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. विधानसभेत राहुल पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या. या संदर्भात अधिक माहिती देतांना बोर्डीकर म्हणाल्या

बाईट - ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

****

राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात दुय्यम निरीक्षकांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के सैनिकांमधून केली जाईल, असं पवार यांनी सांगितलं.

****

ओबीसी आरक्षणासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. येत्या चार महिन्यांत या निवडणुका होतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. ते आज विधानसभेत बोलत होते. शिंदे यांच्या उत्तरावर राइट टू रिप्लाय करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. या मुद्यावरून झालेल्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं.

****

राज्य सरकारच्या श्रीमंत राजे मल्हारराव होळकर विद्यार्थी विकास योजनेत छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात गैर व्यवहार होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी दानवे यांनी सदनात केली.

****

राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नेते हनिट्रॅपमध्ये अडकले असून संवेदनशील, गोपनीय माहिती बाहेर गेली आहे. याबाबत सरकार गंभीर असून यावर कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. मात्र सरकार या प्रकरणी दिशाभूल करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. यावर झालेल्या गदारोळानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

दरम्यान, सदनाबाहेर माध्यमांशी बोलतांना सदनात अध्यक्ष प्रश्न विचारू देत नसल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. चर्चेविना विधेयकं संमत करून घेतली जात असून, अध्यक्षांची वागणूक राज्याच्या उज्ज्वल परंपरेला साजेशी नसल्याची टीका महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली. आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलतांना, आपण सदनात मांडलेल्या अनेक मुद्यांवर योग्य उत्तर दिलं गेलं नसल्याचं सांगितलं.

****

विकसित महाराष्ट्र २०४७ हे सर्वेक्षण सुरू झालं आहे. देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होत असतांना, आपलं राज्य आणि पर्यायाने देशाचा विकास कसा असायला हवा, यासंदर्भातलं हे सर्वेक्षण आहे. या सर्वेक्षणात नागरिकांनी सहभाग घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.

बाईट - दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

****

परभणी इथं शिवाजी महाविद्यालयात आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत सोहळा पार पडला. विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या उपस्थितीत यावेळी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं वाळू उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून संबंधित कंपनीला ५६ कोटींहून अधिक दंड ठोठावला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत लक्षवेधी मांडली होती.

****

राज्य परिचारिका संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आज परभणी तसंच लातूरसह राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आलं. संघटनेच्या मागण्यांची दखल न घेतल्यास उद्यापासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा संघटनेनं दिला आहे. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफीसह विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बहुजन विकास अभियानाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणी येत्या २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात कालच्या मुसळधार पावसामुळे खरिपातल्या शेती पिकांचं नुकसान झालं. अनेक ठिकाणचे नाले, नद्या दुथडी भरून वाहत असून काही पुलांचंही नुकसान झालं आहे.

****

हवामान

मराठवाड्यात येत्या २४ तासांत अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी सध्या ७८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

****

No comments:

Post a Comment