Monday, 21 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ-पंतप्रधानांकडून सर्व सदस्यांना सुसंवादाचं आवाहन

·      विरोधकांच्या गदारोळामुळे वारंवार व्यत्ययानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

·      मुंबई उपनगरी रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व १२ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

आणि

·      छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या महिला सक्षमीकरण उपक्रमांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याकडून समाधान व्यक्त

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सार्थक आणि सकारात्मक चर्चेतून भारतीय लोकशाही अधिक सशक्त होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. यंदाचं पावसाळी अधिवेशन हे आपल्या सामुहिक यशोगाथेचा उत्सव असल्याचं सांगत, पंतप्रधानांनी सर्व सदस्यांना उत्तम संवाद साधण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

 

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल सरकारने निवेदन देण्याची मागणी केली. विरोधकांनी रितसर मागणी करावी, सरकार ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देईल, असं अध्यक्षांनी सांगितलं.

बाईट - लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला

 

यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं अध्यक्षांनी सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी सुरुच होती. सरकार चर्चेसाठी तयार आहे, मात्र नियोजित कामकाजही होणं आवश्यक असल्याचं, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं.

बाईट - संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू

 

त्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.

****

विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. संसद भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. सभागृहात केवळ मंत्र्यांनाच बोलण्याची परवानगी आहे, विरोधी पक्षाच्या सदस्यांना नाही असं ते म्हणाले.

****

राज्यसभेत आज नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी जैन यांचा यात समावेश आहे.

सदनाचं कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम २६७ अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूरला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला, त्यामुळे याबद्दल सरकारने सविस्तर माहिती द्यावी, असं खरगे म्हणाले.

सरकार पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा करण्यास आणि देशाला माहिती देण्यास तयार आहे, असं सभागृह नेते जे पी नड्डा यांनी सांगितलं. मात्र या उत्तरावर विरोधकांचं समाधान न झाल्यानं सदनात गदारोळ सुरू झाला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाजही १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

****

अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून, प्राथमिक अहवालही सादर झाला असल्याचं, नागरी उड्डयन मंत्री के राममोहन नायडू यांनी आज राज्यसभेत सांगितलं. ते आज प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देत होते. खासदार अशोक चव्हाण, फौजिया खान, यांनीही यासंदर्भात उपप्रश्न विचारले.

****

मुंबई विमानतळावर आज एअर इंडियाचं कोचीहून आलेलं विमान मुसळधार पावसामुळे धावपट्टीवर उतरतांना घसरलं. सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी विमानातून सुखरूप बाहेर पडल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने सर्व १२ आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. सत्र न्यायालयाने या १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ आणि आरोपींकडून हस्तगत केलेलं साहित्य तसंच, कबुलीजबाब या तिन्ही पातळीवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं न्यायाधीश अनिल किलोर आणि न्यायाधीश श्याम चांडक यांच्या पीठाने या निकालावेळी स्पष्ट केलं.

मुंबईत ११ जुलै २००६ रोजी उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले, यामध्ये १८९ जण मृत्युमुखी पडले, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज काही महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागी युवकांच्या अभ्यासक्रमासंदर्भात पवईच्या भारतीय प्रौद्योगिक संस्थेसोबत सामंजस्य करार झाला. डिजिटल गव्हर्नन्ससाठी ‘समग्र’ संस्थेसोबत माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने सामंजस्य करार केला. राज्य शासनाच्या चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पुण्याची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था यांच्यात आज सामंजस्य करार झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनामार्फत राबवल्या जात असलेल्या महिला सक्षमीकरण उपक्रमांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हे उपक्रम राज्य तसंच देशस्तरावर राबवण्याची बाब विचाराधीन असल्याचं रहाटकर यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘स्वप्न तुझे माझे’ च्या विवाहपूर्व संवाद केंद्राची रहाटकर यांनी आज पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश विजया रहाटकर यांनी दिले.

****

पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर परतीच्या मार्गावर असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज जालना शहरात आगमन झालं. ही पालखी आज आणि उद्या जालना शहरात मुक्कामी थांबून परवा पहाटे शेगावकडे मार्गस्थ होणार आहे.

****

संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथं आज कामिका एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली, नरसी इथं नामदेवांचे दर्शन घेतल्यावरच, आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी पूर्ण होते, अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतरही वारकऱ्यांची वारी पूर्ण होत नाही. वारीला पूर्णत्व येण्यासाठी परतवारी करावी लागते. त्यासाठी प्रतीपंढरपूर अशी ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथे आज कामिका एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी संत नामदेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पहाटे अडीच वाजता शासकीय पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासूनच भाविक संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन वारीला पूर्णत्व देत आहेत.

आकाशवाणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली

****

दलित वस्ती सुधारणा ही विकासाची नव्हे, तर सामाजिक न्यायाची बाब असल्याचं, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात धारासुर इथं दलित वस्ती सभामंडपाचं भूमिपूजन गुट्टे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या मतदारसंघातील सर्व गावातल्या दलित वस्तींमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत असल्याचं गुट्टे यांनी सांगितलं.

****

बीड शहरातील नागरी समस्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज आंदोलन करण्यात आलं. समस्यांसदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिलं. रस्त्यावरील एका खड्ड्याचं आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री असं नामकरण केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुती म्हणून लढवणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. ते आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोअत होते. लातूर इथं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या मारहाणीप्रकरणी पक्षाचा पदाधिकारी सूरज चव्हाण याला बडतर्फ करण्यात आल्याचं तटकरे यांनी सांगितलं.

****

हवामान

कोकण, मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment