Friday, 1 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      भारतीय वस्तूंवर अमेरिकनं जाहीर केलेल्या आयात शुल्काच्या परिणामांची तपासणी करत असल्याची सरकारची माहिती

·      मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व सात आरोपींची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

·      राज्य मंत्रिमंडळात खातेबदल- दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी, तर माणिकराव कोकाटेंना क्रीडा, युवक कल्याण खात्याची जबाबदारी

आणि

·      जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यावर; जलपूजनानंतर विसर्गाला सुरुवात

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने ५७४ किलोमीटर लांबीचे चार बहुमार्गिका रेल्वे प्रकल्प मंजूर केले आहेत. हे प्रकल्प महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंडमधल्या १३ जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. यामुळे मराठवाड्याची दिल्ली, मुंबई आणि दक्षिण भारताशी जलद कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल. जालना ड्राय पोर्ट, दिनागाव आणि दौलताबाद गुड्स शेडशी देखील थेट जोडणी स्थापित केली जाईल, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले:

बाईट – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 

या प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत सुमारे ११ हजार १६९ कोटी रुपये असून, हे प्रकल्प २०२८-२९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. याशिवाय इटारसी - नागपूर दरम्यान सुमारे साडे पाच हजार कोटी रुपये खर्च करुन चौथा रेल्वे मार्ग उभारण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी सुमारे साडे सहा हजार कोटी रुपये आणि 'नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रीमंडळानं घेतला आहे.

****

सरकार भारतीय वस्तूंवर अमेरिकनं जाहीर केलेल्या २५ टक्के कर आकारणीच्या परिणामांची तपासणी करत असल्याचं, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. काल लोकसभेत यासंदर्भात निवेदन देताना ते म्हणाले,

 

बाईट - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल

भारत आता जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे आणि काही वर्षांतच देश जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.

****

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींची काल विशेष एनआयए न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. सुमारे १७ वर्षे चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. आरोपींमध्ये माजी भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा समावेश आहे. सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर न केल्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत असल्याचं विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी आपल्या निकालात नमूद केलं.

२००८ मध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं हा बॉम्बस्फोट झाला होता. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

या प्रकरणातल्या १२ आरोपींपैकी ३ जणांची यापूर्वीच निर्दोष सुटका झाली होती. तर दोन आरोपींवर फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

****

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाचं भारतीय जनता पक्षानं स्वागत केलं आहे. या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद कधीच भगवा नव्हता आणि नसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. न्यायाला उशीर झाला हे खरं असलं तरी सत्य कधीच पराभूत होत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर मालेगाव प्रकरणातलं सत्य बाहेर आलं असून आता काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

****

काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात असून, दहशतवाद्याला शिक्षा झालीच पाहिजे, असं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं ते माध्यमांशी बोलत होते. मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं, तसं मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरही होईल का हे सरकारने स्पष्ट करावं, असं सपकाळ म्हणाले.

****

मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याचा कार्यभार काढून टाकण्यात आला असून, दत्तात्रय भरणे यांच्याकडे हे खातं सोपवण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून काल याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. तर, मंत्री भरणे यांच्याकडील क्रीडा, युवक कल्याण आणि औकाफ ही खाती माणिकराव कोकाटे यांना देण्यात आली आहेत.

****

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार संबंधित मतदार संघांमधल्या मतदान यंत्रांच्या चाचण्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र छेडछाडीपासून सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं, असं निवडणूक आयोगानं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. याबाबत दहा उमेदवारांकडून तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी आठ अर्जदारांच्या उपस्थितीत चाचण्या घेण्यात आल्या, तर दोन अर्जदार उपस्थित राहिले नाहीत. यात दहा मतदार संघांमधल्या ४८ बॅलेट युनिटस, ३१ कंट्रोल युनिटस आणि ३१ व्हीव्हीपॅटच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचणीमध्ये मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मोजणीत कसलीही तफावत आढळली नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

****

महसूल सप्ताह आजपासून राबवण्यात येत आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी काल विभागातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून या सप्ताहात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. महसूल विभागाच्या सेवा, योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी या सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावं, असं अवाहन त्यांनी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं शास्ती से आझादी योजना महानगरपालिका हद्दीतल्या सर्व मालमत्तांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून १५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण थकबाकी एकरकमी भरणाऱ्या महानगरपालिका हद्दितल्या सर्व मालमत्तांना ९५ टक्के शास्ती माफी लागू होणार आहे. शास्ती माफीसाठी महानगरपालिकेनं लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना सर्वांचं मत लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं, यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी यांनी काल समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काल मुंबईत झालेल्या या सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे उपस्थित होते.

****

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने बीड शहर पोलीस ठाण्यात काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्यासह एकूण ३१ जणांनी रक्तदान केलं.

****

नीती आयोगाच्या वतीने जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबवलेल्या संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने ६ निर्देशांकांपैकी ४ निर्देशांक शंभर टक्के पूर्ण करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीसाठी राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा नागपूर इथं उद्या सन्मान करण्यात येणार आहे.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रातले सहायक पुस्तकालय आणि सूचना अधिकारी शिवाजी काथवटे ३४ वर्षाच्या सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले. १९७६ पासूनचं दुर्मिळ आणि ऐतिहासिक ध्वनिमुद्रण जतन करून ठेवण्यात काथवटे यांची महत्त्वाची भूमिका आहे. यात मराठवाडा मुक्तिसंग्रामातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती आणि आठवणी, नरहर कुरुंदकर, पंडित बिरजू महाराज, व्यंकटेश माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, शिवाजी सावंत यांच्या मुलाखती आणि सादरीकरण यांचा समावेश आहे.

****

पैठण इथल्या जायकवाडी प्रकल्पावरील नाथसागर इथं आज जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. धरणातला पाणीसाठा ९२ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे. धरणाच्या १८ दरवाजातून नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरु करण्यात आला असून, प्रशासनानं नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

****

No comments:

Post a Comment