Friday, 22 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप, ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक राज्यसभेत मंजूर

·      अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काला इष्टापत्ती समजून कार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

·      शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी महसूल विभागाकडून अभ्यासगटाची स्थापना

·      नांदेड आणि जालना जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी

आणि

·      मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर ओसरला, जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजांतून विसर्ग सुरु

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. दोन्ही सदनांचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. २१ जुलैपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात लोकसभेत ३७ तास कामकाज झालं, यादरम्यान एकूण १४ विधेयकं सादर झाली, त्यातली १२ मंजूर करण्यात आली.

राज्यसभेत या अधिवेशनात ४१ तास आणि १५ मिनिटं म्हणजे सुमारे ३९ टक्के कामकाज झालं. या दरम्यान १४ शासकीय विधेयकं मंजूर झाली. दोन्ही सदनात ऑपरेशन सिंदूरवरही चर्चा झाली.

****

राज्यसभेनं एकशे तिसावं घटना दुरुस्ती विधेयक २०२५, केंद्रशासीत प्रदेश सुधारणा विधेयक २०२५ आणि जम्मू काश्मीर पुनर्स्थापना विधेयक २०२५ ही तीन विधेयकं संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यास काल मंजुरी दिली. ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक २०२५ काल राज्यसभेनं संमत केलं. संसदेच्या संमतीनंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्यात रुपांतरित होईल.

धाराशिव जिल्ह्यातल्या बावी गावचे सरपंच इंद्रजीत मनसुके यांनी या विधेयकाचं स्वागत करत, तरुणांनी व्यसन लावणाऱ्या खेळांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...

बाईट - सरपंच इंद्रजीत मनसुके

****

उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया या विरोधी आघाडीचे उमेदवार, माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांनी परवाच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आज छाननी होणार असून, २५ ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येईल. तर नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.

****

अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता इष्टापत्ती समजावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत जागतिक आयात निर्यात धोरणाबाबतच्या बैठकीत बोलत होते. व्यापार सुलभता धोरण सरकारनं आखलं असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन करण्यासह विविध सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

****

केंद्र शासनाच्या अमृत अभियान तसंच नगरोत्थान महाभियानातल्या पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास, संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगर विकास विभागाने यासंदर्भात तरतुदी करून, शासन निर्णय काल जारी केला. यामुळे अमृत-दोन आणि नगरोत्थान योजनांच्या प्रकल्पांची गती वाढून, कामात अधिक पारदर्शकता येणार आहे.

****

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना ऑगस्ट महिन्याचं वेतन, यंदा २६ तारखेलाच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अर्थ मंत्रालयानं काल याबाबतचा शासन निर्णय जारी केला. महाराष्ट्र वित्त नियम १९६१ मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित वेतन आणि निवृत्तीवेतनाची तरतूद तत्काळ करण्याचे आदेश संबंधित कोषागारे, लेखा आणि कोषालय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

****

पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. याबाबतचं राजपत्र लवकरच जारी होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

****

शेत रस्ते तसंच पाणंद रस्त्यांचं मजबुतीकरण करण्याच्या उद्देशाने एक अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. महसूल विभागाचे मुख्य अपर सचिव या अभ्यासगटाचं नेतृत्व करतील. हा अभ्यासगट शेत आणि पाणंद रस्त्यांच्या सध्याच्या योजनांचा सखोल अभ्यास करेल. विशेषतः नागपूर, अमरावती आणि लातूर जिल्ह्यांमध्ये राबवलेल्या योजनांचं विश्लेषण करून हा अभ्यासगट त्यात सुधारणा सुचवणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं प्रसारण आणि चुकीच्या व्यापार पद्धतींसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण- CCPA नं एका रॅपिडो वाहन सेवा कंपनीला १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. ग्राहकांची दिशाभूल करणारी ही जाहिरात तत्काळ बंद करावी, तसंच या जाहिरातीला भुलून ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे, त्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याचे निर्देशही प्राधिकरणाने दिले.

****

पोळ्याचा सण आज साजरा होत आहे. वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या सणाच्या पार्श्वभूमीवर काल ठिकठिकाणच्या नद्या आणि जलाशयांवर बैलांच्या खांदेमळणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बैलांची रंगरंगोटी करण्यासाठी तसंच सजावटीच्या साहित्याने ग्रामीण भागातल्या बाजारपेठा फुलून गेल्याचं दिसून येत आहे.

****

शेतकऱ्याचं आपल्या बैलावर जेवढं प्रेम असतं, त्यापेक्षा काकणभर जास्त प्रेम बैल आपल्या मालकावर करत असतो. मालकाने केलेल्या प्रेमाची बैलाने परतफेड केल्याचं, एक अनोखं उदाहरण, सोलापूर जिल्ह्यात पहायला मिळतं. मोहोळ तालुक्यातल्या वाळूज इथले शेतकरी इंद्रसेन मोटे यांच्या घरच्या गायीला झालेल्या, सोन्या बैलाचे दोन्ही डोळे, कर्करोग झाल्यामुळे काढावे लागले. डोळे नसल्याने निरुपयोगी झालेला हा बैल, कसायाला विकून टाकण्याचा, अनेकांनी दिलेला सल्ला धुडकावून लावत, इंद्रसेन मोटे यांनी या बैलाला आयुष्यभर सांभाळण्याचा निर्णय घेतला. पण सोन्या बैलाने मालकाच्या या ऋणातून उतराई होण्याचा जणू मनोमन निर्धार केला, आणि गेली पंधरा वर्ष, हा दृष्टीहीन बैल, आपल्या जोडीदारांच्या साथीने मालकाच्या शेतात राबतोय. मालकावर भार न होता, मालकाचा आधार झालेल्या सोन्या बैलाची ही कहाणी...

बाईट - शेतकरी इंद्रसेन मोटे

****

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. मे महिन्यात झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

****

गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यात सव्वातीन लाख शेतकरी प्रभावित झाले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले..

बाईट - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

****

जालना जिल्ह्यात सलग पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बदनापूर तालुक्यातल्या गेवराई बाजार, गोकुळवाडी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी निरीक्षणं नोंदवली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात ५७ हजार ७२५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणाच्या १८ दरवाजातून ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरु आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागानं केलं आहे. धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर गेला आहे.

उजनी धरणातून सध्या सुमारे दीड लाख दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपूर इथं भीमा नदी काठावरील १३७ कुटुंबाना सुरक्ष‍ितस्थळी हलवण्यात आलं आहे.

****

हवामान

राज्यात कोकणातल्या काही भागात तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यांतल्या घाट भागात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा तसंच विदर्भात पावसाचा जोर ओसरला असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचा पहिला मृद्गंध पुरस्कार लेखिका संध्या सोळंके-शिंदे यांना जाहीर झाला आहे. २३ आणि २४ ऑगस्ट रोजी अंबाजोगाई तालुक्यातल्या भावठाणा इथं होणाऱ्या दुसऱ्या मृद्गंध ग्रामीण साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संध्या शेळके यांचं ‘मधली सुट्टी’ हे पुस्तक राज्याच्या सर्व शाळांमधल्या ग्रंथालयात शैक्षणिक मंडळाने वितरीत केलं आहे.

****

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या तळेगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल २५ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलं. विजय शिंदे असं त्याचं नाव असून, कंत्राटदाराचं देयक अदा करण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.

**** 

No comments:

Post a Comment