Sunday, 26 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date -  26 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

भारताचं राष्ट्रगीत वंदे मातरम्’. या गीताच्या पहिल्याच शब्दानं आपला उर भरून येतो. वंदे मातरम्या एका शब्दात अनेक भावना सामावलेल्या असून यातून ऊर्जा निर्माण होते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आपल्या मन की बातकार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधत होते. हे गीत आपल्याला भारतमातेच्या वात्सल्याची अनुभूति देतं. तसंच आपल्याला भारतमातेचे पूत्र म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतं. कठीण काळात तर 'वंदे मातरम्'चा उद्घोष भारतीयांना ऐक्याच्या उर्जेनं भारून टाकतो, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. वंदे मातरम्राष्ट्रगीत यावर्षी ७ नोव्हेंबरला १५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी याबद्दल गौरवोद्गार काढले.

ते म्हणाले

7 नवंबर को हम ‘वन्दे मातरम्’ के 150वें वर्ष के उत्सव में प्रवेश करने वाले हैं| 1896 में गुरुदेव रवीन्द्रनाथ टैगोर ने पहली बार इसे गाया था| हमें ‘वन्दे मातरम्’ के 150वें वर्ष को भी यादगार बनाना है| आने वाले समय में ‘वन्दे मातरम्’ से जुड़े कई कार्यक्रम होंगे| मैं चाहूँगा, हम सब देशवासी ‘वन्दे मातरम्’ के गौरवगान के लिए स्वत: स्फूर्त भावना से भी प्रयास करें| आप मुझे अपने सुझाव #VandeMatram150 के साथ जरूर भेजिए| मुझे आपके सुझावों का इंतजार रहेगा|

 

 

मन की बात मध्ये बोलताना त्यांनी छठ पूजेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. भारतीय प्राचीन भाषा संस्कृतबाबतही त्यांनी यावेळी गौरवोद्गार काढले. येत्या ३१ ऑक्टोबरला साजरा होणाऱ्या देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जंयतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्यालाही उजाळा दिला.

****

अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा अनंत भालेराव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर, निळू दामले आणि अरविंद वैद्य यांना जाहीर झाला आहे. नऊ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं निवृत्त न्यायमूर्ती सुनील देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य, पत्रकारिता, संस्कृती, कला आणि सामाजिक कार्य यासारख्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी आणीबाणी: काल आज आणि उद्याया विषयावर संपादक विनोद शिरसाठ यांचे व्याख्यान होणार आहे.

****

जालना शहरातल्या ४२ झोपडपट्टी भागातल्या रहिवाशांना मालमत्ता पत्रक देण्यात येणार आहे. यासाठी काल पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते चंदनझिरा भागातून सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सर्वेक्षणानंतर शहरातल्या सर्वच झोपडपट्टी भागातल्या रहिवासियांना पीआर कार्ड देण्यात येणार आहे.

****

महिला बचतगट आणि स्टार्टअप अंतर्गत महिलांच्या उद्योग व्यवसायाला नाबार्ड आणि रिझर्व बँकेकडून अर्थसहाय्य केलं जाणार आहे. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी ही माहिती दिली. पूर्णा इथं श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. यावेळी पाच महिला बचत गटांना ५० लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले.

****

नांदेड जिल्ह्यात माहूर इथं आजपासून दोन दिवसीय राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन घेण्यात येत आहे. आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यात पाणी समस्या, विषमुक्त शेती व गोसंवर्धन, वन्यजीव संवर्धनाचे वास्तव यासारख्या विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.

****

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारताचा आज बांगलादेशसोबत सामना होणार आहे. दरम्यान, भारतानं उपांत्य फेरीत या पूर्वीच प्रवेश केला असून, मालिकेतला दुसरा उपांत्य सामना येत्या ३० तारखेला नवी मुंबईत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे.

****

सातारा जिल्ह्यात फलटण उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात वडवणी इथं जाऊन भेट घेतली. दरम्यान, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही आत्महत्याग्रस्त महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसंच या प्रकरणाची निःष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत काल धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात निपाणी इथं शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी यंत्रे आणि अवजारे यांचं वितरण करण्यात आलं.

****

No comments:

Post a Comment