Thursday, 6 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

·      राज्य सरकारचा स्टारलिंकसोबत करार, दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल-मुख्यमंत्र्यांना विश्वास

·      सरकारनं तात्काळ कर्जमाफी द्यावी- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी, मराठवाडा दौऱ्यात साधला शेतकऱ्यांशी संवाद

आणि

·      वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्या नवी दिल्लीत कार्यक्रम, राज्यातही विविध ठिकाणी होणार सामुहिक गायन 

****

राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकानं काल पाहणी केली. बीड जिल्ह्यात बीड, शिरूर कासार आणि आष्टी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांचा या पथकानं दौरा केला. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ४४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यात ११ तालुक्यांमध्ये पिकांसह जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसंच पशुधन आणि घरांनाही मोठा फटका बसला आहे.  त्यामुळे सरसकट नुकसानभरपाईची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यातल्या खासगाव आणि वागेगव्हाण या गावातही केंद्रीय पथकाने पाहणी करुन नुकसानीचा आढावा घेतला. वागेगव्हाण इथल्या नुकसान झालेल्या शेतीची आणि घराची या पथकाने पाहणी केली, तसंच सीना नदीच्या काठावरून पुरबाधित ग्रामस्थांकडून पुरपरिस्थितीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यावेळी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात बडकबाळ आणि हत्तूर आणि उत्तर सोलापूरच्या तिऱ्हे आणि शिवणी या गावांना भेट देऊन शेती, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा केंद्रीय पथकानं आढावा घेतला.

अहिल्यानगर जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं काल अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या विविध भागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतले तीनही पक्ष आपापल्या स्तरावर युती संदर्भात निर्णय घेतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीत जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात काल सामंजस्य करार झाला. या करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. स्टारलिंकशी करार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र शासन आणि स्टारलिंक मिळून राज्यातल्या दुर्गम आणि अल्पसेवित भागांना जोडण्यासाठी कार्य करतील. यात आदिवासी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, आपत्ती नियंत्रण कक्ष, वन चौक्या, किनारी क्षेत्र, तसंच गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.

****

 

 

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा कालपासून सुरु झाला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या नांदरा इथं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपण मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. महायुती सरकारनं शेतकरी, व्यापारी, नागरिकांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईच्या पॅकेजचं आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यांनी ते आश्वासन पाळलं नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यात पाली इथं शेतकऱ्यांची भेट घेतली. शासनानं तत्काळ कर्जमुक्ती करावी अन्यथा शेतकरी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही ठाकरे यांनी दिला. ते म्हणाले,

बाईट – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

****

'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताला उद्या दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं यानिमित्त आयोजित केलेल्या स्मरणोत्सवाचं उद्घाटन उद्या नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सात नोव्हेंबर २०२५ ते सात नोव्हेंबर २०२६ दरम्यान या उत्सव साजरा केला जाणार आहे. यासोबतच देशभरात अनेक ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात ‘वंदे मातरम’ चं सामुहिक गायन करण्यात येणार असून, मंत्री अतुल सावे यांनी काल या कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.

नांदेड शहरात श्री गुरू ग्रंथसाहिबजी भवन तहसील कार्यालय जवळ "वंदे मातरम्" गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा होणार आहे.

****

शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू, गुरु नानक देव यांची जयंती काल उत्साहात साजरी झाली. यानिमित्त राज्यातल्या विविध गुरुद्वारांमध्ये लंगर, भजन, कीर्तन असे विविध कार्यक्रम पार पडले. नांदेडमधल्या श्री सचखंड गुरुद्वारा इथं हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. याठिकाणी काल अखंड पाठाची समाप्ती करण्यात आली. परभणी शहरात सिंधी समाज बांधवांच्या वतीने श्री गुरुनानक देव यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

****

कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमाही काल सर्वत्र श्रद्धापूर्वक पारंपरिक पद्धतीने साजरी झाली. विविध मंदीरांमध्ये दीपोत्सव पार पडला.

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या १२ नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या २६९ सदस्यांसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असून, आगामी काळातही प्रशिक्षण, बैठका घेणार असल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं.

बाईट - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

****

जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर आहे. अंतिम मतदार यादी सहा डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती महानगरपालिकेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरातल्या विविध विकासकामांसाठी, जिल्हा वार्षिक योजनेतून जवळपास १२ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागाने तीन प्रमुख योजनांच्या या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, नागरी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे.

****

रब्बी पेरणीसाठी अतिरिक्त मदत म्हणून धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी ५७७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या मदतीसाठी जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या विविध क्षेत्राच्या विकासासाठी विविध कंपन्या, कारखाने आणि बँकांनी पुढे येण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी संमेलनात ते काल बोलत होते. जिल्ह्याचा शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आणि पर्यावरणीय विकास घडवून आणण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी करून आपलं योगदान द्यावं, असं त्यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात हर्सूल इथल्या हरसिद्धी मातेच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली. यात्रेनिमित्त शहागंज चौराह इथून निघालेली पालखी, संपूर्ण हर्सूल गावात फिरवून परत मंदिरात दाखल झाली. या यात्रेच्या निमित्ताने हरसिद्धी माता मंदिर परिसरात आज कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात कपिलधार इथं संत शिरोमणी श्री मन्मथस्वामींच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली. आज सायंकाळी चार वाजता शासकीय महापूजा होणार आहे. यानिमित्त २० दिंड्या याठिकाणी दाखल झाल्या आहेत.

****

धाराशिव जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईन पथकाला यश आलं. एकुरगा इथल्या १७ वर्षीय आणि जहागीरदार वाडी इथल्या १६ वर्षीय बालिकांचे विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, तसंच पालकांचं समुपदेशन करण्यात आलं. 

****

No comments:

Post a Comment