Sunday, 9 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      संसदेचं हिवाळी अधिवेशन एक डिसेंबरपासून सुरू होणार

·      स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रमुख प्रचारकांची संख्या दुप्पट

·      शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्य सरकार प्रयत्नशील-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      लातूर जिल्ह्यात “सहकार संकुल” उभारणीसाठी प्रशासकीय तसंच वित्तीय मान्यता

·      सायबर फसवणूक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक

आणि

·      भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका २-१ नं जिंकली

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं विधायक चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा, राज्य निवडणूक आयोगाने दुप्पट केली आहे. पूर्वीच्या २० ऐवजी आता ४० प्रमुख प्रचारकांना निवडणूक प्रचारात उतरता येणार आहे. गेल्या महिन्यात आयोगाच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ही मागणी केली होती. सर्व राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोली जिल्ह्यात अहेरी इथं महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण तसंच सिरोंचा इथं मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवेचा अधिकार असून, गडचिरोलीतही शेवटच्या नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचल्याने, जिल्ह्याचं चित्र बदलत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

गडचिरोली हा जिल्हा देशाचं स्टील हब असून, इथं पाच कोटी झाडं लावून वृक्ष आच्छादन वाढवायचं आहे, जल, जमीन आणि संवर्धन करुन विकास साधण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

बाहेरच्या पक्षातून येणाऱ्यांना आता आपल्या पक्षात प्रवेश मिळणार नाही, असं माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. जुन्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात पाटोदा माव इथं शेतकरी संवाद मेळाव्यातही ठाकरे सहभागी झाले होते. स्वत:चा पक्ष जे आत्मनिर्भर करू शकत नाहीत, ते काय भारताला आत्मनिर्भर करणार, अशी टीका त्यांनी यावेळी केली. जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरकारने केलेली मदत अतियश तोकडी आणि तुटपुंजी असून, सरकार शेतकऱ्याची चेष्टा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

****

मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभरात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात असून, या सर्व जमीन व्यवहाराची श्वेतपत्रिका काढावी आणि हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा करावी अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यात कोरेगाव पार्क इथल्या जमीन व्यवहारावरून त्यांनी सरकारवर टीका केली. हा गैरव्यवहार उघड झाल्यावर तो रद्द करण्यात आला, मात्र दोषींवर काहीही कारवाई केली नाही अशी टीका ही सपकाळ यांनी केली.

****

लातूर जिल्ह्यात “सहकार संकुल” उभारणीसाठी प्रशासकीय तसंच वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी २५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, लातूर शहरातल्या डालडा फॅक्टरीच्या जागेवर हे संकूल उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सहकार विभागाची अकरा प्रादेशिक कार्यालयं एकाच छताखाली येणार असुन, यामुळे सहकार विभागाचं कामकाज अधिक सुलभ आणि कार्यक्षम होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

****

नाशिक-त्र्यंबकेश्वर इथं २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक विभागानं सूक्ष्म नियोजन करून विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिले आहेत. नाशिक इथं विभागीय आयुक्त कार्यालयात काल याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ॲप, पोर्टल तसंच विविध डिजिटल माध्यमांद्वारे मुलभूत सुविधांची माहिती कुंभमेळ्यापूर्वीच नागरिकांपर्यंत पोहोचवावी. भाविकांना योग्य त्या सोयी सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. विविध यंत्रणांच्या कामांचा मुख्य सचिवांनी यावेळी आढावा घेतला.

****

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातले पदवीधर मतदारसंघ, तसंच पुणे आणि अमरावती विभागातल्या शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २५ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. १० डिसेंबरपर्यंत नागरिकांना या यादीविषयी दावे आणि हरकती सादर करता येतील. ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

****

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सायबर फसवणूक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला अटक केली आहे. प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या या टोळीने आतापर्यंत सुमारे ८४ कोटी रुपयांची फसवणूक केली असून, यासाठी देशभरात विविध बँकांची तब्बल ८८६ खाती वापरल्याचं तपासात निष्पत्र झालं आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्ट पोर्टलवर दाखल झालेल्या सुमारे ४०० तक्रारींचा छडाही यामुळे लागला आहे. या कारवाईत ५२ मोबाईल फोन, सात लॅपटॉप, ९९ डेबिट कार्ड, ६४ पासबुक आणि टाटा सफारी स्टॉर्म कार असा एकूण १८ लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीतील बहुतांश आरोपी छत्तीसगड, बिहार तसंच दिल्ली इथले असून, महाराष्ट्रात तळ ठोकून ते देशभरात फसवणूक करत असल्याचं तपासात समोर आलं आहे.

****

ऑस्ट्रेलियात झालेली पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका भारताने दोन - एक अशी जिंकली आहे. मालिकेतल्या पहिल्या सामन्याप्रमाणेच कालचा अखेरचा पाचवा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या नाबाद ५२ धावा झाल्या असतांना, पावसामुळे खेळ थांबवावा लागला, तो पुन्हा सुरू होऊ शकला नाही. अभिषेक शर्मा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

राज्य शासनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार काल जाहीर झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगीता मालकर आणि सवित्रा गायकवाड तसंच चंद्रपूर जिल्ह्यातल्या नीता पंत, जागृती फाटक आणि विधीज्ञ क्षमा बासरकर-धर्मपुरीवार यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गेल्या चार वर्षांसाठीचे हे पुरस्कार जाहीर झाले.

****

धाराशिव जिल्ह्याच्या पालक सचिव अंशू सिन्हा यांनी काल धाराशिव इथं विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतली. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून कोणताही बाधित वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. आकांक्षित जिल्ह्याची ओळख मिटवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्प आणि विविध विकासकामे मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश सिन्हा यांनी दिले.

****

अतिवृष्टीबाधितांना अनुदान वाटपाची गती वाढवण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणीनुसार अनुदान देण्याची सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मराठवाड्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. विभागात आतापर्यंत सदर मदत वाटपाचं काम ५० टक्के झालं आहे.

दरम्यान, ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात विशेष शिबीराचं आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. त्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्र आज रविवारीही सुरू ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

नगरपरिषद तसंच नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या तयारीचा स्वामी यांनी काल एका बैठकीत आढावाही घेतला.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नाट्यगृहात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

****

राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढत आहे. काल जळगाव इथं सर्वात कमी १० पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल महाबळेश्वर इथं १३ अंश तर नाशिक तसंच अमरावती इथं साडे तेरा अंश तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथंही साडे तेरा अंश, छत्रपती संभाजीनगर इथं १४ पूर्णांक दोन अंश, तर परभणी इथं १४ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या इतर भागातही तापमानात मोठी घट झाल्याचं हवामान विभागाच्या अहवालातून दिसून येत आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या काही प्रवासी गाड्यांमध्ये कायमस्वरूपी जनरल डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नांदेड - मनमाड, पूर्णा - आदिलाबाद, परळी-आदिलाबाद, परळी-अकोला तसंच पूर्णा-परळी या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना आता १२ ऐवजी १६ डबे असतील.

****

हवामान 

येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील.

****

No comments:

Post a Comment