Friday, 14 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची दणदणीत बहुमताकडे वाटचाल

·      भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र दालनाचं उदय सामंत यांच्याहस्ते उद्घाटन

·      खरडलेल्या शेतजमिनीसाठी आवश्यक गौण खनिज मोफत पुरवण्याचा राज्य सरकारचा निर्णय 

·      ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईत राहत्या घरी वार्धक्याने निधन

आणि

·      कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावांवर संपुष्टात

****

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएची दणदणीत बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या कलांनुसार विधानसभेच्या २४३ जागांपैकी २०० हून अधिक जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत ३५ जागा जिंकल्या असून, ५५ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. संयुक्त जनता दलाने २४ जागांवर विजय तर ५९ जागांवर आघाडी, लोक जनशक्ती पार्टीने दोन जागांवर विजय मिळवला असून त्यांचे १७ उमेदवार आघाडीवर आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीचे उमेदवार अवघ्या ३२ जागांवरून आघाडीवर असून, यामध्ये राजदने सहा जागा जिंकल्या असून २० जागांवर आघाडी मिळवली आहे, तर काँग्रेस पक्षाला एका जागेवर विजय मिळाला असून, पाच जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

इतर पक्षांमध्ये मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन-एमआयम पक्षानं चार जागा जिंकल्या असून, एका जागेवर आघाडी मिळवली आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला एकही जागा मिळवता आलेली नाही.

****

दरम्यान, या विजयाबद्दल एनडीएच्या नेत्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत.

हा सुशासनाचा विजय असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा जनादेश आपल्याला जनता जनार्दनाची सेवा करण्याची तसंच नव्या संकल्पांसह काम करण्याची शक्ती देणारा असल्याचं, पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विजयाबद्दल एनडीएच्या सर्व घटक पक्षांचं अभिनंदन केलं आहे.

 

बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या विजयाबद्दल छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भाजपकडून जल्लोष करण्यात आला. जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद इथं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल-ताशांच्या गजरात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.  

****

राज्यातील स्टार्टअप्स, बचत गट आणि एक जिल्हा एक उत्पादनअंतर्गत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ तसच छोट्या उद्योगांच्या व्यापारवाढीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचं, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं, ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन सामंत यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे दालन राज्याच्या विकासाला नव्या दिशा देईल, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला. सामंत यांनी दालनातील सहभागी सर्व स्टॉलची पाहणी करून स्टॉलधारकांशी संवाद साधत, त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली.

****

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने नागपूर इथं येत्या २८ नोव्हेंबरपासून सचिवालयाचं कामकाज सुरू होत आहे. त्यादृष्टीने निवास आणि कार्यालयीन व्यवस्थेसंदर्भातील सर्व कामं तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना विधानमंडळाचे सचिव डॉ. विलास आठवले यांनी दिल्या आहेत. नागपूर इथं अधिवेशन व्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या       

****

अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेली शेतजमीन पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, आदी मोफत पुरवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. महसूल विभागाने याबाबतचं परिपत्रक आज जारी केलं. यासाठली माती, गाळ, मुरूम, आदी गौण खनिजांवरील स्वामित्वधन माफीच्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्य़ांना दिले आहेत. पाच ब्रास गौण खनिजाच्या वापरासाठी स्वामित्वधनातून सूट मिळेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्य सरकारने नेमलेल्या त्रिभाषा समितीची आज पुणे विभागाची बैठक पार पडली. शिक्षणाधिकाऱ्यांसह कलाकार, कलावंत, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, सर्वसामान्य पालकांनी या बैठकीत सहभाग घेतला.

****

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर पंडित नेहरू यांना अभिवादन केलं. नवी दिल्लीतल्या शांतिवन या नेहरुंच्या समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी आदरांजली अर्पण केली.

 

आजचा दिवस ‘बाल दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, त्या निमित्त आज देशभर विविध उपक्रम पार पडले. राष्ट्रपती भवनातल्या कल्चरल सेंटरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध शाळा आणि संस्थांमधल्या बालकांशी संवाद साधला. साहित्य अकादमीचे -बाल साहित्य पुरस्कार आज नवी दिल्ली इथं प्रदान केले जात आहेत. मराठी बालसाहित्य श्रेणीत सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला यंदा गौरवण्यात येत आहे.

 

मुंबईत राजभवन इथं राज्यपालांचे सचिव, अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पंडित नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. 

****

छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र हिंदी विद्यालयात पंडित नेहरु यांना अभिवादन करण्यात आलं. अनंत भालेराव विद्या मंदिर माध्यमिक शाळेत पंडित नेहरू तसंच अनंतराव भालेराव यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

****

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईतल्या त्यांच्या घरी वार्धक्याने निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत

२४ फेब्रुवारी १९२७ रोजी लाहौर इथं जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी १९४६ साली प्रदर्शित झालेल्या नीचा नगर या चित्रपटापासून आपल्या सिने कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता. त्यानंतर १९४८ साली दिलीपकुमार यांच्यासोबतचा नदिया के पार, राज कपूर यांच्यासोबतचा आग तसंच देव आनंद यांच्यासोबतच्या शायर या चित्रपटापासून ते २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमीर खान यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटापर्यंत विविध भूमिका साकारल्या. नव्वदच्या दशकांत त्यांनी दूरदर्शनवरून लहान मुलांसाठी चांदसितारे या कळसुत्री बाहुल्यांच्या कथामालिकेसह खेलखिलौने, चंदामामा, हरी भरी फुलवारी आदी मालिकांचं सादरीकरण केलं. कामिनी कौशल यांनी मुलांसाठी लिहिलेल्या कथा अनेक बालमासिकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. कामिनी कौशल यांच्या निधनामुळे अभिनय क्षेत्रातल्या एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

****

कोलकाता इथं इडन गार्डनमध्ये आजपासू सुरु झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावात गुंडाळला. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदासमोर त्यांचे फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाहीत. जसप्रीत बुमराहनं अवघ्या २७ धावा देत ५ बळी घेतले. मोहमंद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला.

आजचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३७ धावा झाल्या होत्या. यशस्वी जयस्वाल १२ धावांवर तंबूत परतला, तर के एल राहुल १३ आणि वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर खेळत आहेत.

****

राज्यात उद्यापासून सोयाबीन, मूग उडिद खरेदी केंद्र सुरु होणार असून, बीड इथं २३ केंद्रांवर ही खरेदी होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत ११ हजार १४२ शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे, अशी माहीती जिल्हा मार्केटिंग अधिकारी एच. डी. भोसले यांनी दिली. शेतमाल विक्रीसाठी कागदपत्रांसह खरेदी केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

****

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या ६४ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धा नांदेड इथं येत्या १६ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. नांदेडसह परभणी जिल्ह्यातील विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होणार आहेत. रविवार १६ नोव्हेंबर रोजी अष्टविनायक कला, क्रीडा आणि सेवा प्रतिष्ठानच्या वतीने उद्रेक या नाटकाने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७ नोव्हेंबर पासून कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संपूर्ण तर शहरी लोकसंख्येतल्या जोखीमग्रस्त भागात हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. साडे चार हजार कर्मचारी तसंच साडे चारशे पर्यवेक्षक यांच्या मार्फत ही मोहीम राबवली जाणार असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात विविध भागात ९०० जनावरांना लंपी आजार झाला असून, ५८ जनावरांनाचा मृत्यू झाला आहे. या गंभीर स्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

****

No comments:

Post a Comment