Monday, 24 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं शपथग्रहण

·      शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार एकात्मिक शेतीवर भर देत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन

·      ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; मुंबईत अंत्यसंस्कार

·      पाचव्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांना आजपासून जयपूर इथं प्रारंभ

आणि

·      गुवाहाटी कसोटी क्रिकेट सामन्यात भारत ३१४ धावांनी पिछाडीवर

****

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. न्यायमूर्ती सूर्यकांत संवैधानिक, आणि दिवाणी कायदेक्षेत्रातले तज्ज्ञ असून २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायदान करत आहेत. सरन्यायाधीशपदाचा त्यांचा कार्यकाळ १५ महिन्यांचा असेल.

****

नवतरूणाईच्या माध्यमातून समाजात तसंच राजकारणात परिवर्तन शक्य असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायट नेशन्स अर्थात आय.आय.एम.यू.एन. च्या यूथ कनेक्ट या संवाद सत्रात मुख्यमंत्री आज बोलत होते. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचे ४० टक्के उमेदवार हे तरुण असतील, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. अटल सेतू, मुंबईतील सागरी किनारा मार्ग आणि मेट्रोसारखे प्रकल्प ही फक्त सुरूवात असून येत्या पाच वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापलट केला, जाईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री इंटर्नशीप योजनेमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मदत झाली, ही योजना राज्यात यशस्वी झाली, त्यामुळे इतर राज्यं सुद्धा ही योजना राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार एकात्मिक शेतीवर भर देत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आजपासून सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान संमेलनाला प्रारंभ झाला. या संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर चौहान बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात जगभरातील कृषी शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी आणि कृषी-व्यापार क्षेत्रातील नवोन्मेषकर्ते सहभागी झाले आहेत.

****

गेल्या आठवड्यात लागू झालेल्या नवीन कामगार कायद्यांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी अधिक सुविधा तसंच सुलभता प्राप्त होणार आहेत. भारतीय जनता मजदूर सेलच्या राज्य प्रदेशाध्यक्ष ज्योती सावर्डेकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली -

बाईट- ज्योती सावर्डेकर

****

सशस्त्र संघर्ष सोडून समाजाच्या मुख्य धारेत येण्याची इच्छा व्यक्त करत, नक्षली संघटनेच्या एमएमसी झोन अर्थात महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड प्रदेश समितीने १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरक्षा दलांची कारवाई स्थगित करावी अशी मागणी केली आहे. या संघटनेनं आपल्या मागणीचं पत्रक तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे जारी केलं आहे.

****

ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांचं आज दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं. ते एकोणनव्वद वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. शोले, चुपके चुपके, सीता और गीता, ड्रीम गर्ल, दी बर्निंग ट्रेन, मेरा नाम जोकर, अपने, लाईफ इन अ मेट्रो, अशा अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची अमिट छाप रसिकांच्या मनावर उमटवणारे धर्मेंद्र यांनी लोकसभेत राजस्थानातल्या बिकानेर मतदार संघाचं प्रतिनिधीत्वही केलं होतं. धर्मेंद्र यांच्या सहा दशकांच्या प्रर्दीर्घ कारकिर्दीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत

आठ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबातल्या लुधियाना जिल्ह्यात जन्मलेले धर्मसिंह देओल उर्फ धर्मेंद्र यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या एका स्पर्धेतून चित्रपट निर्मात्यांचं लक्ष वेधून घेतलं. १९६० साली दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. प्रारंभीच्या काळात दुल्हन एक रात की, बहारें फिर भी आयेगी, अनपढ, फुल और पत्थर.. अशा अनेक चित्रपटातून विविध भूमिका साकाररलेल्या धर्मेंद्र यांच्यावर चित्रीत झालेली अनेक गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली.

सत्तरच्या दशकात धर्मेंद्र यांनी अनेक ॲक्शनपटातून काम करत, हिंदी चित्रपटातली चॉकलेट हिरोची चौकट मोडून “ही मॅन” ही आपली नवी ओळख निर्माण केली. धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय केलेला “शोले” हा चित्रपट सार्वकालिक प्रसिद्ध चित्रपट म्हणून ओळखला जातो. १९९७ साली फिल्मफेयरच्या वतीने धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, तर केंद्र सरकारनेही पद्मभूषण पुरस्काराने धर्मेंद्र यांचा गौरव केलेला आहे.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्यासह मान्यवरांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. भारतीय सिनेमाच्या एका सुवर्णयुगाचा अंत झाला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात वैविध्यपूर्ण भूमिका करणारा लखलखता तारा निखळल्याची भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

पाचव्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा आजपासून राजस्थानमध्ये जयपूर इथं सुरु होत आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आणि राजस्थानचे क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या उपस्थितीत या स्पर्धांचं उद्घाट्न होत आहे. देशभरातील २३० विद्यापीठांमधील सुमारे पाच हजार खेळाडू २३ स्पर्धांमध्ये सहभागी होतील. यंदा या स्पर्धेत नौकानयन, सायकलिंग आदी स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत ३१४ धावांनी पिछाडीवर आहे. आज भारताचा पहिला डाव २०१ धावांवर संपुष्टात आला. यशस्वी जयस्वालच्या ५८ आणि वॉशिंग्टन सुंदरच्या ४८ धावा वगळता, भारताचा अन्य एकही फलंदाज समाधानकारक खेळी करू शकला नाही. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाहुण्या संघाच्या दुसऱ्या डावात बिनबाद २६ धावा झाल्या होत्या.

****

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये आज बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे विविध चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनिधीबरोबर भागीदारी केली आहे. मुलांचे प्रश्न, आव्हानं आणि संधी यांची मांडणी करण्यासाठी इफ्फीत पाच चित्रपट दाखवले जात आहेत. या महोत्सवात आज एआय हॅकेथॉन सादर होत आहे. इफ्फीच्या इतिहासात प्रथमच अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ एकत्र येऊन नावीन्यपूर्ण एआय-आधारित प्रणाली तयार करणार आहेत.

****

दिल्लीच्या भारतीय विद्यापीठ संघटनेतर्फे आयोजित ३९वा आंतरविद्यापीठ आंतरराज्यस्तरीय सेंट्रल झोन युवक महोत्सव उद्यापासून छत्रपती संभाजीनगर इथं सुरू होणार आहे. महात्मा गांधी अभिमत विद्यापीठात पुढचे तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे.

****

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तुळजापूर इथं मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत निघालेल्या या फेरीत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती बाबत घोषणा देत, फलक तसंच सेल्फी पॉईंटद्वारे मतदारांचं प्रबोधन केलं.

****

No comments:

Post a Comment