Tuesday, 2 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात २२२ नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण

·      सर्वच नगरपंचायती आणि नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला-सर्व पक्षांकडून नाराजी

·      हिवाळी अधिवेशनादरम्यान सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज बाधित

·      संचारसाथी मोबाईल ॲप ऐच्छिक असल्याचं, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून स्पष्ट

आणि

·      राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुढचे तीन दिवस थंडीची लाट

****

राज्यातल्या २२२ नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठीची मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडली. या सर्व ठिकाणचे नगराध्यक्ष तसंच सदस्य पदांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या सदस्यांचं राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं.  जालना जिल्ह्यात भोकरदन आणि परतूर इथल्या काही केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडल्याचा प्रकार घडला. मात्र, संबंधित विभागानं तातडीने तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर मतदान सुरळीत झालं.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं तीन केंद्रांवर मतदान यंत्रं बंद पडली होती, मात्र ती तत्काळ दुरुस्त करण्यात आल्यानं, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

मराठवाड्यात दुपारपर्यंत झालेल्या मतदानाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर ५५ पूर्णांक ३७ टक्के, लातूर जिल्ह्यात ५३ पूर्णांक ५९ टक्के, परभणी जिल्ह्यात ५२ टक्के, बीड ५२ पूर्णांक ६३ टक्के, धाराशिव जिल्ह्यात ५३ पूर्णांक ८६ टक्के, जालना ५४ पूर्णांक १९ टक्के, नांदेड ५३ टक्के, हिंगोली ५० पूर्णांक ८८ टक्के इतकं मतदान नोंदवलं गेलं.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या एका वयस्कर महिलेचा अकस्मात मृत्यू झाला. मतदान केंद्रावर चक्कर येऊन पडलेल्या या महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता, तिचा मृत्यू झाल्याचं याबातच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातले २४ नगराध्यक्ष आणि २०४ सदस्यांच्या जागांसाठी २० डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबरला सर्व जागांची एकत्रित मतमोजणी होऊन सर्व जागांचा निकाल एकाच वेळी जाहीर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा २० नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्यावर आजच्या सुनावणीत न्यायालयाने हे आदेश दिले.

 

न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली, अशा निर्णयांमुळे सर्वच पक्षांचे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास होत असल्याचं मत फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस

 

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात बोलतांना, न्यायालयाच्या या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला असून, याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.

****

निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषीत केला आहे. या कार्यक्रमानुसार एक नोव्हेंबर आधारीत पात्र  मतदारांची नोंदणी करण्यात येऊन मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत. या प्रारूप यादीबाबतचे आक्षेप किंवा हरकती १८ डिसेंबरपर्यंत दाखल करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे.

****

हिवाळी अधिवेशनादरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्ष सदस्यांनी मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणासह इतर मागण्यांवर चर्चा करण्याची मागणी करत हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यानंतर सभागृहाचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब झालं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत २१ हप्त्यांमध्ये ४ लाख कोटी रुपये मदत वितरित केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने सहकार क्षेत्रात अनेक परिवर्तनकारी पावलं उचलली, असं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. यानंतर घोषणाबाजी न थांबल्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेतही याच कारणासाठी विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. दुपारी दोन वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षांनी मागितलेल्या निवडणूक सुधारणांवर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम २६७ अंतर्गत एसआयआर मुद्द्यावर प्राधान्याने चर्चा करता येईल असं सांगितलं. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. सभागृहाचं पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२५ वर चर्चा झाली. मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. सगळ्या चर्चा आत्ताच झाल्या पाहिजे हा विरोधकांचा अट्टाहास योग्य नाही, तसंच नवनवीन मुद्दे शोधून संसदेच्या कामकाजात सतत अडथळा आणणं बरोबर नाही, असं मत रिजीजू यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले

बाईट – संसदीय कामकाज मंत्री रिजीजू संसद

****

संचारसाथी हे मोबाईल ॲप ऐच्छिक असल्याचं, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या मोबाईलधारकाला हे ॲप नको असेल, तर तो ते मोबाईलमधून काढून टाकू शकतो, असं शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

 

ग्राहकांना सहाय्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगतानाच, संचार साथी ॲपमुळे सुमारे पावणे दोन कोटी बोगस मोबाईल कनेक्शन खंडित केल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. चोरीला गेलेले २० लाख मोबाईल शोधण्यात या ॲपमुळे यश आल्याचं तसंच यापैकी सात लाख मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना उद्या रायपूर इथं खेळवला जाणार आहे. मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.

****

मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी विधीज्ञ सागरदास मोरे तर सचिवपदी विधीज्ञ अभय टाकसाळ यांच्यासह संपूर्ण कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

****

हिवाळी सुटीत वाढत्या प्रवासी गर्दीचं नियोजन करण्यासाठी काही विशेष रेल्वेगाड्यांना सुमारे महिनाभर मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये राजकोट-महबूबनगर-राजकोट, तसंच ओखा-मदुराई-ओखा या गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी या सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन रेल्वे विभागानं केलं आहे.

****

राज्यात खानदेश तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, धुळे, नाशिक आणि नंदूरबारसह अहिल्यानगर, पालघर तसंच पुणे जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

****

No comments:

Post a Comment