Wednesday, 24 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान- डॉ जयंत नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने गौरव

·      विकसित भारत जी राम जी योजनेसाठी केंद्र सरकारकडून एक लाख ५१ हजार कोटी रुपयांची तरतूद

·      राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एक खिडकी कक्ष सुरु

·      संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका न्यायालयात आरोपींविरुद्धचे आरोप निश्चित

·      भारतीय महिला क्रिकेट संघाचा दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात श्रीलंकेवर विजय

आणि

·      राज्यात थंडीचा जोर कायम, मराठवाड्यात सरासरी किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली

****

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा शांतिस्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम या चार श्रेणीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिवंगत शास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांना यावेळी मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयुकाचे संचालक आर. श्रीयानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राज्यात विविध संशोधन संस्थांमधल्या सहा शास्त्रज्ञांना यावेळी गौरवण्यात आलं. यामध्ये भाभा अणुशक्ती केंद्राचे डॉक्टर युसुफ मोहम्मद शेख, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतले प्राध्यापक महान एम. जे, मुंबईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्राध्यापक अनिरुद्ध पंडित, नागपूरच्या नीरीचे डॉक्टर एस. वेंकट मोहन यांना विज्ञान श्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर बेंगळुरूच्या जीवशास्त्रीय संस्थेच्या डॉक्टर दीपा आगाशे, मुंबईच्या टी आय एफ आर चे प्राध्यापक सब्यसाची मुखर्जी, तसंच पुण्यातल्या आयुकाचे प्राध्यापक सुहृद मोरे यांना विज्ञान युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

विकसित भारत जी राम जी योजनेसाठी केंद्र सरकारने एक लाख ५१ हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी काल एका व्हिडिओ संदेशातून ही माहिती दिली. पूर्वीच्या मनरेगा योजनेच्या नावाखाली नवीन योजनेबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचं चौहान यांनी म्हटलं आहे.

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान

****

देशात यावर्षी पाच कोटी  ८० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं १९ डिसेंबरपर्यंतचा पेरणी अहवाल प्रसिद्ध केला. ३०१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर गव्हाची तर, १२६ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया कालपासून सुरु झाली. छत्रपती संभाजीनगर इथं पहिल्याच दिवशी एक हजार आठशे अर्ज, जालना इथं ८०४, लातूर १४४ तर नांदेड इथं ६६३ अर्जांची विक्री झाली. मात्र काल पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही.

या प्रक्रियेत ३० डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. दोन जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल. तीन जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. आवश्यकतेनुसार १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची समीकरणं अद्याप जाहीर झालेली नाहीत.

**

मुंबईत काँग्रेसनं सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचं ठरवलं असून, याबाबत अधिकृत घोषणा आज होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. आम आदमी पक्षाने मुंबई महापालिकेसाठी ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

**

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ काल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धुळ्यात केला. याशिवाय काँग्रेसनं ४० स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली. यामध्ये खासदार इम्रान प्रतापगढी, राज बब्बर, कन्हैया कुमार, आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे.

**

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख रेणुकादास उर्फ राजू वैद्य यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैद्य यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेचे जे माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये जात आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असून, भाजपकडून आमिषं तसंच आश्वासनं मिळत असल्यामुळे हे पक्षांतर होत असल्याचा आरोप, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोग, विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया राबवणार आहे. याअंतर्गत २९ डिसेंबरपर्यंत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण होईल. तीन जानेवारीला मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल, २४ जानेवारीपर्यंत त्यावर आक्षेप नोंदवता येतील. त्यानंतर १४ फेब्रुवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल, असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे.

****

संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयाने आरोपींविरुद्धचे आरोप काल निश्चित केले. याप्रकरणी काल झालेल्या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. ते म्हणाले…

बाईट - उज्ज्वल निकम

 

या प्रकरणी आठ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत प्रत्यक्ष साक्षीदारांची उलटतपासणी आणि पुराव्यांचे काम सुरू होणार असल्याने या खटल्याला आता वेग मिळेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नागरिकांना संवेदनशील आणि गतिशीलतेने सेवा दिल्यास सुशासन निर्माण होईल, असा विश्वास, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला आहे. ते काल सुशासन सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय प्रसार कार्यशाळेत बोलत होते. निवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी साध्या आणि सोप्या पद्धतीने सुशासन कशा पद्धतीने करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं.

****

महानगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्ष तसंच उमेदवांरांना विविध परवानग्या देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं स्मार्ट सिटी कार्यालयात एक खिडकी कक्ष सुरू केला आहे. पक्ष तसंच उमेदवारांनी प्रचार फेऱ्या, बैठका, आदी आयोजनाच्या ४८ तास आधी परवानगीसाठी अर्ज करावेत, तसंच सक्षम प्राधिकाऱ्याने या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी, कोणताही अर्ज २४ तासांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवू नये, असं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.

****

निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी विविध कडक निर्बंध लागू केले आहेत. हे सर्व निर्बंध १६ जानेवारी २०२६च्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून, नागरिकांनी तसंच राजकीय पक्षांनी त्यांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेनिमित्त लोहा पंचायत समितीतर्फे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत लोहा तालुक्यातल्या रामतीर्थ इथले मल्ल, भैय्या पाटील विजयी झाले. त्यांनी परभणी जिल्ह्यातले राम तेलंग यांना नमवत हे विजेतेपद पटकावलं. भैया पाटील यांना पाच हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.

****

महिला क्रिकेटमध्ये, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी – ट्वेंटी सामन्यात भारताने सात खेळाडू राखून विजय मिळवला. विशाखापट्टणम् इथं झालेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत १२९ धावा केल्या. भारतीय महिलांनी हे लक्ष्य १२व्या षटकातच पूर्ण केलं. या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत दोन – शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

फरार उद्योजक विजय मल्ल्या भारतात कधी परत येणार, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं त्याच्या वकिलांकडे केली. मल्ल्या यानं न्यायालयात हजर राहावं, त्याशिवाय या याचिकांवर सुनावणी होणार नाही, अशी ताकीद, न्यायालयानं काल त्याच्या वकिलांना दिली. मल्ल्या यानं त्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याला न्यायालयात आव्हान दिलं आहे.

****

राज्यात काल सर्वात कमी सात पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल पुण्यात आणि नाशिक इथं सरासरी आठ, जळगाव साडे नऊ, तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि नांदेड इथं सरासरी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Post a Comment