Sunday, 28 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग, जागावाटपाबाबत महायुतीत चर्चा

·      राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल –विजय वडेट्टीवार यांची स्पष्टोक्ती

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासयांशी संवाद साधणार

·      व्हीबी जी राम जी’ हा कायदा आणून केंद्र सरकारने गरीबांच्या पोटावर पाय दिला – काँग्रेसची टीका

आणि

·      धाराशिव जिल्ह्यात मौजे केशेगाव शिवारात वीजेचा धक्का लागून चार जणांचा मृत्यू

****

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असून, लवकरच हा तिढा सुटेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल अमरावती इथं वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीतील जागावाटपाबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडत आहेत.

भाजपा आणि शिवसेनेत सध्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहे. चांगल्या पद्धतीने जागा वाटप होऊन महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपची युती होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

****

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात अखेर जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे. एकूण २०७ जागांवर निर्णय झाला असून, उर्वरित २० जागांबाबत चर्चा सुरू असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – मुंबई भाजप अध्यक्ष,अमित साटम

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शक्य तिथे वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू असून, समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप ध्रुवीकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी, राज्यात चुकीचं राजकारण होत असल्याचा आरोप केला.

****

अकोला महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत पहिली बैठक काल पार पडली. जागावाटपाचं सूत्र सुमारे ९९ टक्के निश्चित झालं आहे, मात्र १ ते २ जागांवर अद्याप तिढा कायम असून तो लवकरच होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत सोडवण्यात येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक आणि निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी काल निवडणूकपूर्व तयारीचा सखोल आढावा घेतला. निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला शहरातलं एकच मैदान, सभागृह किंवा सभास्थळ सलग आठ ते दहा दिवस आरक्षित ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. निवडणूक नियोजन, प्रचार व्यवस्थापन, मनुष्यबळ, प्रशिक्षण आणि आचारसंहिता अंमलबजावणी या सर्व बाबींचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असं आवाहनही श्रीकांत यांनी यावेळी केलं.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ हजार मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आतापर्यंत ६३९ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली असून, १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

****

सोलापूर महापालिकेसाठी काँग्रेसनं आज १० प्रभागातल्या २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने ४८ उमेदवारांची नावं जाहीर केली.

आम आदमी पक्षानं पहिल्यांदाच नवी मुंबई आणि भिवंडी महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही महापालिकेत अधिकाधिक जागा लढवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

****

भारताचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल प्रदान करण्यात आला. अमरावती इथं झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महाराष्ट्र सरकार भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या मार्गावरच सातत्याने चालत असून, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाला झपाट्याने वाव मिळत आहे. यासाठी सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन कृषी हा उपक्रम सुरू केला असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.  

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा १२९ वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, एआयआर न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, डीडी न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होणार आहे. कार्यक्रमानंतर त्याचं प्रादेशिक भाषांमधून भाषांतर प्रक्षेपित होईल.

****

मनरेगा कायद्या ऐवजी ‘व्हीबी जी राम जी’ हा कायदा आणून केंद्र सरकारने गरीबांच्या पोटावर पाय दिला असल्याची टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘जी राम जी’ विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. नवी दिल्ली इथं काल काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात ‘जी राम जी’ कायद्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे विधान केलं. कार्यकारिणीच्या बैठकीत बांग्लादेशात हिंदू अल्पसंख्यकांवरच्या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला. तसंच मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेबद्दल चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते.

****

भारतीय विमानतळ प्राधिकरण – एएआय अंतर्गत देशातल्या ६२ विमानतळांमध्ये ग्राहक समाधान सर्वेक्षण घेण्यात आलं. यामध्ये दुसऱ्या फेरीत छत्रपती संभाजीनगर विमानतळाने पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षीच्या या सर्वेक्षणात विमानतळाचा चार पूर्णांक ८७ गुणांसह १३ वा क्रमांक होता, त्यानंतर यावर्षी विमानतळ प्रशासनाने हे यश मिळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या साक्षळपिंपरी इथं भारतीय कापूस महामंडळ – सीसीआय मार्फत खरेदी केंद्र सुरु होणार आहे. सध्या कापूस विक्रीचा हंगाम सुरू असताना शिरूर, आष्टी, पाटोदा आणि बीड तालुक्यांतल्या शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी ५० ते ६० किलोमीटर अंतरावर जावं लागत होतं, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तसंच वेळेची मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. ही बाब शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत पवार यांनी खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या मौजे केशेगाव शिवारात वीजेचा धक्का लागून चार जणांचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास शेतकरी गणपती साखरे यांच्या शेतातील बोअरमधील मोटार काढण्याचं काम सुरू असताना कप्पीचा महावितरणच्या जिवंत विद्युत तारेस स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली.

****

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथं रेणुकादेवीचं दर्शन घेण्यासाठी नाताळच्या सुट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढली आहे. २० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं. दररोज रात्री साडे आठ वाजता मंदिर बंद होतं, मात्र गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या साडे नऊवाजेपर्यंत दर्शन सुरू असल्यानं आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीनं रांगेतील शेवटच्या भाविकाला दर्शन होईपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

****

शीख धर्माचे दहावे गुरू श्री गुरू गोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात धावणी मोहल्ला गुरुद्वारामध्ये काल अखंड पाठ समाप्ती झाली. विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. यानिमित्त धावणी मोहल्यातून काल मिरवणूक काढण्यात आली. 

****

No comments:

Post a Comment