Wednesday, 15 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 15 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून, काही वेळापूर्वी त्यांचं विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. नागपूर एम्सच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात २१० विद्यार्थ्यांना पदवी आणि सुवर्ण पदकं प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय महसूल सेवेच्या ७८ व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या समारोप सोहळ्याला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार असून, त्यानंतर त्या सेवाग्राम इथल्या गांधी आश्रमाला भेट देतील.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. मंड्या जिल्ह्यातल्या आदि चुंचनगिरी इथं श्री गुरु भैरवैक्य मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या उपस्थितीत ‘सौंदर्य लहरी’ आणि ‘शिव महिमा स्तोत्रम’ या पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी होणार. हे मंदिर बालगंगाधरनाथ महास्वामीजी यांना समर्पित स्मारक असून, पारंपरिक द्रविडी स्थापत्य शैलीत उभारलेलं आहे.

****

संसदेचं विशेष अधिवेशन उद्यापासून सुरु होणार असून, या सत्रात नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकात दुरुस्ती केली जाणार आहे. संसदीज कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज ही माहिती दिली. या विधेयकामुळे महिलांना संसद आणि राज्य विधानसभांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण लागू होणार आहे. लोकसभेत हे विधेयक उद्या मांडल जाईल, त्यावर अठरा तास चर्चा अपेक्षित आहे, तर राज्यसभेत दहा तासांची चर्चा ठेवण्यात आली आल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.

दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला आहे.

****

अमरनाथ यात्रेसाठी आजपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. देशभरातल्या ५५४ बँक शाखांमध्ये नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. अमरनाथ यात्रा तीन जुलैपासून सुरू होऊन रक्षाबंधनाच्या दिवशी २८ ऑगस्टला समाप्त होणार आहे. श्री अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाकडून भाविकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

****

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई तसंच महाराष्ट्र अग्निशमन दल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सेवेतले अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदकं प्रदान करण्यात आली. राज्यात अग्निशमन सेवांच्या आधुनिकीकरणासाठी ६१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, हा निधी शहरी आणि ग्रामीण भागात प्रभावी अग्निसुरक्षा सेवा पुरविण्यास निश्चितच मदत करेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

****

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली चाललेल्या काळ्या बाजार प्रकरणी देवस्थान विश्वस्त तथा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे राज्य कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांना पोलिसांनी काल अटक केली. न्यायालयाने त्यांना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अवघ्या १० मिनिटांत दर्शन करून देण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक केल्या प्रकरणी अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांमार्फत व्हीआयपी दर्शनासाठी भाविकांकडून दोन ते सहा हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळ गावी त्यांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारणार असल्याची घोषणा, रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात ते काल बोलत होते. या स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

****

ग्रामीण भागातल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवण्यात येणाऱ्या 'लखपती दीदी' उपक्रमात जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. जळगाव जिल्ह्यास गेल्या आर्थिक वर्षासाठी  देण्यात आलेलं उद्दिष्ट मोठ्या फरकाने ओलांडत एक लाख सहा हजार ७८ महिलांना या योजनेत यशस्वीरित्या समाविष्ट केलं आहे. संबंधित महिलांना सुमारे ५०० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आलं असून, त्याचा उपयोग व्यवसाय उभारणी आणि विस्तारासाठी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment