Wednesday, 29 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी एक मे पासून विशेष मोहीम राबवली जाणार

·      विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक आणि पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची घोषणा

·      राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करण्याबाबत प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

·      वाढतं तापमान आणि उष्णतेच्या लाटांपासून कामगारांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वं जारी

आणि

·      मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम, परभणीचं तापमान ४३ अंशांवर

****

मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, ही घोषणा केली. परिवहन विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठी प्रशिक्षणासाठी परिवहन विभाग एक समिती स्थापन करेल, ही समिती ज्यांना मराठीत संवाद साधता येत नाही त्यांची नोंद ठेवेल. तसंच ज्यांना मराठी शिकण्याची इच्छा आहे, त्यांना आरटीओ कार्यालयात जागा उपलब्ध करून दिली जाईल, असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

दरम्यान, अशा चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या, प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या, तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल, त्यांचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

****

पंढरपूर कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काल सोलापूर इथं भारतीय जनता पक्षाच्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक – सोलापूर – अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र शासनानं वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, बार्शी इथं प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं.

****

विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक आणि पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे काल उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये प्रज्ञा सातव, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांचा समावेश आहे. काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना त्यांच्याच रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

****

राज्याचा सर्व शिफारशींसह  स्वतंत्र बियाणे कायदा करण्याबाबत प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. नव्या कायद्यात बियाणे उत्पादक, प्रक्रिया केंद्र, वितरक, विक्रेते आणि रोपवाटिका यांची नोंदणी सक्तीची करण्याचा विचार आहे. शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणं, वापरणं, देवाणघेवाण करणं आणि ब्रँडेड नाव न वापरता विक्री करणं, यासाठी कायदेशीर संरक्षण देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात येणार आहे.

****

महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा यासाठी राज्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. समिती स्थापन न केल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड, पुनरावृत्ती झाल्यास दंडाच्या रकमेत वाढ किंवा परवाना रद्द करणं, यासारखी कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, महिला आणि बाल विकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली. एखाद्या कार्यालयामध्ये अंतर्गत समितीबाबत माहिती दर्शवणारा फलक नसल्यास महिलांनी १ ८ १  या टोल-फ्री हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

डिजिटल अटकेच्या प्रकारात सहभागी असलेल्या नऊ हजार ४०० मोबाइल क्रमांकांवर व्हॉट्सॲपनं जानेवारीपासून बंदी घातली आहे. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. रिझर्व्ह बँक, तंत्रज्ञान कंपन्या आणि केंद्रीय अन्वेषण संस्था-सीबीआय यांच्या सहकार्यानं ही कारवाई करण्यात आली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं यासंदर्भात स्वतः खटला दाखल करून घेतला होता.

****

वाढतं तापमान आणि उष्णतेच्या लाटांपासून कामगारांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत. यासंदर्भात सरकारने सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना पत्र लिहिलं आहे. कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि काम तसंच विश्रांतीसाठी थंड जागांची व्यवस्था करावी, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि कामगार कल्याण महासंचालक यांच्या अखत्यारीतील रुग्णालयं तसंच आरोग्य केंद्रांना उष्माघातावर तत्काळ उपचारासाठी मदत कक्ष स्थापन करावे, तसंच सर्व संस्थांनी याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर १५ दिवसांनी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

**

छत्रपती संभाजीनगर इथं उन्हामुळे डोकेदुखी, पोटदुखी, अतिसार, थकवा यांसह विविध तक्रारींचे दररोज चारशेहून अधिक रुग्ण आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत आहेत. यामध्ये उष्माघाताचे रुग्ण नसल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितलं. नागरिकांनी वाढत्या उन्हापासून बचाव करावा, आणि उष्माघाताची लक्षणं दिसल्यास, तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असं आवाहन धानोरकर यांनी केलं आहे.

**

गेल्या २४ तासात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय तर मराठवाड्यात किंचित वाढ झाली आहे. राज्यात काल सर्वाधिक तापमान अमरावती इथं ४६ पूर्णांक ६ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक पाच, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव इथं सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

****

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. गेल्या वर्षात, अधिसूचित सेवांसाठी प्राप्त झालेल्या अर्जापैकी ९१ पूर्णांक ४० टक्के अर्जांचा विहित कालावधीत निपटारा केल्याब‌द्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा काल मुंबईत द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला.

**

धाराशिव इथं सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा वेळेत, पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांना यावेळी गौरविण्यात आलं.

**

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन काल साजरा झाला. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी उपस्थितांना सेवेच्या बांधिलकीची शपथ देत, “लोकसेवा हीच खरी जबाबदारी” असल्याचा संदेश दिला. प्राप्त अर्जांपैकी ९० टक्क्यांहून अधिक अर्जांचा वेळेत निपटारा करणाऱ्या दहा अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

**

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिनानिमित्त, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नूतनीकरण करण्यात आलेल्या आदर्श सेतू केंद्राचं अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय दाखले तसंच प्रमाणपत्रांचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आलं.

****

धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा काल नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. वसुली संदर्भात शासनाने खास नागरिकांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या अभय योजनेचा कालावधी वाढवणं, पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावं यासाठी उपाययोजना करणं तसंच वाहनतळासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्णय यावेळी घेण्यात आले.

****

जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यात घर सूचीकरण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवण्यात येणार असून नागरिकांसाठी स्व-गणना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परवा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत se.census.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी काटेकोर नियोजनासह स्व-गणना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज राहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या बदनापूरच्या माजी आमदार शंकुतलादेवी नंदकिशोर शर्मा यांचं काल अल्पशा आजाराने निधन झालं, त्या ७३ वर्षांच्या होत्या. १९८० मध्ये त्यांना बदनापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती. कॉंग्रेस पक्षाकडून त्यांनी जालना पालिकेची निवडणूकही लढवली होती.

****

No comments:

Post a Comment