Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 May
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
मराठा आरक्षणाच्या
संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक – मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
·
सरकारसोबत झालेल्या
सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित
·
कापसावरील आयात
शुल्क आणखी पाच महिन्यांसाठी माफ
·
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज ‘मन की बात’ मधून देशवासियांशी संवाद साधणार
·
सिंगापूर खुल्या
बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताची सात्विक –चिराग जोडी अंतिम फेरीत दाखल
आणि
·
आयपीएल स्पर्धेचा
अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार
****
मराठा आरक्षणाच्या
संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन
निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी कालपासून
अंतरवाली सराटी इथं सुरु केलेलं उपोषण मध्यरात्री स्थगित केलं. सरकारच्या शिष्टमंडळासोबत
झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या
हस्ते पाणी पिऊन जरांगे यांनी उपोषण सोडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मंत्री
पाटील यांनीही समाज माध्यमावरुन ही माहिती दिली.
दिलेल्या इशाऱ्यानुसार
जरांगे हे रस्त्यालगत बाज टाकून भर उन्हात उपोषणाला बसले होते. मराठा-कुणबी मंत्रालय
सुरू करा, सातारा संस्थानचा जीआर काढा,
गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या, आदी मागण्या त्यांनी केल्या
आहेत.
मंत्री राधाकृष्ण
विखे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांबाबतचा मसुदा सादर केला. येत्या मंगळवारपर्यंत
शासन आदेश काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं सांगितलं.
दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मुंबई–नागपूर समृध्दी
महामार्गावर जालना हद्दीतल्या नाव्हा परिसरात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं.
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयसमोर काही तरुणांनी भर उन्हात अर्ध नग्न होऊन जरांगे
यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. तर लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या
पळशी इथं आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं.
****
केंद्र सरकारने
कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं शुल्क पुढच्या पाच महिन्यांसाठी माफ केलं आहे. हा
नियम उद्या १ जून पासून ३० ऑक्टोबर पर्यंत लागू असेल, असं अर्थमंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या
वस्त्रोद्योगाला, विशेषतः सूक्ष्म, लघू
आणि मध्यम उद्योग क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे
पाऊल उचलल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.
****
देशाचे संरक्षण
दल प्रमुख जनरल अनिल चौहान काल ४० वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा देऊन निवृत्त झाले.
नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला.
त्यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख
म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी
संवाद साधतील. हा या मालिकेचा १३४ वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्या, एआयआर न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूजऑनएअर मोबाईल
ॲपवर प्रसारित केला जाईल.
****
केंद्रीय विद्यापीठांमधल्या
पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET-UG
मध्ये काल तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे तीन हजार ७६५ विद्यार्थ्यांना
ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करुन दिली आहे. परीक्षा
केंद्रात बायोमेट्रीक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही
असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर
करणार असल्याचं संस्थेनं सांगितलं आहे.
****
अकरावी प्रवेशासाठी
दहावीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं
तात्पुरती शिथिल केली आहे. ही कागदपत्रे अजूनपर्यंत न मिळालेल्या विद्यार्थ्यांना, ती मिळाल्यावर लगेच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित
कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो,
असंही सरकारनं कळवलं आहे.
****
पुणे भेसळयुक्त
दारू प्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस विभागातल्या नऊ आणि राज्य उत्पादन शुल्क
विभागाच्या १३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत १० जणांना
अटक करण्यात आली असून, तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, याच प्रकरणी मुंबईत भिवंडी इथल्या मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या
कंपनीवर काल धाड टाकून मिथेनॉलचा ५ हजार ९२९ किलो साठा जप्त करण्यात आला. पुणे प्रकरणातल्या
दारूमध्ये वापरण्यात आलेलं मिथेनॉल याच कंपनीकडून पुरवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात
समोर आलं आहे. या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा २१ वर पोहोचला आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं भाजप
प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या पक्ष प्रवेश
सोहळा पार पडला.
****
छत्रपती संभाजीनगरच्या
नवीन पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा नीचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आलं
आहे. सुरवातीला पाण्याचा गढूळपणा २०० एनटीयू पेक्षा अधिक होता. आता हा गढूळपणा १५ एनटीयू
पेक्षा कमी करण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पाण्याच्या अंतिम प्रयोगशाळा
चाचण्या होणार आहेत. त्यानंतर लवकरच शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे
यांनी सांगितलं.
****
राज्य मार्ग परिवहन
महामंडळाच्या बीड विभागातल्या आठ आगारातील चालक, वाहक, यांत्रिक, तसंच प्रशासकीय
कर्मचा-यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उद्या एक जून रोजी प्रतिनिधीक स्वरुपात
आगार पातळीवर सत्कार करण्यात येणार आहे. बीडच्या विभागीय कार्यालयात २५ वर्ष विनाअपघात
सेवा केल्याबद्दल सहा चालकांचा, तसंच २६० दिवस विना अपघात सेवा
करणाऱ्या ५५७ चालकांना रोख बक्षिस देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातला
पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असून, अनावश्यक इंधनाची अतिरिक्त खरेदी किंवा साठवणूक करू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या
पेट्रोल पंप संघटनेचे पदाधिकारी आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या
आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पेट्रोलियम कंपन्यांनी जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा
डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही, अशी ग्वाही दिली असून नागरिकांनी
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर
पोलीसांनी काल गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाई
दरम्यान मुख्य सुत्रधार जुबेर शफिक कुरेशी याच्यासह १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात
आले असून, पोलीसांनी १३१ गोवंशांची सुटका
केली. बकरी ईदच्या अनुषंगानं शहरात कत्तल करण्याच्या उद्देशानं मोठ्या प्रमाणावर गोवंश
डांबून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती त्या आधारे ही कारवाई
करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात
वनाच्छादित आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न
करणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी म्हटलं आहे. येत्या पावसाळ्यात
मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड कार्यक्रम राबवण्याच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत
ते बोलत होते.
****
सिंगापूर खुल्या
बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी
या जोडीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यफेरीच्या लढतीत सात्विक–चिराग
जोडीने दक्षिण कोरियाच्या जोडीचा २१-१९, २१-१८ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. याच स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य
फेरीत भारतीय जोडी ध्रुव कपिला आणि तनिशा क्रास्टो यांचं आव्हान संपुष्टात आलं.
****
इंडियन प्रिमियर
लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स
बंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी साडे सात
वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथं नालेसफाईचं काम
अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अनिल मकरिये
यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नालेसफाई कामांची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ काढण्यात आला असला तरी तो अद्याप उचलण्यात आलेला नसल्याचं
दिसून आलं.
****
राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक सात दशांश
सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४१ पूर्णांक नऊ दशांश सेल्सियस, बीड ४१ पूर्णांक पाच, छत्रपती संभाजीनगर
इथं ३९ पूर्णांक नऊ, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस
तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment