Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 April 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ एप्रिल २०२६
सायंकाळी ६.१०
****
· पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात बियाण्यांसह इंधनाचा पुरेसा
साठा – सरकारची माहिती
· सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी केंद्र सरकारची शुल्क सवलत जाहीर
· महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा
निर्णय
· एसटी महामंडळाच्या सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
आणि
· नांदेड महानगरपालिकेचा एक हजार ३०७ कोटी ७३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला
सादर
****
पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, देशात सर्व प्रकारच्या पिकांसाठी बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अतिरिक्त सचिव डॉ. मनिंदर कौर द्विवेदी यांनी
दिली. दिल्लीत झालेल्या आंतर-मंत्रालयीन बैठकीत त्या आज बोलत होत्या. देशात १८ पूर्णांक
पाच दशलक्ष क्विंटलपेक्षा जास्त खरीप पिकांचे बियाणे उपलब्ध असून, कृषी रसायनांचा पुरेसा साठा असल्याचं द्विवेदी यांनी सांगितलं.
दरम्यान, देशात कच्च्या तेलाचा पुरेसा
साठा असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी
सांगितलं. देशातले तेल शुद्धीकरण कारखाने-रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत आणि
किरकोळ विक्री केंद्रांवर इंधनाची कोणतीही कमतरता नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जागतिक
चढ-उतारांपासून नागरिकांना वाचवण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात आणि निर्यात शुल्क लागू
केले आहे. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असून नैसर्गिक गॅस नेटवर्कचाही झपाट्याने विस्तार
केला जात असल्याचं शर्मा यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या -
बाईट – सुजाता शर्मा
****
दरम्यान, पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर,
तेल विपणन कंपन्यांनी देशातल्या महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी
गॅस सिलिंडर्सचे दर वाढवले आहेत. त्यामुळे व्यावसायिक वापरासाठीचे १९ किलो वजनी सिलिंडर्स
आता दिल्लीत दोन हजार ७८ रुपये ५० पैसे, तर मुंबईत दोन हजार ३१
रुपये दराने मिळेल. घरगुती वापराच्या सिलेंडर्सच्या दरात काहीही बदल झालेला नाही.
****
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत महाराष्ट्रातल्या
रेल्वे पायाभूत सुविधांबाबत अद्ययावत माहिती दिली. फलटण–पंढरपूर नवीन रेल्वे मार्गाचं
सर्वेक्षण पूर्ण झालं असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल
तयार करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. आधुनिक रेल्वेगाड्यांची वाढती मागणी पूर्ण
करण्यासाठी,
स्वदेशी रेल्वे डबे निर्मितीची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने, भारतीय रेल्वेने लातूर इथं ‘मराठवाडा रेल कोच फॅक्टरी’ उभारली आहे. यात एका तंत्रज्ञान भागीदाराच्या मदतीने १२० वंदे भारत रेल्वे कोचची
निर्मिती हाती घेण्यात आली असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
हिंगोली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म शेल्टर उभारणीची आणि प्लॅटफॉर्म
क्रमांक दोन च्या सुधारणेची कामं पूर्ण झाली असल्याचं वैष्णव यांनी, हिंगोली जिल्ह्यातल्या रेल्वे पायाभूत सुविधांविषयीच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
****
सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी केंद्र सरकारने शुल्क
सवलत जाहीर केली आहे. ज्या युनिटने ३१ मार्चला किंवा त्याआधी उत्पादन सुरू केलं आहे, त्यांच्यासाठीच ही सलवत लागू असेल असं महसूल विभागाने म्हटलं आहे. सवलत मिळण्यासाठी
माल सेझमधल्या युनिटमधेच उत्पादित झालेला असावा तसंच त्यात २० टक्के मूल्यवर्धन झालेलं
असावं,
असंही यात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा
निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याअंतर्गत राज्यातल्या ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांमध्ये
पूनरूज्जीवन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. राज्यातल्या हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या
शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा, तसंच भूमि अभिलेख विभागात आता
भूमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद निर्मितीला देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
राज्य परिवहन महामंडळ -एसटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या
सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित
होते. या उपक्रमांतर्गत प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न स्मार्ट कार्ड वितरित करण्यात
येणार असून,
या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासातल्या सवलतींचा लाभ
अधिक सुलभतेने मिळणार आहे.
****
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती
वर्षानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. महात्मा
फुले यांची जयंती ११ एप्रिल २०२६ पासून ते १० एप्रिल २०२७ पर्यंत द्विशताब्दी जयंती
वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांची सुरूवात महात्मा जोतिराव फुले
यांच्या पुण्यातील खानवडी या मूळ गावी
असलेल्या,
जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाने करावी अशी सूचना
फडणवीस यांनी दिली.
****
भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानं रिक्त झालेल्या राहुरी
विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी
जाहीर केली आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक येत्या २३ एप्रिलला होणार आहे.
****
भोंदू बाबा अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयानं आज १४ दिवसांची
न्यायालयीन कोठडी दिली. खरातवर अनेक गुन्हे दाखल झाले असून, १४ मार्चला त्याला प्रथम अटक केली होती. या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत आज
संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. खरात याच्यावर दाखल दुसऱ्या गुन्ह्यात
त्याला अटक करण्यासाठी नाशिक पोलीस उद्या कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी
सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या अपुऱ्या बँकिंग
सुविधांचा मुद्दा खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत उपस्थित केला. या प्रश्नावर केंद्रीय
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सविस्तर माहिती देत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक गावापासून पाच किलोमीटरच्या परिसरात बँकिंग सेवा
उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचं चौधरी यांनी सांगितलं. ‘जनधन दर्शक’ ॲपच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात
सर्व वस्ती असलेली गावं बँकिंग सेवांच्या कक्षेत आल्याचा दावा करण्यात आला आहे.
****
नांदेड महानगरपालिका प्रशासनाने वर्ष २०२६-२७ साठी एक हजार ३०७
कोटी ७३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला आज सादर केला आहे. महापालिका आयुक्त
डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांना हा
अर्थसंकल्प सुपूर्द केला. वर्ष २०२५-२६ चं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक एक हजार ५२३ कोटी
रुपयांचं होतं,
त्यात विविध विभागांनी सूचवल्यानुसार ३४१ कोटी रुपयांची कपात करून सुधारित एक हजार १८२ कोटींचा अर्थसंकल्प
सादर करण्यात आला. २०२६-२७ या वर्षात एक हजार ३०७ कोटी रुपयांचं प्रस्तावित उत्पन्न
आहे. या अर्थसंकल्पात प्रशासनाकडून कोणतीही करवाढ सूचवण्यात आली नाही.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली
कामं कालबद्ध कार्यक्रम राबवून पूर्ण करावी, असे
निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भातल्या
आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात एकूण एक हजार २४४ गावांसाठी, एक हजार १६४ योजना मंजूर असून त्यापैकी ७०२ योजना पूर्ण झाल्या असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाडगाव इथल्या प्राथमिक आरोग्य
केंद्रात ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न
गाव’ या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या हस्ते झाला. हे अभियान केवळ सरकारी
उपक्रम न राहता लोकसहभागातून व्यापक आरोग्य चळवळ उभी राहावी, असा शासनाचा मानस असल्याचं धानोरकर यांनी सांगितलं.
****
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अधिकारात असणाऱ्या
वर्षातल्या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार
चालु वर्षात ३१ ऑगस्ट तिसऱ्या श्रावणी सोमवारी, १८
सप्टेंबरला ज्येष्ठगौरी पूजनानिमित्त आणि सहा नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी निमित्त जिल्ह्यात
सुटी राहणार आहे. या तीन सुट्ट्या जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयं आणि शैक्षणिक
संस्थांना लागू असतील.
****
उद्या सर्वत्र हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं भद्रा मारुती मंदीरात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या
पार्श्वभूमीवर या मार्गावरील जड वाहतूक मार्गात तीन एप्रिलपर्यंत बदल करण्यात आले आहेत.
याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जारी केले.
****