आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Sunday, 14 December 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 December
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
राज्याची अर्थव्यवस्था २०३०
पर्यंत एक ट्रिलियन डॉलर पर्यंत जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·
महायुती सरकार विदर्भाला
गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
·
अधिवेशनातून शेतकऱ्यांना
काहीही मिळाले नाही- विरोधी पक्षांची टीका
आणि
·
भारत आणि दक्षिण
आफ्रिकेदरम्यानचा तिसरा टी-ट्वेंटी सामना आज
****
देशातल्या मोठ्या राज्यांचा विचार करता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
आजही सर्व निकषांवर पात्र ठरणारी आहे. २०२९-३० पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक
ट्रिलियन डॉलरपर्यंत जाईल,
असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा
प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना नमूद केलं.
ते म्हणाले -
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्य़ा मर्यादेच्या आतच राज्य सरकारनं
कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट तीन टक्क्यांच्या आत ठेवण्यात यश आलं असल्याचं
त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षातही राजकोषीय तूट तीन टक्क्याच्या आत ठेवण्यात
यश येईल असा विश्वास व्यक्त करत, राज्य दिवाळखोरीकडे जात नसल्याचं
त्यांनी स्पष्ट केलं.
लाडकी बहीण सारख्या कल्याणकारी योजना यापुढंही सुरूच राहतील, असं
ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांत कोरोनासारखी अनेक संकंटं राज्याच्या
अर्थव्यवस्थेवर आली,
मात्र रचनात्मक कार्यातून राज्याचा विकास साधायचा आहे, यासाठी
सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, अशी
अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
वीजनिर्मिती, खनिजसंपत्ती, कृषी, वनसंपत्ती, पर्यटन, वाहतूक
आणि लॉजिस्टिक ही विदर्भाची सात मुख्य बलस्थानं असून महायुती सरकार विदर्भाला
गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे म्हणाले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या
शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देताना ते विधानपरिषदेत
बोलत होते. दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी तब्बल ५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार
केवळ विदर्भासाठी करण्यात आले असून, यामुळे मोठ्या प्रमाणात
रोजगार निर्मिती होत आहे,
असं शिंदे यांनी सांगितलं.
****
प्रश्नोत्तराच्या तासात, राज्यात विजेची स्मार्ट
मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. सामान्य
घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधानसभा सदस्य भास्कर जाधव आणि रईस शेख यांच्या
प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
****
या अधिवेशनातून, शेतकऱ्यांना आणि विदर्भातील
जनतेला काही मिळालं नाही. त्यामुळे, हे अधिवेशन वांझोटे ठरले
अशी टीका विरोधी पक्षांतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. सरकारकडून ज्या काही
घोषणा झाल्या त्या मुंबई,
ठाणे, नवी मुंबई यासाठी झाल्या पण, विदर्भासाठी
एकही घोषणा करण्यात आली नाही अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
गटनेते भास्कर जाधव यांनी यावेळी केली. विदर्भातील धान, सोयाबीन
आणि कापूस उत्पादक शेतकरी या अधिवेशनाकडे डोळे लावून बसला होता. धानाला आणि
सोयाबीनला बोनस मिळावा म्हणून आम्ही मागणी केली पण सरकारनं कारवाई केली नाही तसंच राज्यातील तरुणांना ड्रगचा विळखा आहे. पण, त्यावरही
कारवाईची ठोस भूमिका सरकारची नाही, अशी टीका काँग्रेस पक्षाचे
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील
यांनी कापूस खरेदीचे केंद्र वाढवण्याच्या केलेल्या मागणीवर निर्णय झाला नाही. तसंच, बेरोजगारीचा
प्रश्न सुटलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील
यांनी केली. विरोधी पक्षाने राज्यातील कायदा सुव्यवस्था बाबत प्रश्न उपस्थित केले
त्यावर ठोस उत्तर मिळाले नाही त्यामुळे सात दिवसात जनतेच्या पदरी निराशाच आली अशी
टीका जयंत पाटील यांनी केली.
****
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी २०२६ पासून
मुंबईतल्या विधानभवनात होईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांनी दिली.
****
ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि
विश्वसनीय स्रोत आहे,
असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज
राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनी केलं. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना
राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारानं राष्ट्रपतींनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या
कार्यक्रमात सन्मानित केलं,
त्यावेळी त्या बोलत होत्या. जगातल्या सर्वाधिक वेगानं
वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असून विकासाच्या या यात्रेत ऊर्जेची गरजही
वेगाने वाढत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं आणि ऊर्जा बचतीचं महत्त्व अधोरेखित
केलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षपदी
नितीन नबीन यांच्या निवडीची घोषणा आज पक्षातर्फे करण्यात आली. ते बिहार सरकारमध्ये
मंत्री म्हणून कार्यरत आहेत. भाजपच्या संससदीय मंडळानं ही नियुक्ती केली आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-ट्वेंटी क्रिकेट
मालिकेतला तिसरा सामना आज धरमशाला इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू
होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.
****
गोंदिया इथं काल ३ माओवाद्यांनी जिल्हा पोलीसांपुढं आत्मसमर्पण
केलं. दरेकसा एरिया कमिटीचा कमांडर रोशन, आणि सहाय्यक कमांडर सुभाष
आणि रतन या तिघांनी शस्त्रं पोलिसांच्या हवाली केली.
****
आयआयटी बॉम्बे अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई इथं
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं केंद्रीय सामाजिक
न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा कायदा मंजूर केला असून
मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं रामदास
आठवले यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतानं विश्वचषक स्क्वॅश स्पर्धेच्या अंतिम लढतीत
हाँगकाँकविरुद्ध पहिल्या सामन्यात सात – एक अशी आघाडी घेतली आहे. चेन्नई इथं सुरू
या स्पर्धेतील विजेतेपदाच्या पहिल्या लढतीत अभय सिंगनं ॲलेक्स लाऊविरुद्ध प्रारंभी सरशी मिळवली आहे.
****
१९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये, भारताने
दिलेल्या २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दुबईत शेवटच्या
वृत्तापर्यंत पाकिस्तानच्या ४० षटकांत नऊ बाद १४३ धावा झाल्या आहेत. पावसामुळे हा सामना ४९
षटकांचा करण्यात आला. भारताचा संघ ४६.१ षटकांत २४० धावांवर सर्वबाद झाला.
भारताकडून ॲरॉन जॉर्जने ८५ धावा केल्या, कनिष्क चौहानने ४६ धावांचे
योगदान दिले,
तर कर्णधार आयुष म्हात्रेने ३८ धावा केल्या. पाकिस्तानने या
सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
****
खगोलप्रेमींना आज रात्री आकाशात उल्कावर्षावाचं अद्भुत
दृष्य पाहायला मिळणार आहे. हा या वर्षातला सर्वात मोठा उल्कावर्षाव असून, रात्री
सुमारे ९ वाजल्यापासून पहाटेपर्यंत दर तासाला १०० हून अधिक उल्का पडताना दिसू
शकतात. हा उल्कावर्षाव मिथुन या तारकासमूहात होणार असल्यानं त्याला मिथुन
उल्कावर्षाव असं नाव देण्यात आलं आहे. शहरातल्या कृत्रिम उजेडापासून दूर, निरभ्र
आकाशात वायव्य दिशेला हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी पाहता येईल.
****
पंढरपूरची वारी ही अहंभाव विसरून, समभाव
निर्माण करणारी असून,
वारीतून जातमुक्त अभियान राबवलं जात असल्याचा सूर जालना
इथल्या जेईएस महाविद्यालयात, आज वारकरी संत साहित्य संमेलनातील चर्चा
सत्रात व्यक्त झाला. ‘रिंगण’चे संपादक सचिन
परब,
छायाचित्रकार संदेश भंडारे, प्रयोगशील
नाट्यकलावंत ऋचिका खोत यांनी या चर्चासत्रात भाग घेतला. यावेळी बोलतांना सचिन परब
यांनी पंढरपूरच्या वारीतील रिंगण सोहळा आणि वारीतील वारकरी मंडळीची भावना लक्षात
घेऊन आपण ‘रिंगण’
या नियतकालिकाची निर्मिती केली.
रिंगण सोहळा हा वारीतील मुख्य सोहळा असतो, हा रिंगण सोहळा
शब्दबद्ध करण्याचा आपला प्रयत्न करत आहोत असं सांगितलं.
पंढरपूर वारीचं महत्त्व हे आध्यात्मिक, सामाजिक आणि आरोग्यदायी आहे; ती
विठ्ठल भक्तीचा एक महासोहळा असून, संतांच्या शिकवणीनुसार जाती-धर्माच्या
पलीकडे जाऊन एकतेचा संदेश देते. यात वारकरी पायी चालत जाऊन मन-शरीर शुद्ध करतात, अहंभाव
विसरून समभाव वाढवतात आणि नामस्मरण आणि भक्तीनं मोक्षप्राप्तीची कामना करतात, असे
मानले जाते,
असंही परब म्हणाले.
****
लोकप्रिय फूटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा गोट इंडिया दौऱ्याचा
कार्यक्रम काल हैद्राबाद इथं झाला.
****
राज्याच्या अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे.
राज्यात काल सर्वात कमी सात अंश सेल्सियस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. त्या
खालोखाल अहिल्यानगर इथं साडे सात अंश, पुणे तसंच नाशिक इथं साडे
आठ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक सात
दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवा...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 27 April 2025 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाज...