Thursday, 30 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

·      राज्यात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचं जाळं उभारण्याचा शासनाचा निर्णय

·      बलात्कारातून गर्भधारणा झाल्यास, गर्भपातासाठी कालमर्यादा नसावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

आणि

·      ६७ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन

****

राज्य विधान परिषदेची द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. नियमित नऊ आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक, अशा दहा जागांसाठी अर्ज दहा अर्ज भरले गेल्यानं, ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपानं उमेदवारी दिलेले सुनील कर्जतकर, संजय भेंडे, विवेक कोल्हे, माधवी नाईक, आणि प्रमोद जठार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. प्रज्ञा सातव यांनीही आज भाजपाकडून पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज अर्ज भरला.

 

शिवसेनेकडून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अर्ज दाखल केले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

त्यापूर्वी बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रहार ही सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पुन्हा संधी दिली, यासंदर्भात काँग्रेस नेत्यांचं मन वळवण्यासाठी अंबादास दानवे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. त्यानंतर वेगळा उमेदवार न देण्याचा निर्णय सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. आगामी सर्व निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीमध्ये झाल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

****

राज्यात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचं जाळं उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नागपूर इथं  राज्यस्तरीय प्रयोगशाळा तर छत्रपती संभाजीनगरसह अकोला, सोलापूर, धुळे आणि मिरज इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून २९ कोटी २१ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

****

बलात्कारातून गर्भधारणा झाल्यास, गर्भपातासाठी कोणतीही कालमर्यादा नसावी, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. केंद्र सरकारनं कायद्यात आवश्यक सुधारणा करून बलात्कार पीडितांना २० आठवड्यांनंतरही गर्भपाताची परवानगी देण्याबाबत विचार करावा, असे निर्देश न्यायालयानं दिले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या पीठासमोर १५ वर्षीय पीडितेच्या ३० आठवड्यांच्या गर्भपाताबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं हे मत नोंदवलं. एम्सनं या गर्भपाताला विरोध करणारी याचिका दाखल केली होती. गर्भपाताची परवानगी नाकारल्यास पीडितेला जन्मभर मानसिक आघात सहन करावा लागेल, अनपेक्षित मातृत्व कोणावर लादलं जाऊ नये, कायदा हा प्रवाही आणि काळाशी सुसंगत असायला हवा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.  मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन केलं.

मंत्रालयात, तसंच सर्व जिल्हा मुख्यालयांमधे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी ही समाजमाध्यमावरच्या संदेशातून तुकडोजी महाराजांना आदरांजली अर्पण केली.

छत्रपती संभाजीनगर मनपा मुख्यालयात स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

बुद्ध पौर्णिमा उद्या साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. हा पवित्र दिवस भगवान बुद्धांचे पृथ्वीवरील आगमन, त्यांना मिळालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण या ऐतिहासिक घटनांचे प्रतीक आहे. त्या म्हणाल्या की, त्यांचे करुणा, अहिंसा, शांती आणि ज्ञानाचे शाश्वत संदेश संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत राहतील.

****

६७ वा महाराष्ट्र दिन उद्या साजरा होत आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.

बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी आठ वाजता पोलिस कवायत मैदानावर होणार आहे. या सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज आढावा बैठक घेतली.

लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा बाभळगाव इथल्या पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता  होणार आहे.

नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता  वजिराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर ध्वजवंदन आणि  संचलन समारंभ होणार आहे.

जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. जालना जिल्हा निर्मितीला उद्या १ मे रोजी  ४५ वर्ष पूर्ण होत आहेत,यानिमित्त आयोजित 'रायझिंग जालना' या कार्यक्रमाचे उद्घाटनही पालकमंत्री मुंडे यांच्या  हस्ते होणार आहे. अग्रसेन भवन इथं होणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी १० ते १ दरम्यान सांस्कृतिक आणि औपचारिक कार्यक्रम, तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या इतिहासाचा गौरव करत उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचा उद्देश असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे.

 

धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा होणार आहे.

 

उद्या महाराष्ट्र् दिनाला यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मिसिंग लिंक हा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे,या लिंकमुळे हा देशातला  पहिला अधिक वेगवान आणि सुरक्षित एक्सप्रेस-वे असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

****

राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचं लोकार्पण आणि मराठवाड्यातील बीडसह ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तारही उद्या केला जाणार आहे. नांदेड, धाराशिव, हिंगोली,परभणीसह भंडारा, बुलढाणा, अमरावती  या सात जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांमध्ये एमआरआय सेवा सुरू होणार आहेत.

****

 

नवव्या नेपाळ आंतरराष्ट्रीय समीक्षक चित्रपट महोत्सवामध्ये बीडच्या प्रभातकुमार होळकर याला 'भुरळ डोळ्यांची' या मराठी चित्रपटासाठी उत्कृष्ट संकलक आणि उत्कृष्ट बालकलाकार हे दोन पुरस्कार मिळाले. याच चित्रपटासाठी मीनाक्षी होळकर यांना उत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सन्मानीत करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा विहित वेळेत करण्यासाठी कालमर्यादा पाळावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले. नवीन पाणीपुरवठा योजने संदर्भात न्यायालयात उपस्थित विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने आढावा बैठक, आज पार पडली, त्यावेळी आयुक्तांनी हे निर्देश दिले. प्रकल्प कंत्राटदारांची देयके पडताळणीनंतर प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्रीकांत यांनी यावेळी केल्या.

****

नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातील करखेली शिवारात निशांत कदम याच्या शेतातून पोलिसांनी १ लाख ४३ हजार रुपये किमतीचा ७ किलो १६५ ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी कदम याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

****

नांदेड महापालिकेच्या १ हजार ४२४ कोटीं रुपयांच्या अर्थसंकल्पास आज  स्थायी समितीने मंजुरी दिली. प्रशासनाने सादर केलेल्या १३०७ कोटी रुपयांच्या प्रशासकीय अर्थसंकल्पात ११७ कोटी रुपयांची वाढ करून विशेष अर्थसंकल्पीय सभेत सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

****

सामुआ इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत १ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकं मिळवले.६९ किलो वजनी गटात बेलाना हरिका हिने १९७ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले तर कारंगी तरंगिनी भूमिका मोहिते,अभिषेक निपाणे यांनी आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं जिंकली.

****

परभणी जिल्ह्यातल्या निम्न दुधना प्रकल्पातून कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी येत्या १५ मे पासून पाणी सोडलं जाणार आहे. यंदा उन्हाळी हंगामासाठी चार पाणी पाळ्यांचं नियोजन करण्यात आलं असून, गेल्या १६ मार्च आणि १६ एप्रिलला पाणी सोडण्यात आलं होतं. मे अखेरीस हळद पिकाची लागवड करता येऊ शकते त्यामुळे या सिंचनाचा लाभ हळद पिकाला होईल, शेतकर्यांनी ऊन्हाळी पिकांसह ऊस आणि चारापिकांची लागवड करावी, असं आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केलं आहे.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत कुठल्याही परिस्थितीत दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाही, असा संदेश ऑपरेशन सिंदूर मधून जगाला दिला असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज एएनआय राष्ट्रीय सुरक्षा शिखर परिषद २.० मध्ये ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरला जवळपास एक वर्ष पूर्ण झाल्याचं सांगून त्यांनी, हे ऑपरेशन नव्या जागतिक व्यवस्थेचं प्रतीक असल्याचं नमूद केलं. दहशतवादी हल्ल्यांवर फक्त राजनैतिक प्रतिक्रिया देण्याऐवजी ठोस कारवाईचा संदेश दिला जात असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट- संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

 

दहशतवाद आणि त्याला प्रोत्साहन देणारे यांच्यात कोणताही भेद केला जाणार नाही, या सरकारच्या धोरणाचा सिंह यांनी पुनरुच्चार केला. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचं केंद्र आहे, तर भारत माहिती तंत्रज्ञानाचं केंद्र असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आपल्या सर्व शूर सैनिकांना त्यांनी यावेळी आदरांजली वाहिली. या परिषदेची संकल्पना 'एआय प्रतिबंध आणि नवी जागतिक व्यवस्था' अशी असून, हा विषय समकालीन तर आहेच, शिवाय तो भविष्यालाही आकार देईल. त्यामुळे आजचा संवाद येणाऱ्या काळासाठी एक मजबूत चौकट तयार करण्यात यशस्वी होईल, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

****

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विस्तारित श्रीनगर ते जम्मू तावी वंदे भारत रेल्वे गाडीला आज हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी आधी श्रीनगर ते कटरा अशी धावत होती, ती आता जम्मू तावीपर्यंत जाईल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावेळी उपस्थित होते. नवीन मार्गावर गाडी शनिवार पासून धावणार आहे. गाडीचे आधी आठ डबे होते, ते वाढवून वीस करण्यात आले आहेत. या विस्तारित रेल्वेमुळे जम्मू ते श्रीनगर प्रवास पाच तासांच्या आत होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

शेतकरी, मजूर, वंचित घटक तसंच दिव्यांग बांधव आणि महिलांच्या सक्षमीकरसाठी धनुष्यबाण हाती घेत असल्याची घोषणा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केली. ते आज मुंबईत बोत होते. काल मांडलेले सगळे मुद्दे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांनी स्वीकारले असून, त्यानंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं कडू यांनी सांगितलं. शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्यावर भर देणार असून, प्रहार संघटनाही कायम राहील, असं ते म्हणाले.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या निर्णयाचं शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी स्वागत केलं. कष्टकर्यांचा नेता पक्षात येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असं सामंत यांनी सांगितलं.

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार उभा करणार असल्याचा पुनरुच्चार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.

**

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे, उपस्थित होते.

****

जलसंवर्धनासाठी राज्याच्या जलसंपदा विभागामार्फत काढण्यात आलेली गोदा ते नर्मदा जलयात्रा काल मध्य प्रदेशात महेश्वर इथं पोहोचली. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून ही यात्रा निघाली होती. महाराष्ट्रातल्या १३० नद्यामधून आणलेलं पाणी मंगलमय वातावरणात मंत्रघोषाच्या जागरात नर्मदेमध्ये विसर्जित करुन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थिती या यात्रेचा समारोप झाला. गोदा ते नर्मदा यात्रेमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचं नातं अधिक दृढ झालं असल्याचं मुख्यमंत्री यादव यावेळी म्हणाले.

****

जनगणना २०२७ कार्यक्रमासाठी जनतेनं सक्रिय सहभाग घेत पूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन जनगणना कार्यसंचालन आणि नागरिक नोंदणी विभागाच्या संचालक निरुपमा डांगे यांनी केलं आहे. जनगणनेतून मिळणारी माहिती शासनाच्या विविध योजना आणि धोरण निर्मितीसाठी उपयोगी ठरणार असून, पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोळा मे ते चौदा जून दरम्यान जेव्हा प्रगणक घरोघरी येतील तेव्हा त्यांना अचूक माहिती द्यावी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना याबद्दल जागरूक करावं, एक मे ते पंधरा मे मध्ये स्वगणना प्रक्रियेतही सहकार्य करण्याचं आवाहन डांगे यांनी केलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या निम्न दुधना प्रकल्पातून कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी येत्या १५ मे पासून पाणी सोडलं जाणार आहे. यंदा उन्हाळी हंगामासाठी चार पाणी पाळ्यांचं नियोजन करण्यात आलं असून, गेल्या १६ मार्च आणि १६ एप्रिलला पाणी सोडण्यात आलं होतं. मे अखेरीस हळद पिकाची लागवड करता येऊ शकते त्यामुळे या सिंचनाचा लाभ हळद पिकाला होईल, शेतकर्यांनी ऊन्हाळी पिकांसह ऊस आणि चारापिकांची लागवड करावी, असं आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केलं.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

जनगणना २०२७ कार्यक्रमासाठी जनतेनं सक्रिय सहभाग घेत पूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन जनगणना कार्यसंचालन आणि नागरिक नोंदणी विभागाच्या संचालक निरुपमा डांगे यांनी केलं आहे. जनगणनेतून मिळणारी माहिती शासनाच्या विविध योजना आणि धोरण निर्मितीसाठी उपयोगी ठरणार असून, पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोळा मे ते चौदा जून दरम्यान जेव्हा प्रगणक घरोघरी येतील तेव्हा त्यांना अचूक माहिती द्यावी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना याबद्दल जागरूक करावं, जेव्हा एक मे ते पंधरा मे मध्ये स्वगणना प्रक्रियेतही सहकार्य करण्याचं आवाहन डांगे यांनी केलं.

****

भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष उद्यापासून लेहमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. हे पवित्र अवशेष भारतीय हवाई दलाच्या एका विशेष विमानानं काल लडाखमधल्या लेह इथं आणण्यात आले. उद्याच्या बुद्धपौर्णिमेपासून ते १५ मे पर्यंत सामान्य नागरीकांच्या दर्शनासाठी हे अवशेष उपलब्ध असतील. लडाख पोलिसांनी या पवित्र अवशेषांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या स्वागतानिमित्त विविध धार्मिक विधी पार पडले.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौर्यावर आहेत. यादरम्यान ते भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं दर्शन घेणार आहेत.

****

जम्मू तावी रेल्वे स्थानकावरून श्रीनगर–कटरा वंदे भारत एक्सप्रेसच्या विस्तारित सेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज होणार आहे. कटऱ्यापासून आता जम्मू तवीपर्यंत या सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेवेचा शुभारंभ केला होता. ही गाडी आता २० डब्यांची झाल्याने प्रवाशांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून या सेवेचा अधिकाधिक लाभ होणार आहे.

****

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या विशेष प्राणीगणना आयोजित करण्यात आली आहे. याअंतर्गत ताडोबाच्या बफर क्षेत्रातल्या ५७ लोखंडी मचाणांवर दोन प्रगणक रात्रभर बसून वन्यप्राण्यांची नोंद करणार असून, कोअर क्षेत्रात वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गणना करतील. या उपक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली असून प्रति व्यक्ती साडेतीन हजार रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे.

****

अंमली पदार्थ नियंत्रण संस्थेनं दाऊदचा हस्तक मोहम्मद सलीम डोला याला दिल्लीहून मुंबईत आणलं असून, आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. डोला हा अनेक वर्षांपासून फरार होता आणि त्याचे दाऊद इब्राहिमशी जवळचे संबंध असल्याचे आरोप आहेत.

****

शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी कृषी निविष्ठा विक्रेते गेल्या २७ एप्रिल पासून बेमुदत संपावर गेले होते. त्यांच्या मागण्या संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हा संप स्थगित करण्यात आल्याची माहती माफदा संघटनेच्या वतीने देण्यात आली.

****

धुळे शहर विधानसभा मतदारयादीचं सखोल पुनरीक्षणाच्या पूर्वतयारीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या १८ केंद्रस्तरीय बीएलओ अधिकाऱ्यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय तीस टक्क्यांपेक्षा कमी काम पूर्ण करुन देणाऱ्या २३ कर्मचाऱ्यांचं १५ दिवसांचं वेतन कापण्याचे आदेशही दिले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथलं सिडको वाळूज महानगर परिसर आता छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित झालं असून यासाठी विकास आराखड्यासह निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगर विकास विभागाकडे त्वरीत सादर करावा, असे निर्देश नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिले. यासंदर्भात मुंबईत काल असीमकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा तातडीनं विकसित करणं आवश्यक असल्याचं गुप्ता म्हणाले. तसचं या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांनी सातत्यानं पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

****

राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं आरोग्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून अकोला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या सर्वाधिक म्हणजेच ७२ रुग्णांची नोंद झाली.

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत १४ रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये सहा, गडचिरोली आणि रत्नागिरी इथं प्रत्येकी चार, तर अहिल्यानगरमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत उष्माघात सदृश लक्षणं असलेल्या १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

****

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 April-2026
Time: 09:00-09:10 am
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ: ۰۳/اپریل ۶۲۰۲ء؁
وقت: ۰۱:۹-۰۰:۹
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
پیش ہیں خاص خبروں کی سرخیاں:
٭ ریاستی حکومت کا مصنوعی ذہانت پالیسی کا اعلان؛ سرمایہ کاری اور روزگار کے بڑھیں گے مواقع۔
٭ ملک بھر میں گھریلو ایل پی جی کی فراہمی ہموار؛وزارتِ پیٹرولیم کی وضاحت۔
٭ امباداس دانوے کو شیوسینا اُدّھو بالا صاحب ٹھاکرے نے قانون ساز کونسل انتخابات کیلئے کیا نامزد۔
اور۔۔۔٭ بڑھتے ہوئے درجہ حرارت کے پیشِ نظر ریاست میں لُو لگنے کے معاملات میں اضافہ۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے...
ریاستی حکومت نے کل مصنوعی ذہانت پالیسی 2026کا اعلان کیا۔ یہ اطلاع ممبئی میں وزیرِاعلیٰ دیویندر پھڑنویس کی صدارت میں ریاستی کابینہ کی میٹنگ کے بعد دی گئی۔ اس پالیسی کے تحت ریاست میں دس ہزار کروڑ سے زیادہ کی سرمایہ کاری کی جائیگی‘ جبکہ ڈیڑھ لاکھ سے زیادہ روزگارکے مواقع دستیاب ہوں گے۔ ریاست بھرمیں چھ اے آئی سینٹر آف ایکسی لینس قائم کیے جائیں گے اور پانچ AI اختراعی شہر قائم کیے جائیں گے۔
لندن اسکول آف اکنامکس اینڈ پولیٹیکل سائنس میں بھارت رَتن ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر چیئر قائم کرنے کے فیصلے کی بھی اس میٹنگ میں توثیق کی گئی۔
کابینہ نے ریاست کے دسویں جماعت کے معذور طلبہ کو اسکالر شپ فراہم کرنے کا فیصلہ کیا ہے۔ اب معذور طلبہ کو یونیورسٹیوں‘ امتحانی بورڈز اداروں کے ساتھ ساتھ لائبریری‘ میگزین اور میڈیکل چیک اَپ کیلئے ادا کی جانے والی مختلف فیس کیلئے مالی امداد ملے گی۔
کل کے اجلاس میں این جی اوز کے زیرِ انتظام امداد یافتہ آشرم میں اسکولوں میں غیر تدریسی ملازمین کیلئے نظرِ ثانی شدہ اِن سروس اَشورڈ پروگریس اسکیم کے نفاذ کی بھی منظوری دی گئی۔ جس کے بارہ اور چوبیس سال کی باقاعدہ سروس کے بعد دو فوائد ہیں۔
ریاست میں تین سو کروڑ درخت لگانے کیلئے ایک پُرجوش درخت لگانے کی مہم شروع کی گئی ہے۔ اس میٹنگ میں گرین مہاراشٹر کمیشن کے قیام کا فیصلہ کیا گیا ہے۔ ریاست میں سبز توانائی کے استعمال کو بڑھانے کیلئے بارہ ہزار 303 کروڑ روپئے کی میجسٹک اسکیم کو بھی میٹنگ میں منظوری دی گئی۔
***** ***** *****
وزارتِ پیٹرولیم اور قدرتی گیس کی سیکریٹری سجاتا شرما نے کہا ہے کہ مغربی ایشیاء میں بدلتی صورتحال کے پیشِ نظر گھریلو ایل پی جی کی فراہمی پورے ملک میں آسانی سے جاری ہے۔ وہ کل نئی دہلی میں ایک بین وزارتی پریس کانفرنس سے خطاب کررہی تھیں۔ انھوں نے واضح کیا کہ ملک بھر میں کمرشیل ایل پی جی کی فراہمی 70 فیصد تک بحال کردی گئی ہے اور آن لائن ایل پی جی بکنگ اور ڈیلیوری تصدیقی کوڈ کی بنیاد پر گھریلو ایل پی جی کی فراہمی بھی اب تک بلند ترین سطح پر ہے۔ انھوں نے بتایا کہ پانچ کلو گرام کے سلنڈروں کی فراہمی تقریباً دوگنی ہوگئی ہے اور کل تقریباً 73 ہزار سلنڈر فروخت ہوئے ہیں۔ انھوں نے کہا:
Byte: Petroleum And Natural Gas Joint Secretary Sujata Sharma
***** ***** *****
مغربی بنگال اسمبلی انتخابات کے دوسرے اور آخری مرحلے میں بھی تقریباً 91.66 فیصد ووٹ ڈالے گئے۔ ریاست میں دو مرحلوں میں ریکارڈ 92 فیصد ووٹ ڈالے گئے۔ مغربی بنگال‘ آسام‘ کیرالہ، تمل ناڈو اور پڈوچیری کے اسمبلی انتخابات کے ووٹوں کی گنتی 4 تاریخ کو ہوگی۔
***** ***** *****
شیوسینا اُدّھو بالا صاحب ٹھاکرے کی پارٹی نے مہاراشٹر قانون ساز کونسل کے انتخابات کیلئے سابق اپوزیشن لیڈر امبا داس دانوے کو امیدواری دی ہے۔ رکنِ اسمبلی آدتیہ ٹھاکرے نے کل یہ اعلان کیا۔
دوسری طرف ریاستی کانگریس صدر ہرش وردھن سپکال نے اعلان کیا ہے کہ کانگریس بھی اس الیکشن میں اپنا امیدوار کھڑا کرے گی۔
***** ***** *****
راشٹروادی کانگریس کے ریاستی صدر سنیل تٹکرے نے بتایا کہ پارٹی کی جانب سے اس الیکشن کیلئے سرکاری نام کا اعلان کیا جائے گا اور آج پرچہئ نامزدگی داخل کیے جائیں گے۔ بی جے پی اس الیکشن کیلئے اپنے پانچ امیدواروں کا اعلان کرچکی ہے۔ سابق وزیرِ اعلیٰ اُدّھو ٹھاکرے سمیت نو لوگ 13 مئی کو سبکدوش ہورہے ہیں۔ اس سے پہلے قانون ساز کونسل کے انتخابات 12 مئی کو ہوں گے۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔
***** ***** *****
بیڑ ضلعے کے مسا جوگ کے سرپنچ عہدے پر سوروپا نند دیشمکھ نے کامیابی حاصل کی ہے۔ دیشمکھ نے آنجہانی سابق سرپنچ سنتوش دیشمکھ کی بیوی اشونی دیشمکھ کو 92 ووٹوں سے شکست دی۔ دسمبر 2024 میں سنتوش دیشمکھ کے اغواء اور بے دردی سے قتل کے بعد سے سرپنچ کا عہدہ خالی تھا۔
***** ***** *****
بامبے ہائیکورٹ نے کل اندھ شردّھا نرمولن سمیتی کے بانی ڈاکٹر نریندر دابھولکر کے قتل کیس کے دو ملزمین میں سے ایک شرد کلسکر کو ضمانت دے دی۔ یہ حکم جسٹس اے ایس گڈکری اور جسٹس آر آر بھوسلے کی بینچ نے دیاہے۔ نریندر دابھولکر کو اگست 2013 میں پونہ میں گولی مار کر ہلاک کردیا گیا تھا۔
***** ***** *****
ناندیڑ ایجوکیشن سوسائٹی اور دیانند شکشن سنستھا لاتور کے درمیان کل ایک تعلیمی معاہدے پر دستخط ہوئے۔ طلبہ کے تعلیمی معیار کو بہتر بنانے کے مقصد سے دونوں تعلیمی اداروں کے درمیان تعلیمی سرگرمیوں اور تدریسی طریقوں کا تبادلہ ہوگا۔ دیانند تعلیم سنستھا کے صدر لکشمی رَمن لاہوٹی نے کہا کہ معاہدے کے ذریعے گیارہویں اور بارہویں جماعت کے سائنس کے طلبہ کو مفت آن لائن کلاسیز فراہم کی جارہی ہیں۔
***** ***** *****
جالنہ میونسپل کارپوریشن انتظامیہ نے ان لوگوں کے خلاف سخت کارروائی کی جنھوں نے غیر قانونی طور پر جائیکواڑی پانی سپلائی اسکیم سے کنکشن حاصل کیا۔ عنبڑ سے جالنہ تک پانی کی مین پائپ لائن پر ایئر وال سے کل 68 پائپوں کا رابطہ منقطع کردیا گیا۔ جہاں شہرکو ہفتے میں صرف ایک بار پانی مل رہا ہے انتظامیہ کو بعض مقامات پر 24 گھنٹے غیر قانونی طور پر پانی استعمال کرنے کی شکایات موصول ہوئی تھیں۔ اس ضمن میں خصوصی مہم شروع کی گئی۔ انتظامیہ نے ایسے معاملات کے خلاف سخت کارروائی کا انتباہ دیا ہے۔
***** ***** *****
مہاوِترن کے چھترپتی سمبھاجی نگر کے علاقائی دفتر کے جوائنٹ مینیجنگ ڈائریکٹر آدتیہ جیونے نے پی ایم سوریہ گھر اسکیم کو تیز کرتے ہوئے شمسی صارفین کو فوری خدمات فراہم کرنے کی ہدایات دی ہیں۔ وہ چھترپتی سمبھاجی نگر ضلعے میں سوریہ گھر اسکیم کی پیش رفت کا جائزہ لینے کے بعد مخاطب تھے۔
***** ***** *****
محکمہئ صحت ریاست میں بڑھتے ہوئے درجہ حرارت کے درمیان لُو لگنے کے معاملات میں اضافے پر گہری نظر رکھے ہوئے ہے۔ ہمارے نامہ نگار نے اطلاع دی ہے کہ ودربھ میں شدید گرمی کی لہر جاری ہے اور اکولہ ضلعے میں اب تک لُو لگنے کے سب سے زیادہ 72 معاملات درج کیے گئے ہیں۔
نندوربار ضلعے میں اب تک 14 مریض لُو سے متاثر ہوئے ہیں۔ ناسک میں چھ، گڈچرولی اور رتناگری میں چار چار، اور اہلیا نگر میں تین‘ اسی طرح رائے گڑھ، پونے، پال گھر، جالنہ، گوندیا، بلڈانہ، چندر پور اور دھولیہ میں دو دو افراد اور امراوتی، بھنڈارہ، جلگاؤں، پربھنی، سندھو دُرگ، شولاپور اور تھانے اضلاع میں ایک ایک شخص لُو سے متاثر ہوا ہے۔
***** ***** *****
دریں اثناء، ریاست میں، کوکن میں کل زیادہ سے زیادہ درجہ حرارت میں نمایاں اضافہ ہوا، جبکہ مراٹھواڑہ میں بیشتر مقامات پر، ودربھ کے متعدد مقامات اور وسطی مہاراشٹر کے چند مقامات پر زیادہ سے زیادہ درجہ حرارت میں معمولی اضافہ ہوا ہے۔
کل چندرپور میں سب سے زیادہ 45 ڈگری سیلسیس درجہ حرارت درج کیا گیا۔ مراٹھواڑہ کے پربھنی میں 42 اعشاریہ پانچ ڈگری سیلسیس تپش درج کی گئی، جبکہ چھترپتی سمبھاجی نگر میں 41 اعشاریہ پانچ ڈگری سیلسیس درجہ حرارت درج ہوا۔
اسی دوران محکمہ موسمیات نے پیش گوئی کی ہے کہ آئندہ تین دنوں میں چندر پور، گڑچرولی، وردھا اور ایوت محل اضلاع میں گھن گرج کے ساتھ بارش ہوگی۔ جبکہ ریاست میں بقیہ مقامات پر موسم خشک رہے گا۔
***** ***** *****
رکنِ اسمبلی امیت دیشمکھ نے تجویز دی ہے کہ لاتور شہر کی سڑکوں پر تجاوزات کو ہٹانے اور ٹریفک کی روانی کو یقینی بنانے کیلئے تمام اقدامات کیے جائیں۔ وہ کل اس سلسلے میں اجلاس سے خطاب کررہے تھے۔ دیشمکھ نے یہ بھی مشورہ دیا کہ میونسپل کارپوریشن کی مجموعی انتظامیہ کو شفاف اور عوام پر مبنی رکھا جائے۔
***** ***** *****
ناندیڑ ضلع کے دھرم آباد تعلقے کے رتنالی میں کنویں میں تیرنے کے دوران نوجوانوں کی کرنٹ لگنے سے موت ہوگئی۔ کرشنا ماڑگنواڑ اور اویناش ہلاک ہونے والوں کے نام ہیں۔
***** ***** *****
چارے کی ممکنہ قلّت کے پیشِ نظر چارے کے بیج سو فیصد سبسڈی پر ایسے مستحقین میں تقسیم کیے جائیں گے، جن کے پاس مویشی اور آبپاشی کی سہولت موجود ہے۔ چھترپتی سمبھاجی نگر ضلع پریشد کے محکمہ حیوانات نے دلچسپی رکھنے والے کسانوں سے اپیل کی ہے کہ وہ 5 مئی تک اپنے گاؤں کے ویٹرنری انسٹیٹیوٹ میں اپنی درخواستیں جمع کروائیں۔
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
اور آخر میں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر...
٭ ریاستی حکومت کا مصنوعی ذہانت پالیسی کا اعلان؛ سرمایہ کاری اور روزگار کے بڑھیں گے مواقع۔
٭ ملک بھر میں گھریلو ایل پی جی کی فراہمی ہموار؛وزارتِ پیٹرولیم کی وضاحت۔
٭ امباداس دانوے کو شیوسینا اُدّھو بالا صاحب ٹھاکرے نے قانون ساز کونسل انتخابات کیلئے کیا نامزد۔
اور۔۔۔٭ بڑھتے ہوئے درجہ حرارت کے پیشِ نظر ریاست میں ہیٹ اسٹروک کے معاملات میں اضافہ۔
***** ***** *****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्य सरकारचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढणार

·      देशभरात घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीत, पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती

·      पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दोन्ही टप्प्यांत एकूण ९२ टक्के मतदान

·      विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी

आणि

·      वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ

****

राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६ काल जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत, राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबत माहिती देण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाअंतर्गत राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार असून, दीड लाखांपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यभरात सहा एआय उत्कृष्टता केंद्रांची स्थापन होणार असून, पाच एआय इनोव्हेशन शहरांची स्थापना करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या इतर निर्णयांबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…

बाईट- मंत्रिमंडळ

 

‘‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करण्याचा निर्णयावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं.

राज्यातल्या दहावीनंतर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ, परीक्षा मंडळ, संस्थेला भरावे लागणाऱ्या विविध शुल्कांसह ग्रंथालय, नियतकालिकांसाठी, वैद्यकीय तपासणीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.

स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बारा आणि चोवीस वर्षांच्या नियमित सेवेनंतरची दोन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करायलाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यात तीनशे कोटी वृक्ष लागवडीकरता महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली असून हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातल्या हरित उर्जेचा वापर वाढवण्यासाठी १२ हजार ३०३ कोटी रुपयांच्या मॅजेस्टिक योजनेलाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.’’

****

पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याचं, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं. काल नवी दिल्ली इथं आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. देशभरात व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा ७० टक्क्यांपर्यंत पूर्ववत झाला असून, ऑनलाइन एलपीजी बुकिंग आणि डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडवर आधारित, घरगुती एलपीजीचा पुरवठाही आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पाच किलोच्या सिलिंडरचा पुरवठा जवळपास दुप्पट झाला असून, सुमारे ७३ हजार सिलिंडर काल विकले गेल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातही सुमारे ९१ पूर्णांक ६६ टक्के मतदान झालं. राज्यात दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून एकूण ९२ टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालसह, आसाम, केरळ, तमिळनाडू, आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची येत्या चार तारखेला मतमोजणी होणार आहे.

****

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी काल ही घोषणा केली. यासंदर्भात दानवे यांनी आकाशवाणीशी बोलतांना, आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या. ते म्हणाले…

बाईट- शिवसेना नेते अंबादास दानवे

 

दुसरीकडे काँग्रेसही या निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केलं आहे.

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत नावाची घोषणा करण्यात येईल आणि आज उमेदवारी अर्ज भरला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. भाजपने या निवडणुकीसाठी आपले पाच उमेदवार यापूर्वीच जाहीर केले आहेत.

१३ मे ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जण निवृत्त होत आहेत. त्याआधी १२ मे ला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगच्या सरपंचपदी स्वरुपानंद देशमुख यांचा विजय झाला. देशमुख यांनी, दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव केला. संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून निघृण हत्या झाल्यानंतर हे सरपंचपद रिक्त होतं.

****

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींपैकी एक असलेल्या शरद कळस्करला मुंबई उच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि आर. आर. भोसले यांच्या पीठानं हा आदेश दिला. ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात नरेंद्र दाभोळकर, यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती.

****

नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि लातूर इथली दयानंद शिक्षण संस्था यांच्यामध्ये काल शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशानं शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धतीची देवाण-घेवाण होणार आहे. या कराराद्वारे अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देत असल्याचं दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी सांगितलं.

****

जायकवाडी पाणीपुरवठा योजनेवर बेकायदेशीर नळ जोडणी करणाऱ्यांविरोधात जालना महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई केली. अंबड ते जालना या मुख्य जलवाहिनीवरील ‘एअर व्हॉल्व्ह’मधून अनधिकृतपणे पाणी उपसा होत असलेल्या एकूण ६८ नळ जोडण्या तोडण्यात आल्या. शहरात आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असताना, काही ठिकाणी २४ तास बेकायदेशीररीत्या पाणी वापरलं जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबवण्यात आली. अशा प्रकारांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

****

पीएम-सूर्यघर योजनेला गती देऊन सौर ग्राहकांना तत्पर सेवा द्या, असे निर्देश महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सूर्यघर योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते.

****

लातूर शहरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना आमदार अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. महापालिकेचा एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख ठेवावा, अशा सूचनाही देशमुख यांनी केल्या.

****

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यातल्या रत्नाळी इथं विहिरीत पोहत असताना विजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू झाला. कृष्णा माडगीनवाड आणि अविनाश तोंडाकुरवाड अशी मृतांची नावं आहेत.

****

संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधन असलेल्या तसंच सिंचनाची सोय असलेल्या लाभधारकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणं वितरीत करण्यात येणार आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी ५ मे पर्यंत आपले अर्ज आपल्या गावातल्या पशुवैद्यकिय संस्थेकडे सादर करावेत, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं केलं आहे.

****

राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं आरोग्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून अकोला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या सर्वाधिक म्हणजेच ७२ रुग्णांची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत १४ रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये सहा, गडचिरोली आणि रत्नागिरी इथं प्रत्येकी चार, तर अहिल्यानगरमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली. रायगड, पुणे, पालघर, जालना, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर आणि धुळे इथं प्रत्येकी दोन, तर अमरावती, भंडारा, जळगाव, परभणी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यांत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत उष्माघात सदृश लक्षणं असलेल्या १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

****

दरम्यान, राज्यात काल कोकणात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली.

काल सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४२ पूर्णांक पाच, तर छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसात मेघगर्जनेसह वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात इतरत्र सर्वत्र हवामान कोरडं राहील.

****