Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Friday, 1 May 2026
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 01 May 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मे २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
६७ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त आज ध्वजारोहणासह विविध
कार्यक्रमांचं आयोजन
·
यंदाच्या जनगणना प्रक्रियेला राज्यभरात आजपासून प्रारंभ
·
बलात्कारातून गर्भधारणा झाल्यास, गर्भपातासाठी
कालमर्यादा नसावी-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
·
नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातल्या कोंबड्यांना
बर्ड फ्ल्यूचा संसर्ग
आणि
·
मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेच्या अंबड शाखेत ९६
लाखाचा सुवर्ण कर्ज घोटाळा-तिघांना अटक
****
६७ वा महाराष्ट्र
दिन आज साजरा होत आहे. राज्याचा मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ मुंबईत दादरच्या शिवाजी
पार्क मैदानावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी आठ वाजता होणार आहे. मराठवाड्यात बीड इथं उपमुख्यमंत्री
तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. छत्रपती संभाजीनगर
इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या
हस्ते, लातूर इथं शिवेंद्रसिंहराजे भोसले, परभणी इथं मेघना साकोरे-बोर्डीकर, हिंगोली इथं नरहरी
झिरवाळ, नांदेड इथं अतुल सावे तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप
सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
**
मुंबई–पुणे
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग
लिंक’ प्रकल्पाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
मिसिंग लिंक हा देशातला पहिला अधिक वेगवान आणि सुरक्षित एक्सप्रेस-वे असेल. या महत्त्वाकांक्षी
प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ
होणार आहे.
****
राज्यात
बीडसह ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तार आज केला जाणार आहे. नांदेड, धाराशिव,
हिंगोली, परभणीसह सात जिल्ह्यांमधल्या शासकीय रुग्णालयांमध्ये
एमआरआय सुविधा आजपासून सुरू होत आहे.
****
सार्वजनिक
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी ‘थॅलेसेमिया मुक्त
महाराष्ट्र’ मोहिमेला सक्रिय प्रोत्साहन देत आजपासून आठ मे पर्यंत “संकल्प सप्ताह”
राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून थॅलेसेमिया प्रतिबंध, तपासणी तसंच
जनजागृतीला अधिक गती देण्यावर भर देण्यात येणार आहे.
****
राज्य विधान
परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली.
नियमित नऊ आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक, अशा दहा जागांसाठी प्रमुख पक्षांच्या
उमेदवारांचे दहा अर्ज भरण्यात आले. भाजपचे सुनील कर्जतकर, संजय
भेंडे, विवेक कोल्हे, माधवी नाईक,
आणि प्रमोद जठार यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून
माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी अर्ज भरला.
शिवसेनेकडून
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी
अर्ज दाखल केले. त्यापूर्वी बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत
शिवसेनेत प्रवेश केला. प्रहार ही सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी
स्पष्ट केलं.
शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अर्ज दाखल
केला. दरम्यान, दानवे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची काल
भेट घेतली. त्यानंतर वेगळा उमेदवार न देण्याचा निर्णय सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत
जाहीर केला.
प्रज्ञा
सातव यांनीही पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अर्ज दाखल केला. दरम्यान, या निवडणुकीसाठी
पाच अपक्षांनी अर्ज दाखल केल्याची माहिती विधान भवनातल्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
****
राज्यात
आजपासून यंदाच्या जनगणनेची प्रक्रिया सुरू होत आहे. १ ते १५ मे दरम्यान सर्वसामान्य
नागरिकांना se.census.gov.in या संकेतस्थळावर घरांची नोंदणी करता येईल. राज्याच्या
मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा डांगे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. ही नोंदणी केल्यावर ११ अंकी SE आयडी मिळेल. या माहितीची
पडताळणी १६ मे ते १४ जून दरम्यान घरी येणाऱ्या प्रगणकांकडून केली जाईल. त्यांना हा
एसई आयडी द्यावा लागेल. ज्या नागरिकांनी स्वतः घरांची माहिती नोंदवलेली नाही त्यांची
माहिती हे प्रगणक नोंदवून घेतील. यंदाच्या जनगणनेत पहिल्यांदाच कुटुंबात प्रामुख्यानं
सेवन केल्या जाणाऱ्या धान्याची नोंद होणार आहे.
****
बलात्कारातून
गर्भधारणा झाल्यास, गर्भपातासाठी कोणतीही कालमर्यादा नसावी, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. केंद्र सरकारनं कायद्यात आवश्यक
सुधारणा करून बलात्कार पीडितांना २० आठवड्यांनंतरही गर्भपाताची परवानगी देण्याबाबत
विचार करावा, असे निर्देश न्यायालयानं दिले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती
सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या पीठासमोर १५ वर्षीय पीडितेच्या
३० आठवड्यांच्या गर्भपाताबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं
हे मत नोंदवलं.
****
बुद्ध पौर्णिमा
आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला
देशवासियांना शुभेच्छा दिल्या. बुद्धांचा करुणा, अहिंसा,
शांती आणि ज्ञानाचा शाश्वत संदेश संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत
राहतील, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यात
आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचं जाळं उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सांगितलं. नागपूर इथं राज्यस्तरीय प्रयोगशाळा तर छत्रपती संभाजीनगरसह
अकोला, सोलापूर, धुळे आणि मिरज इथल्या वैद्यकीय
महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी २९
कोटी २१ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
****
नंदुरबार
जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात कुक्कुट पालन केंद्रातल्या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूचा
संसर्ग झाला आहे. गेल्या १३ आणि १४ तारखेला या केंद्रात सुमारे दोनशे कोंबड्या अचानक
मरण पावल्या होत्या. त्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळ इथल्या वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी
पाठवले होते, त्यात या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं निदर्शनास आलं.
एक किलोमीटर परिघातल्या संक्रमित भागातल्या सहा कुक्कुटपालन केंद्रातल्या एक लाख ४०
हजार कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यात
अंबड इथल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेच्या शाखेत तारण ठेवलेल्या मूळ सोन्याच्या
जागी बनावट सोन्याची पाकिटे ठेऊन सुमारे ९६ लाख ४१ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला.
या प्रकरणी बँकेचे खातेदार, अमोल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शाखा व्यवस्थापक रामप्रसाद
जाजू, कॅशियर अंगद येवले आणि शिपाई सोमनाथ नसवाले यांच्याविरुद्ध
अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही अटक करण्यात आल्याची
माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी दिली. बदनापूर इथल्या कॅनरा बँकेच्या शाखेतही
गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे सात कोटी रुपयांचा सुवर्ण कर्ज घोटाळा उघडकीस आला होता.
****
नवव्या
नेपाळ आंतरराष्ट्रीय समीक्षक चित्रपट महोत्सवामध्ये बीडच्या प्रभातकुमार होळकर याला
'भुरळ डोळ्यांची' या मराठी चित्रपटासाठी उत्कृष्ट संकलक
आणि उत्कृष्ट बालकलाकार हे दोन पुरस्कार मिळाले. याच चित्रपटासाठी मीनाक्षी होळकर यांना
उत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सन्मानीत करण्यात आलं.
****
छत्रपती
संभाजीनगरचा पाणीपुरवठा विहित वेळेत करण्यासाठी कालमर्यादा पाळावी, असे निर्देश
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले. नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात झालेल्या आढावा
बैठकीत ते काल बोलत हते. प्रकल्प कंत्राटदारांची देयके पडताळणीनंतर प्रलंबित राहणार
नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्रीकांत यांनी यावेळी
केल्या.
****
परभणी जिल्ह्यात
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असं आवाहन
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. ते म्हणाले…
बाईट- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
दरम्यान, राज्यात काल
सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं
४३ पूर्णांक पाच, तर छत्रपती संभाजीनगर,धाराशिव आणि नांदेड इथं सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
नागपूर
इथं झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात परभणी पोलिस दलाच्या टायसन
श्वानानं एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं. परभणीचे पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह
यांनी टायसन आणि त्याचे दोन हँडलर यांचा सत्कार केला. परभणी पोलिस दलासाठी ही बाब अभिमानास्पद
असल्याचं, परदेशी यांनी म्हटलं आहे.
****
आर्ट ऑफ
लिव्हिंग संस्थेच्या वतीनं आज अनसंग हिरोज सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता
हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मराठवाड्यातल्या १३ युवकांना गौरवण्यात येणार
आहे.
****
लातूर पोलीस
अधीक्षक कार्यालय परिसरात सायबर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते काल झालं. नव्याने नियुक्त ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना
नियुक्तीपत्रांचं वाटप तसंच जिल्ह्यात ‘क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचा शुभारंभही
यावेळी करण्यात आला.
****