आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Tuesday, 30 September 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 30 September 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० सप्टेंबर
२०२५
सायंकाळी ६.१०
****
·
दुष्काळी टंचाईच्या
काळातल्या सवलती आणि उपाययोजना अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा राज्य
मंत्रिमंडळाचा निर्णय
·
राज्यात पावसाची काही
प्रमाणात उघडीप-मात्र धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरूच
·
नवरात्रोत्सवात
दुर्गाअष्टमीचा सण आज सर्वत्र भक्तिभावाने साजरा
·
प्रलयंकारी किल्लारी
भूकंपाला ३२ वर्ष पूर्ण-दुर्घटनेतल्या मृतांना प्रशासनाकडून अभिवादन
आणि
·
आयसीसी महिला विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेत भारत आणि श्रीलंका सामन्याला प्रारंभ
****
दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि उपाययोजना केल्या
जातात त्या सर्व अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने
घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती
दिली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची कोणतीच तरतूद नसल्याने आजवर कधीच ओला
दुष्काळ जाहीर झाला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यात अतिवृष्टीनं
झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीपोटी २ हजार
२१५ कोटींच्या निधी वितरणला यापुर्वीच मान्यता देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. या मदतीसाठीची ईकेवायसीची अट शिथिल करून अँग्रीस्टॅकच्या आधारे निधी
वितरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पुढील
दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची ही रक्कम जमा होणार असल्याचं ते
म्हणाले. दरम्यान,
अतिवृष्टीने राज्यभरात ६० लाख हेक्टर शेतपिकांचं नुकसान
झालं आहे, ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालं त्याची भरपाई देण्यासाठी सर्वंकष धोरण
निश्चित करण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना
मदत पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण आखून
प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करुन देणार आहे. राज्य
मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. राज्यभरात १८
रुग्णालयांमधे कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होतील. यासाठी १०० कोटी रुपये
भाग भांडवलाची महाकेअर,
अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च
अँड एज्युकेशन फाऊंडेशन ही कंपनी स्थापन केली जाणार आहे.
राज्याचं जागतिक क्षमता केंद्र - ग्लोबल कॅपेबिलीटी सेंटर
धोरण २०२५ आजच्या बैठकीत मंजूर झालं. औद्योगिक, वाणिज्यिक तसंच इतर
वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंत्रिमंडळाने
मंजुरी दिली. यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक-ब तसंच अन्य योजनेंतर्गत सौर
कृषीपंपासाठी वीज पुरवठ्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास आजच्या बैठकीत मंजुरी
देण्यात आली. याअंतर्गत भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रशासनात गतिमानता
आणली जाणार आहे.
****
राज्यात अतिवृष्टी होत असूनही
बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस देण्यात येत असल्याचं, काँग्रेस
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत
होते राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजूनही
केंद्राकडून पाहणी पथक आलं नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
****
राज्यात कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं
एका दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय
घेतला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. आपलं एका महिन्याचं
वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीस देणार
असल्याचं भरणे यांनी जाहीर केलं आहे.
****
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे
पैठण पूरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबीर घेऊन धान्य वाटप उपक्रम राबवला. सुमारे
११० धान्यपाकिटांचं यावेळी वाटप करण्यात आलं. नागरिकांची आवश्यक तपासणी करून औषध
वाटप करण्यात आली.
****
राज्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असली, तरी
धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे. येलदरी तसंच सिद्धेश्वर धरणातून
प्रत्येकी ११ हजार घनफूट,
माजलगाव बाराशे, तर जायकवाडी धरणातून एक लाख
आठ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान पुरामुळे पैठण -पुणे राज्य महामार्ग तीन दिवस बंद
होता. तो आज पूर्ववत सुरु झाला.
****
राज्यात २०२६ मध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे पक्षाने समन्वयकांची नियुक्ती केली.
यात छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. सुनिल देशमुख यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
****
नवरात्रोत्सवात दुर्गाअष्टमीचा सण आज साजरा होत आहे. या
निमित्ताने ठिकठिकाणी होम हवन आणि सप्तशती पाठासह विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात
येत आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीची आज महिषासुरमर्दिनी
अलंकार महापूजा मांडण्यात आली. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली
आहे.
दरम्यान, तुळजापूर इथं मंदिर परिसरात बाल
भिक्षेकरी पुनर्वसन मोहीम राबवण्यात आली. दोन सत्रात पार पडलेल्या या मोहिमेत
सकाळी ३ तर दुपारी ४ अशी एकूण ७ बालकांची सुटका करून त्यांना धाराशिव इथल्या बाल
कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आलं.
****
प्रलयंकारी किल्लारी भूकंपाला आज ३२ वर्ष होत आहेत. ३०
सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे लातूर आणि
धाराशिव जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जीवीत आणि वित्त हानी झाली. २९
सप्टेंबरला गणेश विसर्जनानंतर रात्री झोपलेले हजारो लोक या भूकंपात मारले गेले तर
अनेक लोक कायमस्वरूपी जायबंदी झाले. या मृतांना आज पोलिसांनी बंदुकीच्या फैरी
झाडून मानवंदना दिली. लातूर इथ स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण
करून सर्व मृतांना अभिवादन करण्यात आलं.
दरम्यान, लातूर जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये
मागील काही महिन्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के आणि गूढ आवाज येत आहेत. नागरिकांनी
अफवांवर विश्वास न ठेवता,
कोणतीही घटना आढळल्यास तात्काळ नजीकच्या तहसील कार्यालयाला
कळवावं, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केलं आहे
**
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका आज दुपारी गूढ
आवाजाने हादरल्याचं वृत्त आहे. या आवाजाने जमीन हादरल्याचं स्थानिकांकडून
सांगण्यात आलं.
****
सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर
प्रयत्नरत आहे. 'सेवा पर्व'च्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ल यांचा
अंतराळातील ऐतिहासिक प्रवास आणि यातून संशोधनाला मिळणारी प्रेरणा याविषयी जाणून
घेऊ.
आंतरराष्ट्रीय
अंतराळ स्थानकावर पहिले भारतीय अंतराळवीर
म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ल
यांनी इतिहास घडवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अंतराळ
संशोधनातील महत्त्वाकांक्षी योजनांचा हा
एक भाग आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम-
गगनयानच्या यशाचं हे पहिलं पाऊल आहे.
आज मै विश्वास से कहतां हूं, की ये भारत के गगनयान मिशन की सफलता का पहला अध्याय
है। आपकी यह ऐतिहासिक यात्रा, सिर्फ अंतरीक्ष तक सिमित नही है। यह हमारी विकसित भारत
की यात्रा को तेज गती और नई मजबुती देगी। भारत दुनिया के लिये स्पसे की नई संभावनों
के द्वार खोलने जा रहा है।
अंतराळात
असताना, शुक्ला आणि चमूने भारतीय संशोधन संस्थांनी विकसित
केलेल्या सात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण प्रयोगांचा संच पूर्ण केला. हे प्रयोग
भविष्यातील ग्रह मोहिमांसाठी आणि दीर्घ कालावधीच्या अंतराळ वस्तीसाठी महत्त्वपूर्ण
डेटा तयार करण्यात उपयुक्त ठरणार आहेत.
****
आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ
झाला. मालिकेतला पहिला सामना भारत आणि श्रीलंका संघांत सुरू आहे. श्रीलंकेने
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला,
अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, भारताच्या
१४ षटकांत एक बाद ५० धावा झाल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे आजचा सामना
प्रत्येकी ४८ षटकांचा होणार आहे.
****
आंध्रप्रदेशात राजमुंद्री इथं झालेल्या ऑल इंडिया सीनियर
रँकिंग स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सोनाली मिरखेलकर हिने बॅडमिंटनच्या मिश्र
दुहेरीत विजेते पद पटकावलं. सोनाली ही जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात वाणिज्य
शाखेच्या तृतीय वर्षात शिकत आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
शारदीय नवरात्र उत्सवाची आज आठवी माळ म्हणजेच अष्टमी.
आज महागौरीच्या पूजेसह घराघरात कन्यापूजन देखील केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी अष्टमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान आज संध्याकाळी दिल्ली
इथं चित्ररंजन पार्कमधील दुर्गा पूजा उत्सवात सहभागी होणार आहेत.
****
२१व्या शतकात सशस्त्र दलांमधील परस्पर कार्यक्षमता आणि
संयुक्तता ही रणनितीक गरज बनली आहे, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. नवी दिल्ली
इथं आज झालेल्या त्रि-सेवा चर्चासत्रात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं
आपल्या हवाई संरक्षणात संयुक्ततरित्या कामगिरी केली, जी निर्णायक ठरली, असं ते म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या एकात्मिक हवाई कमांड आणि
नियंत्रण प्रणालीनं, भारतीय लष्कराच्या आकाशतीर
आणि भारतीय नौदलाच्या ट्रिगनसह केलेल्या कामगिरी हा या यशाचा मूलभूत आधार होता, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
****
पशुधन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वार्षिक 12 टक्के वाढ झाल्याची माहिती केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी
दिली. पशुधनाच्या वाढीमुळं कृषीपूरक व्यवसायांच्या मूल्यवृद्धीत 31 टक्के वाढ झाली असून देशाच्या अर्थव्यवस्थेतही 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं.
शाश्वत पशुधन रुपांतरण याविषयीच्या दुसऱ्या जागतिक परिषदेत ते काल इटलीमध्ये बोलत होते.
भारत दुग्धोत्पादनात जगात आघाडीवर आहे. पशुधनाच्या लसीकरणाचं राष्ट्रीय गोकुळ अभियान, भारत पशुधन डिजिटल ओळख आणि महिलांच्या नेतृत्वातील सहकारी
पशुपालन व्यवसाय यासारखे बदल घडवून आणणारे आणि सर्वसमावेशक उपक्रम भारतात सुरू असल्याची
माहिती त्यांनी दिली.
****
बिहार विधानसभा निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी आज जाहीर
होणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दुपारपर्यंत मतदार याद्या उपलब्ध होतील.
मतदार यादीच्या प्रती सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना देण्यात
येणार असल्याचं निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
लडाखचे पोलिस महासंचालक डॉ. एस. डी. सिंग यांचा सोनम वांगचुक
यांच्या अटकेसंबंधीचा बनावट व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर प्रसारीत केला जात आहे. पत्र
सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटने स्पष्ट केले आहे की, लडाखच्या पोलीस महासंचालकांनी वांगचुक यांच्या अटकेबाबत
असं कोणतंही विधान केलं नाही.
****
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मौजे नागुर इथं
पुरा,मध्ये बुडून मृत्यू झालेल्या बालाजी
व्यंकट मोरे यांच्या कुटुंबियांना आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते शासनाकडून ४ लाख
रुपयांचा धनादेश देण्यात आला. बालाजी यांचा परवा बुडून मृत्यू झाला.
****
किल्लारी भूकंपाला आज ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. आमदार
अभिमन्यू पवार यांनी आज सकाळी किल्लारी इथल्या स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन
भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली.
****
लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावरुन पुणे आणि मुंबई बस
सेवा आजपासून पूर्ववत सुरू करण्यात आली. या अनुषंगानं मुरुड बस स्थानकावर
उदगीर- पुणे बस चालक वाहकांचा खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, हार देऊन सत्कार करण्यात आला.
****
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं २०२५ च्या क्रीडा
पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत. या पुरस्कारांसाठीच्या सूचना मंत्रालयाच्या संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्था २८ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पोर्टलद्वारे
आपले अर्ज सादर करू शकतात.
****
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु होत आहे.
गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली लढत होणार आहे. भारत या स्पर्धेचं जयमानपद
भूषवत आहे. २ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत आठ संघांमध्ये ३१ सामने होतील.
****
ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकार भास्कर चंदनशिव यांचं रविवारी
निधन झालं. मराठवाडा साहित्य परिषदेनं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्या, बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजता शोकसभा आयोजित केली
आहे.
****
जायकवाडी प्रकल्पातून सध्या एक लाख दोन हजार क्युसेक्स
विसर्ग सुरु आहे. पाणलोट क्षेत्र आणि नाशिक विभागात सध्या पाऊस नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वरच्या भागातील
धरणातून विसर्ग चालू आहे, त्यामुळं धरणात येणारी आवक सरासरी एक लाख २० हजार क्युसेक्स
आहे. जायकवाडी विसर्गाबाबत नागरिकांनी समाजमाध्यमांवरील माहिती ऐवजी वस्तुनिष्ठ माहिती
घ्यावी, असं आवाहन जायकवाडी प्रकल्पाच्या
मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे.
****
हवामान
राज्यात आज नांदेड जिल्ह्याला तर उद्या नांदेड आणि हिंगोली
जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 September 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी
आज दुर्गाष्टमी निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा
केल्यामुळं केवळ आध्यात्मिक शुद्धीकरण होत नाही तर सर्वांना सत्य, न्याय आणि करुणेनं पुढं जाण्याची प्रेरणा मिळते, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळात होणार आहे. दरम्यान, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं यंदाचा ऊस गाळप हंगाम आता २५
ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळ
बैठकीनंतर मंत्री समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत यंदाच्या गाळप हंगामाचं धोरण
निश्चित केलं जाणार आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार १२ ते १३ लाख हेक्टरवर
ऊसाची लागवड झाली आहे. त्यातून साखर कारखान्यांना गाळपासाठी बाराशे ते साडे बाराशे
लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात पुरात
अडकलेल्या ४४ जणांची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलानं सुटका केली. पूरग्रस्त भागात
बोटीवरील बाह्य इंजिन वापरणे अशक्य असल्याने दोरीच्या सहाय्यानं नागरिकांना सुरक्षित
स्थळी हलवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
नांदेड जिल्ह्यातल्या राहेगाव
या गावाला राज्य आपत्ती दलाच्या सहाय्यानं विद्युत आणि आरोग्य सुविधा पुरवण्यात येत
आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या गावाचा संपर्क तुटला होता. वैद्यकीय पथकानं गावातील
१०२ रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा
इथले माऊली प्रतिष्ठन जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेकतकऱ्यांना एक लाख एक हजार एकशे अकरा
रुपयांची मदत देणार आहे. विजयादशमीला काढण्यात येणारी शोभायात्रा तसंच सीमोल्लंघन साध्या
पद्धतीने करुन त्यसाठी येणारा खर्च संस्था पूरग्रस्तांना देणार आहे.
****
राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर
सातारा इथला शाही दसरा आणि सीमोल्लंघन सोहळा साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. खासदार
उदयनराजे भोसले यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी देखील यास सहमती
दर्शवत आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं.
****
नागपूरच्या दीक्षा भूमीवर ६९
व्या धम्मचक प्रवर्तन वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी
येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या सुविधांची नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी काल पाहणी करून, प्रशासनाला आवश्यक
सूचना केल्या.
****
नागपूरमधल्या दीक्षाभूमी पासून
सेवाग्राम आश्रमापर्यंतच्या संविधान सत्याग्रह पदयात्रेला काल महात्मा गांधी यांचे
पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. संविधान वाचवण्यासाठी आणि
भारतीय नागरितत्वाला पाठबळ देण्यासाठी ही सत्याग्रह यात्रा काढण्यात आल्याचं त्यांनी
माध्यमांशी बोलताना सांगितलं.
****
ॲग्रिस्टॅक प्रकल्पांतर्गत काढलेले
शेतकरी ओळखपत्र आता एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणालीला जोडण्यात येणार आहे. यासाठी राज्यात
वर्धा आणि नाशिक जिल्ह्यांत प्रथम हा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती नाशिकचे कृषी
अधीक्षक रवींद्र माने यांनी दिली. यामुळं खतांचा काळा बाजार रोखण्यास मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
यांनी गाझा संघर्ष संपवण्यासाठी व्यापक योजनेची घोषणा केली आहे. भारतानं या घोषणेचं
स्वागत केलं आहे. पॅलेस्टिन आणि इस्रायली नागरिकांसाठी तसंच पश्चिम आशियाई प्रदेशासाठी
दीर्घकालीन आणि शाश्वत शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी
हा एक व्यवहार्य मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात
म्हटलं आहे.
****
वस्तू आणि सेवा करातील सुधारीत
दरांमुळं खेळणी स्वस्त झाली आहेत. सरकारच्या या निर्णयामुळं ग्राहक आणि उत्पादकांना
दिलासा मिळाला आहे. तसंच स्वदेशी खेळणी बाजारपेठेला चालना मिळणार आहे. जीएसटीच्या सुधारीत
दरांमुळे सायकलही स्वस्त झाली आहे. सायकलवरील जीएसटी १२ टक्क्यांवरुन पाच टक्के करण्यात
आला आहे.
****
ज्येष्ठ भाजप नेते विजय कुमार
मल्होत्रा यांचं आज सकाळी नवी दिल्ली इथं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी विजय कुमार मल्होत्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मल्होत्रा
यांनी जनसेवेसाठी आपलं जीवन समर्पित केलं आणि त्यांच्या कार्यामुळं अनेकांचं जीवनमान
सुधारलं, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका संघात पहिला सामना
होणार आहे. दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दोन नोव्हेंबरला स्पर्धेचा
अंतिम सामना खेळवण्यात येईल.
****
जायकवाडी प्रकल्पातून सध्या
एक लाख 50 हजार 912 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. पाणलोट क्षेत्र आणि नाशिक विभागात सध्या पाऊस नाही.
मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वरच्या
भागातील धरणातून विसर्ग चालू आहे, त्यामुळं धरणात
येणारी आवक सरासरी 1 लाख 60 हजार क्युसेक्स आहे. जायकवाडी विसर्गाबाबत नागरिकांनी समाजमाध्यमांवरील माहिती
ऐवजी वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी, असं आवाहन पाटबंधारे
विभागानं केलं आहे.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 ستمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 30 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे या आठवडाअखेर
पूर्ण करणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
·
जिल्हा नियोजन समितीचा १० टक्के निधी आपत्कालीन परिस्थितीसाठी
वापरण्यास राज्य सरकारची परवानगी
·
राज्यशासनाच्या अभिनव धोरणांमुळे औद्योगिक गुंतवणूकीत
महाराष्ट्र अव्वल-उद्योग मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन
आणि
·
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात, भारत-श्रीलंका
पहिली लढत
****
राज्यात
अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे या आठवडाअखेर पूर्ण होतील. दिवाळीपूर्वी
सरकार शेतकऱ्यांना मदत करेल असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.
ते काल नागपूर इथं बोलत होते. सर्वांचं समाधान होईल, असा निर्णय मुख्यमंत्री
घेतील, असं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
****
जिल्हा
नियोजन समितीच्या मंजूर निधीपैकी १० टक्के निधी अतिवृष्टी, गारपीट किंवा
पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. यासंदर्भातला
शासन आदेश नियोजन विभागानं काल जारी केला. हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे
अधिकार पालकमंत्र्यांना असतील, असं या आदेशात म्हटलं आहे.
**
अतिवृष्टीमुळे
विभागात विस्कळीत झालेलं जनजीवन आणि जीवीत तसंच वित्तीय हानीबाबत हा संक्षिप्त आढावा...
बाईट -
दरम्यान, जालना जिल्ह्यात
काल संध्याकाळपर्यंत अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातल्या
२६ गावांमधल्या ९९१ कुटुंबातल्या सात हजार सातशे ३३ नागरिकांना जिल्हा प्रशासनानं २२
ठिकाणी उभारलेल्या शिबिरांमध्ये स्थलांतरित केलं आहे.
****
अतिवृष्टीग्रस्तांच्या
मदतीसाठी मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली
आहे.
****
धाराशिव
जिल्हा परिषदचे शिक्षक पूरग्रस्तांसाठी एक कोटी सहा लाख रुपये इतकी मदत देणार आहेत.
तर, जनता सहकारी बँकेकडून धाराशिव जिल्ह्यासाठी १० लाख, लातूर, सोलापूर, बीड आणि बीदर या
जिल्ह्यांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण ३० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
प्रगती सहकारी पतसंस्था पूरग्रस्तांसाठी दोन लाख रुपयांहून अधिकची मदत देणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती तसंच संचालक मंडळानं आपलं एक
महिन्याचं मानधन मुख्यमंत्री मदत निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मंजूर निधीचं वाटप करण्यात येत
आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
यांनी केलं आहे.
****
परभणीचे
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काल मानवत तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
केली. यावेळी त्यांच्या हस्ते बाधितांना धान्याचं वाटपही करण्यात आलं.
****
दरम्यान, शेतकऱ्यांना
तुटपुंजी मदत जाहीर करून राज्य सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत असल्याची टीका,
माजी मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत
बोलत होते. केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची मागणी देशमुख
यांनी केली.
****
खासदार
संदिपान भुमरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण आणि गंगापूर तालुक्यात
स्थलांतरित कुटुंबांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या. जास्तीत जास्त मदतीचं आश्वासन, भुमरे यांनी
दिलं.
****
राज्यात
पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असली, तरी धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्यापही
सुरू आहे. जायकवाडी धरणातून एक लाख ७९ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
सुरू आहे. तर, मांजरा धरणातून दोन लाख ७१ हजार ६६ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
उद्योग
क्षेत्राच्या विकासासाठी राज्यशासन राबवत असलेल्या अभिनव धोरणांमुळे संपूर्ण देशात
महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणूकीत अव्वल असल्याचं प्रतिपादन, उद्योग मंत्री
उदय सामंत यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं ऑरिक सिटीचा सहावा र्धापन दिन
तसंच समृद्धी महामार्ग ते शेंद्रा औद्योगिक वसाहत जोडमार्गाचे लोकार्पण सामंत यांच्या
हस्ते साध्या पद्धतीनं करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑरिक
सिटीचं बोधचिन्ह, संकेतस्थळ तसंच पोर्टलचं अनावरण तसंच ऑरिक सिटीच्या
सहा वर्षाच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही काल सामंत यांच्या
हस्ते करण्यात आलं. यावेळी झालेल्या निर्णयांची माहिती सामंत यांनी दिली...
बाईट - उद्योग मंत्री उदय सामंत
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत
मुदतवाढ दिली आहे. ही मुदत आज संपणार होती. बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना
१५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे तर नवीन परीक्षा केंद्रासाठी १० ऑक्टोबरपर्यंत
अर्ज करता येणार आहेत.
****
सेवा आणि
सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन
आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. 'सेवा पर्व'
या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील
सुधारणांविषयी जाणून घेऊया.
‘‘गेल्या अकरा वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दर्जेदार शिक्षण,
आधुनिक कौशल्ये, रोजगार आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी
युवकांना सक्षम करण्यासाठी समर्पित प्रयत्न केले. शाळांपासून विद्यापीठांपर्यंत आपली
शिक्षण व्यवस्था बळकट करण्यात जलद प्रगती केली. निपुण भारत मिशन, पीएम श्री योजना, यामुळे शिक्षणात लवचिकता, बहुविद्याशाखा आणि आंतरराष्ट्रीयीकरणाला प्रोत्साहन मिळत आहे. आयआयटी,
आयआयएम आणि एम्स सारख्या संस्थांमध्ये मोठ्या सुधारणा आणि विस्तार करण्यात
येत आहे.
जुलै २०२० मध्ये, सरकारनं शालेय
शिक्षण आणि तंत्र शिक्षणासह उच्च शिक्षणात विविध सुधारणा घडवून
आणण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात आणलं.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सरकारच्या प्रयत्नांमुळं, विद्यापीठं
आणि महाविद्यालयांसह उच्च शिक्षण संस्थांची संख्या २०१४-१५ मध्ये
जे ५१ हजार होती, ती यावर्षी ७० हजारांहून
अधिक झाली आहे. वैद्यकीय शिक्षणालाही चालना मिळाली. २०१४ मध्ये एम्स संस्थांची संख्या ७ होती ती वाढून आता २३ झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची
संख्या ३८७ वरून आता दोन हजारांपेक्षाही जास्त झाली आहे, यात सुमारे दोन
लाख वैद्यकीय जागा उपलब्ध आहेत.
सरकारच्या या प्रयत्नांतून
भारत आपल्या युवा लोकसंख्येला एका सशक्त आणि विकसित राष्ट्रासाठीच्या प्रेरक शक्तीमध्ये
परिवर्तित करत आहे.’’
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते काल गोंदिया इथं पत्रकारांशी बोलत
होते. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतला असल्याचं पटेल यांनी सांगितलं.
****
पदवीधर
मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला
आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, असं आवाहन
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे.
****
बंजारा
समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेड इथं काल जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तर, बीड इथं आदिवासी समाजाच्या वतीनं काल
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. धनगर, बंजारा
आणि इतर समाजांना अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये, यासह
अन्य मागण्यांचं निवेदन समाजाच्यावतीनं देण्यात आलं.
**
महिला एकदिवसीय
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका
संघात पहिला सामना होणार आहे. दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दोन नोव्हेंबरला
स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येईल.
****
शारदीय
नवरात्र महोत्सवात काल तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा
मांडण्यात आली.
****
हवामान
राज्यात
आज नांदेड जिल्ह्याला तर उद्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात
आला आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 December 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 January 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...