Wednesday, 17 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 December 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी योजना विधेयक लोकसभेत सादर, विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्याची काँग्रेसची मागणी

·      शैक्षणिक संस्थांविषयीचं विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक संसदीय समितीकडे पाठवणार, लोकसभेत प्रस्ताव मंजूर

·      महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

·      सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम, मंत्रिमंडळातून काढण्याची काँग्रेसची मागणी

आणि

·      भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज चौथा टी-ट्वेन्टी क्रिकेट सामना

****

विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी योजना – ग्रामीण, अर्थात, ‘व्हीबी जी राम जी’ हे विधेयक काल लोकसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक २० वर्षांपासून चालत आलेल्या, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ अर्थात मनरेगा ची जागा घेईल.

हे विधेयक मजुरांना पूर्वीच्या शंभर दिवसांऐवजी वर्षभरात किमान सव्वाशे दिवस कामाची हमी, चांगलं वेतन, आणि पारदर्शक अंमलबजावणी यंत्रणा प्रदान करणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत हे विधेयक सादर केलं. ते म्हणाले…

बाईट – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

 

या विधेयकाअंतर्गत पेरणी किंवा कापणीच्या हंगामात एकंदर ६० दिवसांचा कालावधी अधिसूचित करायचा अधिकार राज्यांना दिला आहे. यादरम्यान मनरेगाचं काम थांबवलं जाईल, जेणेकरून शेतीतल्या कामांना मजुरांची कमतरता भासणार नाही. पूर्वी या योजनेचा संपूर्ण निधी केंद्र सरकार द्यायचं, आता मोठ्या राज्यात ६० टक्के निधी केंद्राचा आणि उर्वरित ४० टक्के वाटा हा राज्यांचा असेल. मनरेगा कायद्यापेक्षा मोठं आणि सुधारित असलेलं हे विधेयक, मनरेगातल्या संरचनात्मक त्रुटी दूर करून विकसित भारत २०४७ च्या अनुषंगाने एक आधुनिक वैधानिक चौकट तयार करेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या विधेयकाबाबत संसद सदस्यांना माहिती देण्यासाठी आज विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.

**

दरम्यान, या मूळ योजनेतून महात्मा गांधींचं नाव काढून टाकल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली आणि हे विधेयक मागे घ्यायची मागणी केली. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी, हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या..

बाईट – काँग्रेस खासदार प्रियंका गांधी

**

विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक, २०२५, संयुक्त संसदीय समितीकडे पाठवायचा प्रस्ताव लोकसभेनं मंजूर केला. या विधेयकामुळे शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता, मानांकन, दर्जा, संशोधन यासारख्या गोष्टी मजबूत होतील. तसंच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांच्या आधारे शैक्षणिक संस्थांचं मानांकन ठरवलं जाईल, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

**

निरसन आणि सुधारणा विधेयक, २०२५ काल लोकसभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आलं. या विधेयकात कालबाह्य कायदे रद्द करण्याची तर काही कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची तरतूद असल्याचं न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं.

**

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सबका बिमा, सबकी रक्षा, विमा कायदे सुधारणा विधेयक २०२५ लोकसभेत मांडलं. यामुळं वीमा कंपन्यांमधली थेट परदेशी गुंतवणूक वाढेल, नियमन अधिक चांगलं होईल, कामकाजात पारदर्शकता वाढेल असं त्या म्हणाल्या. द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी या विधेयकातल्या, परदेशी गुंतवणूक १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध केला.

**

विनियोजन विधेयक क्रमांक चार काल संसदेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकात २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकत्रित निधीतून काही अतिरिक्त रकमेचे देयक आणि विनियोग करण्याची तरतूद आहे.

****

मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना काल जाहीर झाली. राज्यातल्या उर्वरित २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना उद्या गुरुवारी प्रसिद्ध होणार आहे.

दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असून, आठवडाभरात याबद्दलची घोषणा केली जाईल, असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसनेही आपल्यासोबत येण्याची विनंती केल्याचं राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान राज्यस्तरीय समितीनं शिक्कामोर्तब केल्याशिवाय आघाडीबाबतचा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या निवडणुकीबाबत येत्या २४ आणि २५ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा होईल, असं त्यांनी सांगितलं.

**

राज्यातल्या २९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा-महायुती विजयी होईल आणि २९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील, असा दावा, भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. जिथे भाजप मजबूत आहे तिथे भाजप आणि जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे शिवसेना निवडणूक लढवेल, असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.

**

छत्रपती संभाजीनगर इथं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची बैठक घेण्यात आली. संघटनात्मक मजबुती, कार्यपद्धती तसंच नियोजनाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

****

नांदेडच्या माजी महापौर जयश्री पावडे तसंच माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्यासह मनसेचे विनोद पावडे यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नांदेड इथं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

****

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेत सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री आरोपी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्या शिक्षेवर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.एम.बदर यांनी काल झालेल्या अंतिम सुनावणीत कोकाटे बंधूंना दोषी ठरवत, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात दिलेली, दोन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. सवलतीच्या दरात घरे मिळवण्यासाठी कोकाटे यांनी आपल्या नावावर घर नसल्याची खोटी कागदपत्रं सादर करून चार सदनिका मिळवल्याप्रकरणी ही शिक्षा झाली आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं कोकाटे यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सुनिल केदार यांना शिक्षा होताच २४ तासात त्यांची खासदारकी, आमदारकी रद्द केली होती, पण कोकाटे यांना मात्र सरकार वाचवत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

****

१९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारताने मलेशियाचा ३१५ धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकी खेळीच्या बळावर सात बाद ४०८ धावा केल्या. वेदांत त्रिवेदीने ९० तर वैभव सूर्यवंशीने ५० धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करतांना मलेशियाचा संघ ९३ धावांवर सर्वबाद झाला. २०९ धावा करणारा अभिज्ञान सामनावीर ठरला. या स्पर्धेच्या अ गटात सर्व सामने जिंकून सहा गुणांसह भारत गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला चौथा टी-२० क्रिकेट सामना आज लखनऊ इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने १०१ गीर गायींचं वाटप केलं. कळंब, भूम आणि परंडा तालुक्यांतल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना गेल्या रविवारी या गायी देण्यात आल्या.

****

स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख आणि पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या कन्या धनश्री तळवलकर यांना सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या योगदानाबद्दल, गुजरातच्या वल्लभ विद्यानगर इथल्या सरदार पटेल विद्यापीठानं मानद डि. लिट्. पदवीने सन्मानित केलं. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

****

परभणी इथं चतुरंग प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेला कालपासून सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगरच्या कवयित्री गुंजन पाटील यांनी काल या व्याख्यानमालेत "समाज माध्यमांचे महिलांच्या जीवनावर होणारे परिणाम आणि बदलते सामाजिक संदर्भ” या विषयावर आपले विचार मांडले तसंच काही कविता सादर केल्या.

****

बीड जिल्ह्यात गेवराई नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे भाऊ बाळराजे पवार यांना पोलीसांनी काल अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

****

नांदेड जिल्ह्यातली श्री क्षेत्र माळेगाव इथली यात्रा उद्यापासून सुरू होत आहे. २५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत कृषी प्रदर्शन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच कृषी आणि पशुसंवर्धन विषयक स्‍पर्धा आयोजित केल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली.

****

No comments: