Saturday, 15 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांचं प्रबोधन

·      राज्यभरात १८ जिल्ह्यांमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं दोन टप्प्यात सौरऊर्जीकरण

·      औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विहिंप तसंच बजरंग दलाचं सोमवारी आंदोलन

·      चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू

आणि

·      महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना

****

जागतिक ग्राहक हक्क दिन आज पाळण्यात आला. यानिमित्ताने आज सर्वत्र विविध कार्यक्रम घेण्यात आले. ग्राहकांनी शाश्वत जीवनशैली स्वीकारून न्याय्य पध्दतीनं वाटचाल करण्याला प्रोत्साहन द्यावं, अशी आजच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये, यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे, जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ते एका वेबिनारला संबोधित करत होते. ग्राहकांचं केवळ संरक्षणच नव्हे तर ग्राहकांची समृद्धी हे देखील सरकारचं उद्दिष्ट असल्याचं, जोशी यांनी नमूद केलं.

केंद्र सरकारच्या वतीनं जागो ग्राहक जागो हा उपक्रम राबवला जातो. ई-कॉमर्समधला अनुचित व्यापार टाळण्यासाठी, ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहक संरक्षण नियम, २०२० अधिसूचित केले आहेत. या नियमांद्वारे ई-कॉमर्स कंपन्यांची दायित्व, रूपरेषा आणि बाजारपेठेतलं त्यांचं अस्तित्व याबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे.

****

सशक्त ग्राहक हा मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया आहे. ग्राहकांच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या आणि सर्वांसाठी चांगले भविष्य घडवणाऱ्या शाश्वत जीवनशैलीसाठी आपण वचनबद्ध होऊ या, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

ग्राहक म्हणून आपण सदैव जागरूक आणि सतर्क राहणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना वस्तूंचे दर, मुदत संपण्याची तारीख, वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणं आणि पावती घेणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.

****

अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सेल्को फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील लातूरसह १८ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सौरऊर्जीकरण करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. सौरऊर्जीकरणाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यातील २५० प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्वास आले असून दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण होईल. सौर ऊर्जेच्या उपयोगामुळे राज्यात दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र ऊर्जेबाबत स्वावलंबी होणार असून, विजेच्या देयकांमध्ये मध्ये मोठी बचत होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची २४ तास अखंड वीज पुरवठ्याची गरजही यामुळे पूर्ण होणार असून, आरोग्य सेवा अधिक बळकट होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

प्रसारण सेवा वि-नियमन विधेयक संसदेत सादर करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करण्याची शिफारस संसदीय समितीने सरकारला केली आहे. या विधेयकातल्या काही तरतुदींना विरोध झाल्यामुळे याला गेल्यावर्षी स्थगिती दिली होती. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर विधेयकाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं १७ जानेवारी रोजी समितीला कळवलं होतं.

****

मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी येत्या मंगळवारी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ सचिव, तसंच आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत मतदार ओळखपत्र आधार ओळखपत्राला जोडण्याबाबतच्या मुद्यावर विस्तृत चर्चा होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

इंग्लंडच्या सेंट्रल बँकिंगने भारतीय रिझर्व्ह बँकेची डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड २०२५ साठी निवड केली आहे. बँकेने विकसित केलेल्या आणि बँकेने राबवलेल्या प्रवाह आणि सारथी या डिजिटल उपक्रमांसाठीही बँकेला पुरस्कार देण्यात आला आहे. या डिजिटल उपक्रमांमुळे कागदाचा वापर कमी झाल्याचं निरीक्षण पुरस्कार समितीनं नोंदवलं आहे. सारथी प्रक्रिया स्वयंचलित करून बँकेची कार्यक्षमता वाढवण्यास मदत झाली, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

विद्यार्थ्यांनी उद्यमशीलतेची कास धरून रोजगार निर्माते व्हावं, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथल्या लोणारा स्थित सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात आज दीक्षांत सोहळ्यात गडकरी बोलत होते. शिक्षणामुळे फक्त संबंधित विद्यार्थ्यांचाच विकास घडून येत नाही तर त्यामागे संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विकास घडून येतो, असं गडकरी यांनी नमूद केलं.  

****

मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने धोरण आखण्याची आवश्यकता ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज बारामती इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतीमधे क्रांती होत आहे, ऊस लागवडीसाठी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल असं पवार यांनी सांगितलं.

****

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यांनी सिंधुदुर्ग इथून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली, कुडाळ इथं पत्रकारांशी साधलेल्या संवादात सपकाळ यांनी, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप केला. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वापरली जाणारी भाषा दुर्देवी असल्याची टीका सपकाळ यांनी केली.

****

पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या पशुखाद्याची आवश्यकता असल्याचं, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पशुखाद्य प्रकल्पाचं भूमिपूजन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्याचा हा पथदर्शी प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मार्च रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२० वा भाग असेल. नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना येत्या २८ मार्च पर्यंत १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राज्यातील सर्व शाळांमध्ये १ ली ते ९ वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन पॅट चाचण्या एकाच वेळी घेण्याचा निर्णय शासनानं निर्गमित केला आहे. त्यानुसार शाळांनी ८ ते २५ एप्रिल दरम्यान या परीक्षा आणि चाचण्या घ्यायच्या आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं असलेली औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने परवा सोमवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन औरंगजेबची कबर त्वरित हटवण्याची मागणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर खुलताबाद इथं औरंगजेबाच्या कबरीचा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाची तुकडी या परिसरात तैनात करण्यात आल्याचं वृत्त आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील रुई, राळगा आणि वरवंटी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय, नवनिर्मित तसंच चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होवू शकलेल्या ग्रामपंचायती आणि २८ फेब्रुवारी २०२५ अखेर रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत झालेले पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी इथले रहिवासी असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज सोहळा उद्या, रविवारी क्षेत्र देहू इथं होणार आहे. यंदाचा तीनशे पंच्याहत्तरावा बीज सोहळा असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी आणि इंद्रायणी नदीकाठी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सोहळ्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ३५४ कोटी ३७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. आज विद्यापीठात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा बैठकीत अर्थसंकल्पासह विविध विषय मंजूर करण्यात आले. या बैठकीस प्र कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह वित्त आणि लेखाधिकारी सविता जंपावाड, परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांच्यासह ६२ सदस्य बैठकीस उपस्थित होते.

****

महिला प्रीमियर लीग क्रिकेट च्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉन स्टेडियम वर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आठ पैकी ५ सामने जिंकले असून गुणफरकाच्या आघाडीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग तिसऱ्या वेळी अंतिम फेरीत पोहोचला आहे.

****

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट ट्वेंटी- ट्वेंटी स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि वेस्ट इंडीज संघात होणार आहे. रायपूर इथं होणारा हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता खेळवण्यात येणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 25 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...