Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता जारी
·
स्वत:सोबत
समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा बाबासाहेबांचा विचार आत्मसात करावा- सरन्यायाधीश
भूषण गवई यांचं आवाहन
·
ग्रँडमास्टर
दिव्या देशमुख हिचा राज्यशासनाकडून सत्कार-तीन कोटी रुपये पारितोषिक प्रदान
आणि
·
नांदेड
इथं विसाव्या समरसता साहित्य परिषदेला प्रारंभ-विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता आज जारी करण्यात आला. वाराणसी इथं झालेल्या
कार्यक्रमात २० हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम,
नऊ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
थेट जमा करण्यात आली. आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान
मोदी यावेळी म्हणाले. व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य
देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान नरेंद्र
मोदी
२०१९ मध्ये पीएम किसान योजना सुरु केल्यानंतर
विरोधी पक्षांनी या योजनेबद्दल शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला,
मात्र,
सरकारनं या योजनेअंतर्गत आतापर्यंत
एकूण पावणे चार लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा केल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं. आज झालेल्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन हजार कोटींहून
अधिक रुपये प्राप्त झाले.
****
सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री
धनधान्य कृषी ही नवी योजना सुरु केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच कार्यक्रमात
सांगितलं. कृषी उत्पादनात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांसाठी ही योजना सुरु करण्यात आल्याची
माहिती पंतप्रधानांनी दिली. ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान नरेंद्र
मोदी
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्यदलाचं अभिनंदन केलं. सैन्यदलाच्या स्वदेशी
आयुधांची ताकद जगानं पाहिल्याचं मोदी म्हणाले.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान
केंद्रात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या वेळी शेतकऱ्यांना खरीप पीक,
एकात्मिक कीड व्यवस्थापन,
नियंत्रण,
रासायनिक कीटकनाशकांची फवारणी,
उपाययोजना,
खतांच्या मात्रा कशा आणी किती द्याव्यात,
कापूस,
मका, तूर, आलं, या
बाबत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. दिप्ती पाटगावकर,
डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे,
डॉ. सूर्यकांत पवार,
डॉ. भवर यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांमध्ये
मागर्दर्शन केले.
****
स्वत:सोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न
करण्याचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करण्याचं आवाहन सरन्यायाधीश
भूषण गवई यांनी केलं आहे. नागपूर इथं आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक
महोत्सवी सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करतांना सरन्यायाधीश म्हणाले –
बाईट - सरन्यायाधीश भूषण गवई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी
उपस्थित होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं
देशात समतेचं राज्य निर्माण करण्याबरोबरच, समान संधी आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यवस्था
तयार करण्याचं काम केलं, असं
मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
****
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती
ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा आज नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ
संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्या ला तीन कोटी
रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही दिव्याला ११
लाख रुपयांचे बक्षिस प्रदान करण्यात आलं. खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही तिचा सन्मान
करण्यात आला. खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सुविधा पुरवण्याचा प्रयत्न
असल्याचं सांगत दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धेत मिळविलेले देदीप्यमान यश हे देशातील
हजारो मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
****
राज्यातल्या खासगी बाजार समित्यांना
दिलेल्या वन टाईम परवान्यांबाबत पुनर्विचार सुरु असून,
केवळ शेतकऱ्यांना मूलभूत सोयी-सुविधा
उपलब्ध करणाऱ्या खासगी बाजार समित्यांच्या परवान्यांचं नूतनीकरण केलं जाईल,
असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी
म्हटलं आहे. ते आज नंदुरबार इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये
मुलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असं ते यावेळी म्हणाले. आगामी काळात एक तालुका एक बाजार समिती’
हे सरकारचं धोरण राहणार असल्याचं रावल यांनी सांगितलं.
****
निवडणूक आयोगानं मतदान केंद्रस्तरीय
अधिकाऱ्यांच्या वार्षिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा,
तसंच मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षकांच्या
मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी
यांना यावर्षीपासून मानधन देण्यात येणार आहे. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेची अचूकता,
पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी
परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचं
भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
बेंगळुरू इथं खासदार आणि आमदारांसाठीच्या
विशेष न्यायालयाने ४७ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार आणि अश्लील व्हिडिओशी संबंधित
प्रकरणात माजी खासदार प्रज्वल
रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा आणि १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. प्रज्वल रेवण्णा
हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे. त्याच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार
केल्याचा आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्याला पीडितेला सात लाख
रुपये दंड देण्याचे आदेशही दिले आहेत.
****
नांदेड इथं आज विसाव्या समरसता साहित्य
परिषदेला ग्रंथदिंडीने सुरूवात झाली. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,
ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव
कांबळे, परिषदेचे
संस्थापक सदस्य प्राध्यापक रमेश महाजन यांच्यासह विविध संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते.
समरसतेवर आधारित जीवनमूल्यांशी बांधिलकी मानणारी समाजनिष्ठ साहित्य निर्मिती करणे ही
काळाची गरज असून या संमेलनामधून सामाजिक समस्येसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचा अनुबंध
निर्माण होईल असं प्रतिपादन कांबळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी पद्मश्री
गिरीश प्रभुणे, पद्मश्री
भिकुजी दादा इदाते, प्राध्यापक
रमेश पांडव, पूर्व
संमेलन अध्यक्ष प्राध्यापक शेषराव मोरे, गोविंद नांदेडे यांचा सत्कार करण्यात आला. या दोन दिवसीय साहित्य
संमेलनात मुलाखती परिसंवाद, कवी
संमेलने, चर्चासत्रांचे
आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाणा यांच्या
उपस्थितीत उद्या दुपारी या संमेलनाचा समारोप होणार आहे.
****
परभणी शहरात यशस्विनी महिला मंचच्या
वतीनं श्रावणमासा निमित्त महिलांना बेल वृक्ष रोपांचे वाटप करण्यात येत आहे. संपूर्ण
महिनाभर हा उपक्रम सुरु राहणार असून मागेल त्यांना ही रोपे दिली जाणार आहेत अशी माहिती
यशस्विनी महिला मंचच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया पाटील यांनी दिली.
****
क्रिकेट
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम
कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आतापर्यंत १६६ धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय
संघाच्या आतापर्यंत तीन बाद १८९ धावा झाल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment