Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
· अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला
निर्देश
· नांदेड जिल्ह्यात पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले-मृतांची संख्या पाचवर
· उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना
उमेदवारी जाहीर
· सौरऊर्जा आणि विदा क्षेत्रात दहा सामंजस्य करार-सुमारे ४३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
आणि
· आशिया चषकासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाची घोषणा
****
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश
प्रशासनाला दिले असून, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी
बोलत होते. स्थानिक पातळीवर जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली असेल, तिथे जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले
–
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
दरम्यान, मुंबईसह राज्यात आजही अनेक भागात
पाऊस सुरू असून,
हवामान विभागाने मुंबईतल्या नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर
पडण्याचं आवाहन केलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई आणि ठाणे शहरातील
विविध भागांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश शिंदे
दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रात पावसाच्या
परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यभरात १० लाख एकर शेती पाण्याखाली गेल्याची माहितीही
पवार यांनी दिली.
****
नवी मुंबईत पावसाचा जोर कायम असून आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत
५० पूर्णांक ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाड्यातही अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. नांदेड जिल्ह्यातल्या
हसनाळ इथे आज सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले, पिराजी
म्हैसाजी थोटवे आणि चंद्रकला विठ्ठल शिंदे अशी मृतांची नावे आहेत. जिल्ह्यात पावसाशी
निगडित घटनांमधल्या मृतांचा आकडा आता पाच झाला आहे. मुखेड तालुक्यात मदतकार्य वेगाने
सुरू आहे. स्थानिक प्रशासनासोबत भारतीय सैन्य दल आणि एसडीआरएफ मिळून नागरिकांचं स्थलांतर
करत आहेत.
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या
आठ नागरिकांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप सुटका केली. जिल्ह्यातल्या ईसापुर
धरणाचे दरवाजे उघडून पैनगंगा नदीच्या पात्रात प्रतिसेकंद ७० हजार दशलक्ष घनमीटर वेगाने
पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
परभणी जिल्ह्यातही अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून सोयाबीन, तूर,
तसंच काढणीला आलेल्या मूग, उडीद, कापूस आदीपिकाचं मोठं नुकसान झालं आहे. प्रशासनानं या नुकसानाचे तत्काळ पंचनामे
करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानाची
दखल घेऊन केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी
खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची
भेट घेऊन,
याबाबतचं निवेदन त्यांना सादर केलं. दरम्यान, बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नागापूर धरण ओसंडून वाहत आहे, त्यामुळे परिसरातल्या गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे.
****
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली
काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्ही व्ही पॅट वापरण्याची मागणी केली. यावेळी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश
काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, आदी उपस्थित होते.
****
उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडिया या विरोधी पक्षांच्या
आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना
उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज नवी दिल्लीत
इंडी आघाडीच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या
संसदीय पक्षाची आज नवी दिल्लीत बैठक झाली.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी. पी.
राधाकृष्णन यांचा परिचय करून दिला, आणि त्यांची एकमतानं या पदावर
निवड करण्याचं आवाहन केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक आर्थिक धोरण राबवल्यामुळे
भारताची प्रतिमा जगभरात उजळल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री
अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना
त्यांनी याकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले –
बाईट - केंद्रीय
माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राजस्थानात
कोटा बुंदी इथल्या विमानतळाचा विकास तसंच ओडिशातल्या रस्ते विकास प्रकल्पाला मान्यता
दिली.
****
राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीचीही आज बैठक झाली. पुणे-लोणावळा
उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारणं, पुणे
मेट्रोच्या बालाजीनगर-बिबवेवाडी तसंच स्वारगेट-कात्रज स्थानकांची उभारणी, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान २५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग
उभारणं,
मुंबईत मेट्रो मार्गिका हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तसंच नागपूरमध्ये
एक नवनगर तयार करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच रुग्णालयातील गट-क संवर्गातील
विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यासही
मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
****
सौरऊर्जा आणि विदा क्षेत्रात आज दहा सामंजस्य करार करण्यात आले.
या करारांमुळे राज्यात ४२ हजार ८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून २५ हजार ८९२
रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
****
यंदापासून राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या
बोधचिन्हाचं अनावरण आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या
हस्ते करण्यात आलं.
****
ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांच्या पार्थिव देहावर आज ठाण्यात
अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पोतदार यांचं काल ठाण्यात निधन झालं. ते ९१ वर्षांचे
होते. प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ करणारे पोतदार यांनी सैन्यदलात
कॅप्टन म्हणून कर्तव्य बजावत निवृत्ती घेतली. १९८० पासून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण
केलं. आक्रोश,
अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, ‘अर्धसत्य’,
‘तेजाब’, ‘प्रहार’, ‘रंगीला’,
‘परिणीता’ आणि ‘थ्री ईडियट्स’ अशा सुमारे सव्वाशे चित्रपटातून
त्यांनी विविध भूमिका साकारल्या. ९५ दूरचित्रवाहिनी मालिका तसंच २६ नाटकांमधूनही पोतदार
यांनी काम केलं होतं.
****
निस्वार्थ भावना समोर ठेवत प्रामाणिकपणे धोरणात्मक काम केल्यास
सहकार क्षेत्र टिकून राहील, असा विश्वास, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथे
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बागडे बोलत
होते. आमदार अब्दुल सत्तार, आमदार अनुराधा चव्हाण, बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे, यांच्यासह संचालक आणि अधिकारी
कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
****
आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली.
सूर्यकुमार यादव कर्णधार तसंच शुभमन गिल उपकर्णधार असलेल्या या संघात शुभम दुबे, तिलक वर्मा,
कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, हर्षित राणा, अभिषेक शर्मा, जितेश
शर्मा,
जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल,
अर्शदीप सिंह, रिंकू सिंग आणि वरुण
चक्रवर्ती यांचा समावेश आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. टी-२० स्वरूपात खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी
भारताची पहिली लढत पाकिस्तानसोबत होणार आहे.
****
कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने नियुक्त केलेली निवृत्त
न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
वैजापूर इथे संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. परवा २१ ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालयात
शिंदे समिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
****
राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी
विभागातील रिक्त जागा भरण्याची कारवाई पूर्ण करावी अशी मागणी परभणीचे आमदार डॉ.राहुल
पाटील यांनी केली आहे. कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांनी पाटील यांच्या नेतृत्वात या मागणीचं
निवेदन आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सादर केलं.
****
No comments:
Post a Comment