Thursday, 30 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 October 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारताचं वर्चस्व प्रस्थापित-केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांचं प्रतिपादन

·      शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता उत्पादक व्हावं-केंद्रीय कृषीमंत्र्यांचं आवाहन 

·      कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सीसीआयकडून कापूस किसान मोबाईल ॲप विकसित

·      नांदेड जिल्ह्यातील गेल्या २४ तासात नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद

आणि

·      महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात उपांत्य लढत सुरू

****

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आयोजनाविषयी अधिक माहिती देणारा हा वृत्तांत

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैदराबादसह देशभरातल्या सुमारे सहाशे संस्थानांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया कणखरपणे पूर्ण करणारे लोहपुरुष सरदार पटेल हे भारताच्या एकतेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांची जयंती दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. सरदार पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीचं औचित्य साधून यंदा देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. गुजरातमधे केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या स्मारकापाशी प्रजासत्ताक दिन संचलनाच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एकता संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संचलनात विविध राज्यांची पोलिस दलं तसंच चित्ररथ सहभागी असतील. एकतेचा धागा या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथही यात सहभागी होणार आहे. या महोत्सवात येत्या ७ आणि ८ नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमातही महाराष्ट्राच्या लोकपरंपरा दाखवणारं १५ ते २० कलाकारांचं सादरीकरण होणार आहे.

राज्यात ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात पदयात्रा, निबंध वादविवाद स्पर्धा, चर्चासत्र, पथनाट्य अशा विविध आविष्कारातून सरदार पटेल यांच्या जीवनकार्याची ओळख करुन दिली जाईल या उपक्रमात युवकांनी भाग घ्यावा असं आवाहन राज्यशासनानं केलं आहे.

****

जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केल्याचं प्रतिपादन केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज मुंबईत भारत नौवहन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गेल्या अनेक शतकांपासून भारतीय व्यापारी समुद्रमार्गे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते असं ते म्हणाले. अमृत काळात नौवहन क्षेत्रातल्या भारतीय पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करुन घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.

बाईट - केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय

****

शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता उत्पादक व्हावं, असं आवाहन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत कृषी उत्पादक संघटनांच्या संमेलनात आज ते बोलत होते. आतापर्यंत कृषी उत्पादक संघटनामधे ५२ लाख शेतकरी सदस्य आहेत, आता एका वर्षात २ कोटी शेतकरी सदस्य व्हावेत असं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे, असं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान

****

 

प्रामाणिकपणा आणि संघर्षातून माजी राज्यपाल रा.सू. गवई यांनी पुढच्या अनेक पिढ्यांसमोर आदर्श निर्माण केल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमरावती विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या रा.सू. गवई यांच्या स्मारकाच्या अनावरण प्रसंगी, फडणवीस बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

देशभरातल्या १८ प्रकारच्या वजनं आणि मापन उपकरणांच्या तपासणीची प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सोपी करण्यासाठी केंद्र सरकारने मेट्रोलॉजी नियम २०१३ मध्ये सुधारणा केल्या आहेत. काही खासगी प्रयोगशाळा आणि उद्योगांनाही सरकारमान्य परीक्षण केंद्र म्हणून मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

****

मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी शिकवणी वर्गाची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने एक समिती गठित करावी आणि खासगी कोचिंग क्लासची तपासणी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा असे, निर्देश विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले आहेत. मुंबई इथं झालेल्या एका बैठकीत शिंदे बोलत होते. शिकवणी सुरू असलेली जागा, अग्निसुरक्षा, पार्किंगची व्यवस्था, कमी शुल्क दाखवत कर चोरी आदींची तपासणी करावी, असे निर्देशही शिंदे यांनी दिले.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. याबाबतचा आदेश निवडणूक आयोगाने जारी केला आहे. बृहन्मुंबईसह अ, , क आणि ड वर्ग महापालिका तसंच याच वर्गवारीनुसार नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चमर्यादा निर्धारित करून दिल्या आहेत.

****

 

निवडणूकीसंदर्भात नागरिकांच्या शंका आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगानं राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेल्पलाइन सक्रिय केल्या आहेत. राष्ट्रीय संपर्क केंद्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाइन म्हणून काम करेल. ते दररोज सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १८००-११-१९५० या टोल-फ्री क्रमांकाद्वारे कार्यरत राहणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.

****

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय कापूस महामंडळ- सीसीआयने कापूस किसान मोबाईल ॲप’ सुरू केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नाव नोंदणी, वेळ निर्धारण प्रक्रियेसाठी मदत होणार आहे. हे ॲप कापूस हंगामात २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार आहे. या प्रक्रियेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कापस किसान ऑफिसियल या युट्युब संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन कापूस महामंडळानं केलं आहे. राज्यात अकोला आणि छत्रपती संभाजीनगर शाखांसाठी स्लॉट बुकिंगची वेळ दररोज सकाळी १० वाजता सुरू होईल, अशी माहिती पणन महासंघाच्या वतीने दिली आहे.

****

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे. मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत भुसे बोलत होते. शालेय पोषण आहार कामगारांना सध्या अडीच हजार रुपये मानधन दिलं जातं. 

****

राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने पशुपालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागेल, असा विश्वास, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी वर्तवला आहे.

आता वीजदरात सवलतीचा लाभ देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून यामुळे पशुपालकांना वीज दर सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित पशुपालन प्रकल्पांनी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. 

****

अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक असून,  त्यांच्यासाठी डीबीटी प्रणालीद्वारे तात्काळ आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाने सादर करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत गोऱ्हे बोलत होत्या. शासनाने तातडीने उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं गोऱ्हे म्हणाल्या.

****

नांदेड जिल्ह्यातील गेल्या २४ तासात नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक १०३ पूर्णांक ७५ मिलीमीटर पाऊस हा हिमायतनगर तालुक्यातल्या जवळगाव महसूल मंडळात झाला आहे. हदगाव तालुक्यातील तळणी, तामसा, आष्टी, भोकर तालुक्यातील भोकर, मोघाळी, मातूळ, हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर, जवळगाव आणि सरसम या नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत १२२० पूर्णांक ३० मिलीमीटर पाऊस झाला असून, एकूण १३७ पूर्णांक ३० टक्के पाऊस झाला आहे.

****

महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबई होत असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने ४० षटकांत पाच बाद २५३ धावा केलेल्या आहेत. भारताकडून श्रीचरिणीने दोन, क्रांती गौड अमनज्योत तसंच राधा यादवने प्रत्येकी एक बळी घेतला.

****

राज्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी केलेल्या वाहनाला बुलडाणा जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेगावच्या संत श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी ११ लाख रक्कमेचा धनादेश दिल्यानंतर खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पुरग्रस्तांसाठी ५१ लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे याबाबतचा धनादेश सुपुर्द केला.

****

No comments: