Thursday, 30 October 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      जागतिक सागरी व्यापारासाठी भारतीय बंदरं अधिक कार्यक्षम आणि आकर्षक-मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      छत्रपती संभाजीनगराचा इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनांचं हब म्हणून विकास-नीति आयोगाच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती

·      खरीप हंगामात सोयाबीन, उडीद मूग खरेदीसाठी नोंदणी सुरू-१५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी

·      राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत ३०१ कोटी रुपये उत्पन्न

आणि

·      मोंथा चक्रीवादळामुळे मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद-छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांना आज यलो अलर्ट

****

जागतिक सागरी व्यापारासाठी भारतीय बंदरं अधिक कार्यक्षम आणि आकर्षक झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला संबोधित करत होते. कालबाह्य सागरी व्यापारी कायदे रद्दबातल करून, २१ व्या शतकाशी सुसंगत कायद्यांची निर्मिती केल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले..

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

जेएनपीटी बद्दल बोलतांना पंतप्रधानांनी हे बंदर देशातलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट झाल्याचं नमूद केलं. बंदरांच्या पायाभूत सुविधा बांधणीत सर्वात मोठ्या थेट परकीय गुंतवणुकीमुळे हे शक्य झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले..

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

महाराष्ट्र देशाचं डेटा सेंटर हब झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात नीति आयोगाच्या परिषदेत ते बोलत होते. मुंबई आणि पुणे उद्योगक्षेत्रावरील ताण कमी करत छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनांचं हब म्हणून विकसित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

जगातली पहिली औद्योगिक उत्पादन संस्था महाराष्ट्रात उभारण्याचा नीती आयोगाचा मानस असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

****

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी चर्चेसाठी मुंबईत यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. कडू यांच्या नेतृत्वात नागपुरात महाएल्गार आंदोलन सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काल बोलत होते.

****

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी कालपासून नोंदणी सुरू झाली असून १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांनी गर्दी टाळण्यासाठी नोंद केलेल्या वेळेवर आपला शेतमाल केंद्रावर नेण्याचं आवाहन रावल यांनी केलं आहे.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाहीत असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेली मतदान यंत्रं विकसित करण्याबाबत देशातील सर्व राज्य निवडणूक आयोगांची समिती अभ्यास करत आहे, तिचा अहवाल अद्याप न आल्यानं या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर शक्य नाही असं आयोगानं म्हटलं आहे. दरम्यान, मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांच्या तपासणीचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

****

राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत ३०१ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत ते ३७ कोटी रुपयांनी जास्त आहे. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळालं, आतापर्यंतचं हे सर्वाधिक उत्पन्न आहे.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. उदगीर इथं उदयगिरी औद्योगिक वसाहतीतल्या एका कार्यक्रमात सहभागी होऊन रात्री ते विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर तसंच ७ नोव्हेंबर रोजी भव्य पदयात्रेसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या उपक्रमांची माहिती देत, जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

बाईट - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात रस्ते दुरुस्तीसाठी सहा कोटी १९ लाख रुपये निधी मंजूर झाला. आमदार अनुराधा चव्हाण यांनी ही माहिती दिली.

****

आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांसाठी ओबीसी बांधवांच्या वतीने काल नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाला संबोधित केलं. अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

****

फलटण इथल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केलं.

****

 

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला कालपासून सुरूवात झाली. कॅनबेरा इथल्या ओव्हल मैदानावरचा पहिला सामना काल पावसामुळे रद्द झाला. मालिकेतला दुसरा सामना उद्या मेलबर्न इथं खेळवला जाणार आहे.

 

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिका संघानं इंग्लंडचा १२५ धावांनी पराभव करत प्रथमच अंतिम फेरी गाठली. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे. नवी मुंबईत डी वाय पाटील मैदानावर दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोंथा चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे. मात्र या वादळामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक २७ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाल्याचं वृत्त आहे. यात तीन मंडळांमध्ये आतापर्यंत १०० मिलीमिटरपेक्षा अधिक पाऊस झाला. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेलं सोयाबीन, या पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

आजही विदर्भ आणि खानदेशासह मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान विभागात जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजातून सुमारे १९ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. माजलगाव धरणातून दोन हजार, निम्न दुधना साडे सहा हजार, तर इसापूर धरणातून साडे आठ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. नदीकाठालगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

No comments: