Sunday, 26 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 October 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सर्वज्ञ चक्रधर स्वामींची समाजात समता स्थापन करण्याची विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्त्वाची-अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुनरुच्चार

·      छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाला आरक्षणासाठी CPSN हा नवीन सांकेतांक

·      हिंगोली जिल्ह्याच्या वसमत कळमनुरी आणि औंढा तालुक्यांना भूकंपाचा धक्का

आणि

·      तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर नऊ गडी राखून विजय

****

सर्वज्ञ चक्रधर स्वामींची समाजात समता स्थापन करण्याची विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक इथं, अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनात ते काल बोलत होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं योगदान महत्त्वाचं होतं, असं सांगत, रिध्दपूर इथं स्थापन मराठी भाषा विद्यापीठ जागतिक कीर्तीचं व्हावं, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली, ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शीख धर्मियांचे गुरु श्री तेग बहादुर साहेब यांच्या साडे तीनशेव्या हौतात्म्य दिनानिमित्त काल मुंबईत झालेल्या शहिदी समागम या कार्यक्रमातही मुख्यमंत्री सहभागी झाले. राज्यातल्या घराघरांत गुरु तेगबहादूर साहेब यांची बलिदाना गाथा पोहोचवणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी होणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. ते काल नांदेड जिल्ह्यात उमरी इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. कर्जमाफीसाठी स्थापन समितीकडून याबाबत अभ्यास सुरू असल्याचं पवार यांनी सांगितलं. आपल्या पक्षाची भूमिका ही सर्व जाती वर्गाला सामावून घेणारी असून, फुले, शाहू, आंबेडकरी विचारावरच आपला पक्ष वाटचाल करत असल्याचं पवार यांनी नमूद केलं.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी तसंच महायुती ही विचारांची युती असून महायुतीत बेबनाव नसल्याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा १२७ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

****

एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युपीएस अर्थात युनिफाइड पेन्शन योजनेतल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आता Life Cycle 75 आणि Balanced Life Cycle या पर्यायांचा अवलंब करता येणार आहे. आतापर्यंत फक्त खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना या सुविधा उपलब्ध होत्या. LC 75 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंतची गुंतवणूक शेअर बाजारात करता येईल. हे नवे पर्याय खुले झाल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना युपीएस आणि एनपीएसमधल्या गुंतवणुकीसाठी अधिकाधिक मार्ग उपलब्ध होणार आहेत.

****

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते मूत्रपिंड विकाराने त्रस्त होते. 'जाने भी दो यारो, शक्ती, हम आपके है कौन, हम साथ साथ हैं, मैं हूं ना, कल हो ना हो, फना, ओम शांती ओम आणि इतर चित्रपटांसह दूरचित्रवाणीच्या अनेक मालिका, अनेक जाहिरातपट तसंच विविध नाटकांतूनही त्यांनी काम केलं होतं. साराभाई वर्सेस साराभाई मालिकेतील इंद्रवदन ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा रसिकांच्या आजही स्मरणात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतीश शाह यांना श्रद्धांजली अर्पण करतांना, सहज-सुंदर अभिनयातून साकारलेल्या भूमिकांच्या माध्यमातून ते रसिकांच्या मनात चिरंतन राहतील, अशी भावना व्यक्त केली.

****

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक करण्याची प्रक्रिया रेल्वे विभागाने पूर्ण केली. याबाबतचं परिपत्रक जारी झालं आहे. आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा पूर्वी असलेला AWB हा सांकेतांक आता CPSN असा करण्यात आला आहे. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केलं आहे.

****

विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली आहे. लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ इथं कर्मयोगी प्रभाकर कुलकर्णी गुरुजी जीवनगौरव सोहळ्यात बागडे काल बोलत होते. बागडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभाकर कुलकर्णी गुरुजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुमन कुलकर्णी यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. 'असा एक प्रभाकर' या गौरव ग्रंथाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यात काल दुपारी भूकंपाचा धक्का जाणवला. भूगर्भातून मोठा आवाज येऊन जमीन हादरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. या तीन तालुक्यातील २५ ते ३० गावात सलग दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला असून, रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ९ एवढी नोंदवली गेल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली.

****

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जालना इथं गेल्या नऊ दिवसांपासून विजय चव्हाण याचं सुरू असलेलं उपोषण काल मागे घेण्यात आलं. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह शिष्टमंडळानं काल चव्हाण यांची भेट घेऊन मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर चव्हाण यांनी उपोषण मागे घेतलं.

****

सातारा जिल्ह्यात फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला पुणे जिल्ह्यातल्या एका फार्म हाऊसवरून अटक केली. या प्रकरणातला दुसरा फरार पोलीस उपनिरीक्षक काल रात्री फलटण पोलिस ठाण्यात हजर झाल्याचं वृत्त आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. राम माने आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला माने यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं अपघाती निधन झालं. पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिव देहावर आज धाराशिव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं राज्यातल्या पहिल्या एनसीसी अकादमीचं काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. या अकादमीसाठी १२७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचं कोकाटे यांनी सांगितलं. विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत मराठवाडा विभागाचा युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमही कोकाटे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं काल पार पडला.

****

भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेत काल अखेरच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखत पराभव केला. ऑस्ट्रेलियानं ४६ षटकं आणि चार चेंडूत २३६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळतांना कर्णधार शुभमन गिल २४ धावांवर बाद झाला, मात्र रोहित शर्मानं शतक तर विराट कोहलीनं अर्धशतक झळकावलं. यामुळे भारताला निर्धारित लक्ष्य सहज साध्य करता आलं. दरम्यान तीन सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलियानं २-१ अशी जिंकली आहे.

या दोन्ही संघादरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेला येत्या बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. पहिला सामना कॅनबेरा इथल्या ओव्हल मैदानावर होणार आहे.

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारताचा आज बांगलादेशसोबत सामना होणार आहे. दरम्यान, भारतानं उपांत्य फेरीत या पूर्वीच प्रवेश केला असून, मालिकेतला दुसरा उपांत्य सामना येत्या ३० तारखेला नवी मुंबईत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे.

****

धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विहित कालमर्यादेच्या आत हे सगळे रस्ते दर्जेदाररित्या पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

****

हवामान

आगामी २-३ दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता इतर सर्वत्र हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. बीड जिल्ह्यातही २४ ऑक्टोबरपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात कालही अवकाळी पावसाने हजेरी लावली.

****

No comments: