आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Wednesday, 1 October 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 01 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हा फक्त योगायोग नसून, हजारो वर्षांच्या परंपरेचं पुनरुत्थान-संघ शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांचं
प्रतिपादन
· केंद्रीय मंत्रिमंडळाची एक लाख वीस हजार कोटी रुपयांच्या विविध निर्णयांना
मान्यता
· एसटीची दिवाळीतली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचे निर्देश
· शून्य शिल्लक सुविधा असणाऱ्या ग्राहकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा
मोफत देण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय
आणि
· उद्या विजयादशमी-नागपुरात दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी दाखल होण्यास प्रारंभ
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हा फक्त योगायोग नसून, हजारो
वर्षांच्या परंपरेचं पुनरुत्थान असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीपूर्तीच्या पार्श्वभूमीवर
आज नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात संघ स्थापनेबद्दल बोलतांना पंतप्रधान
म्हणाले...
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
संघ शताब्दीनिमित्त एका विशेष टपाल तिकीटाचं तसंच नाण्याचं
प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह
दत्तात्रय होसबळे यावेळी उपस्थित होते. कोणा व्यक्तीला नव्हे तर भगव्या झेंड्याला
गुरू मानणाऱ्या आणि राष्ट्र प्रथम या धेय्याने कार्य करणाऱ्या संघ स्वयसेवकांनी, संघाच्या
स्थापनेपासून आजवर अनेकदा आपत्तीच्या वेळी स्वयंस्फुर्तीने मदतकार्यात सहभाग घेतला
आहे. संघाच्या विविध शाखा समाजात आरोग्य, शिक्षण, क्रीडा
आणि इतर अनेक क्षेत्रात निस्वार्थ भावनेनं कार्यरत आहेत.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज एक लाख वीस हजार कोटी रुपयांच्या
विविध निर्णयांना मान्यता दिली. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात
तीन टक्के वाढ,
कडधान्य उत्पादन वाढीसाठी विशेष योजना, रबी
हंगामातल्या धान्यांसाठी किमान हमी भावात वाढ, आदी निर्णयांचा समावेश आहे.
केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर
पत्रकार परिषदेत या निर्णयाबांबत माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट
- केंद्रीय
माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
****
गेली अनेक वर्ष रखडलेली राज्यसरकारची अनुकंपा भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या चार ऑक्टोबरला पाच
हजार १८७ अनुकंपा उमेदवारांना तसंच इतर पाच हजार १२२ उमेदवारांना नियुक्तांनाही
प्रमाणपत्र दिली जाणार आहेत
****
राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य
परिवहन महामंडळ-एसटीची यंदा दिवाळीतली प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचे
निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज मुंबईत वार्ताहरांशी
बोलतांना शिंदे यांनी,
आपण परिवहन मंत्र्यांना असे निर्देश दिल्याचं सांगितलं. ते
म्हणाले...
बाईट
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
****
शून्य शिल्लक - झिरो बॅलन्स सुविधा असणाऱ्या बँक
खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय रिझर्व्ह
बँकेनं घेतला आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईत ही माहिती
दिली. विविध २२ सुधारणाही मल्होत्रा यांनी जाहीर केल्या.
दरम्यान, बँकेनं रेपो दर पाच पूर्णांक पाच
टक्क्यांवर कायम ठेवला आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी महागाईचा दर दोन पूर्णांक ६
टक्के एवढा राहिल,
असा अंदाज बँकेच्या पतधोरणा आढाव्यात वर्तवण्यात आला आहे.
****
ग्राहकांची बंद पडलेली बँक खाती तसंच कोणताही दावा न
करण्यात आलेल्या ठेवी आणि रक्कमा ग्राहकांना परत मिळाव्यात यासाठी भारतीय रिझर्व्ह
बँकेनं एक योजना जाहीर केली आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत या योजनेचा ग्राहकांना
लाभ घेता येणार आहे.
****
नवरात्रोत्सवात महानवमीचा उत्सव आज श्रद्धेनं साजरा झाला.
ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये आज पूर्णाहुती देण्यात आली. अंबेजोगाईमधल्या श्री
योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची पुर्णाहुतीनं सांगता झाली. विजया दशमीचा सण
उद्या साजरा होत आहे. यानिमित्तानं बाजारपेठांमध्ये झेंडूच्या फुलांची मोठी आवक
झाली आहे.
****
६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उद्या नागपूरमध्ये साजरा होणार
आहे. यानिमित्त बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दीक्षा भूमीवर दाखल
होण्यास सुरुवात झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे
अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुराई ससाई यांच्या हस्ते आज दीक्षाभूमी परिसरात
पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दीक्षाभूमी इथल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केलं. उद्या सकाळी नागपूरच्या
रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाला कोविंद प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
****
सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर
प्रयत्नरत आहे. 'सेवा पर्व'च्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं सीमांच्या पलीकडं जाऊन भारताची
ओळख एक विश्वासू मित्र आणि जागतिक संकटाच्या वेळी प्रथम प्रतिसाद देणारे राष्ट्र
अशी निर्माण केली आहे,
त्याविषयी जाणून घेऊ..
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली,
भारत आपल्या सीमा ओलांडून संकटांत असणाऱ्या देशांना प्रथम प्रतिसाद देणारा देश आहे. गेल्या पाच वर्षांत, भारतानं १५० हून अधिक देशांमध्ये
मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणात मदत केली आहे.
साथीच्या आजारांपासून ते नैसर्गिक आपत्तींपर्यंतच्या संकटांना तोंड देण्यासाठी
वैद्यकीय पथकं,औषध पुरवठा आणि तज्ज्ञ
मनुष्यबळ तैनात केलं आहे.
साथियों, दुनिया मे कोई भी
मुश्कील आती है, तो भारत विश्वबंधु के तौर पर फर्स्ट रिस्पॉन्डर बन के वहा पहुँचता
है। आप को कोरोना का समय याद होगा, उस समय दुनिया मे कितना
हाहाकार मचा था। हर देश वैक्सीन के लिये परेशान था। संकट के उस घडी में, भारत
ने ठाना, के जादा जादा से जादा देशों को, वैक्सीन दी जायेगी।
कोविडच्या संकटकाळात भारतानं लस मैत्री उपक्रम सुरू
केला. युक्रेनमधील ऑपरेशन गंगा ते सुदानमधील ऑपरेशन कावेरी आणि इस्रायलमधील ऑपरेशन
अजयपर्यंत, भारत
जलद प्रतिसाद देणारा देश राहिला आहे. भारत केवळ आपल्या नागरिकांनाच नाही तर
परदेशी नागरिकांनाही मदत करत आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून परतलेल्या एका निर्वासितानं सांगितलं की, कितीही गंभीर परिस्थिती असली तरी सरकारवर त्याचा
पूर्ण विश्वास आहे...
निर्वासित - बाईट
येमेनमध्ये
अडकलेल्या ४ हजार ७०० हून अधिक भारतीय
आणि दोन हजार परदेशी नागरिकांना
भारताने ऑपरेशन राहतच्या माध्यमातून मदत केली. मादागास्करला तांदूळ पाठवणे असो, उत्तर कोरियाला टीबीवरील औषधी पाठवणे असो, किंवा प्रशांत महासागरातील टोंगा आणि भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला मदत पाठवणे असो, भारत हे काम विवेकबुद्धी आणि सन्मानानं करत आहे. संकटांना प्रतिसाद देऊन, भारत एक जागतिक मित्र- विश्वबंधू म्हणून उदयास आला आहे.
****
प्रत्येक नागरिकाने जलसाक्षर होण्यात तसंच जलसंधारणाचं
महत्त्व समजून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मृद आणि जलसंधारण
मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं भूमी आणि जल
व्यवस्थापन संस्था- वाल्मीच्या ४६ व्या स्थापना दिन सोहळ्यात बोलत होते.
वाल्मीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी
ग्वाही राठोड यांनी यावेळी दिली.
****
लोकसहभागातून आदर्श तसंच जलसमृध्द
गावाची उभारणी करण्याचं आवाहन, जलजीवन मिशनच्या प्रकल्प
संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनी केलं आहे. त्या आज
छत्रपती संभाजीनगर इथं प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होत्या.
****
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना वेळीच मदत मिळावी अशी
मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते आज बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
यांची भेट घेतल्यानंतर बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी
पूरग्रस्तांसाठी आपला एका दिवसाचा पगार मदत म्हणून दिला आहे. पन्नास लाख रुपये
मदतीचा धनादेश मुख्यमंत्री मदतनिधीत जमा करण्यात आला.
****
हवामान
राज्यात आज नांदेड जिल्ह्याला तर उद्या नांदेड, परभणी, हिंगोली
आणि लातूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 01.10.2025 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 October 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर
वर्षांचा गौरवशाली प्रवास हा त्याग, निःस्वार्थ सेवा, राष्ट्रनिर्माण
आणि शिस्त यांचं अनोखं उदाहरण आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात
आज ते बोलत होते. शतकापूर्वी संघाची झालेली स्थापना ही प्रत्येक कालखंडातील आव्हानांना
तोंड देण्यासाठी उभ्या राहिलेल्या राष्ट्रीय अस्मितेच्या चिरस्थायी भावनेचं प्रतिबिंब
आहे. संघाचे स्वयंसेवक देशसेवा आणि समाजाच्या सक्षमीकरणासाठी अथकपणे समर्पित आहेत,
असं पंतप्रधान म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या देशाप्रती असलेल्या योगदानाबद्दल विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं
अनावरण करण्यात आलं. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची याप्रसंगी
उपस्थिती होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
महानवमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. महानवमी सर्वांच्या जीवनात सौभाग्य, समृद्धी आणि यश घेऊन येवो, असं त्यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात
कोणताही बदल केला नाही. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या
निर्णयांची आज माहिती दिली. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या
पतधोरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय
घेण्यात आल्याचं संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रेपो दर पाच पूर्णांक पाच टक्क्यांवर
कायम ठेवण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष २०२६ साठी महागाईचा दर
दोन पूर्णांक ६ टक्के एवढा राहिल, असा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी हा दर तीन पूर्णांक एक टक्के
राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. जीएसटी दरांच्या सुसूत्रीकरणामुळं जागतिक व्यापार
आणि इतर अनिश्चिततेशी संबंधित समस्या दूर होतील, असं मल्होत्रा
म्हणाले.
****
ग्राहकांची बंद पडलेली बँक खाती
तसंच कोणताही दावा न करण्यात आलेल्या ठेवी आणि रक्कमा ग्राहकांना परत मिळाव्यात यासाठी
भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक योजना जाहीर केली आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत या योजनेचा
ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. ग्राहकांनी त्यांची निष्क्रीय बँक खाती सक्रीय करावीत
आणि बँकेत असलेल्या आणि दावा न केलेली रक्कम किंवा ठेवी त्यांना परत मिळाव्यात या उद्देशाने
ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
****
मध्य रेल्वेनं स्वदेशी रेल्वे सुरक्षा
प्रणाली कवच पनवेल रोहा रेल्वेमार्गावर यशस्वी चाचणी केली. चार हजार किलोमीटर लांबीच्या
रेल्वेमार्गाच्या जाळ्यात कवच तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण
पाऊल आहे.
****
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानीचे पंचनामे तसंच मदत वाटपाचा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे
भोसले यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा
घेतला. पूरग्रस्त भागात स्वच्छता, आरोग्य विषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवा अशा सूचना त्यांनी केल्या.
****
सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात
वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा दर एक लाख १७ हजार ६२० रुपये आहे. तर, १० ग्रॅम चांदीचा दर एक हजार ४३८ रुपये
एवढा आहे.
****
राज्यात पावसानं काही प्रमाणात उघडीप
दिली असली, तरी
धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे. मांजरा धरणातून नदीपात्रात तीन हजार ४९४
घनफूट प्रतिसेकंद, तर जायकवाडी धरणातून विसर्ग कमी करण्यात आला
असून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
राज्यातलं शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचं
श्रद्धास्थान असलेल्या अंबेजोगाईमधल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची
रात्री पुर्णाहुतीनं सांगता झाली. बीडच्या अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी जिरगे यांनी
सहकुटुंब, देवीची
विधीवत महापुजा केली. या महापुजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
****
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत
आज इंदोर इथं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघादरम्यान सामना होणार आहे. काल झालेल्या
सलामीच्या लढतीत भारतीय संघानं श्रीलंकेवर विजय मिळवला. भारतीय संघाचा पुढला सामना
रविवारी पाकिस्तानविरुद्ध कोलंबो इथं खेळवण्यात येणार आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 October
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची आज माहिती दिली.
रेपो दरात कोणताही बदल केला नाही. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या
पतधोरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय
घेण्यात आल्याची माहिती संजय मल्होत्रा यांनी दिली. रेपो दर पाच पूर्णांक पाच टक्क्यांवर
कायम ठेवण्यात आलेला आहे. वस्तू आणि सेवा करातील दर कपात केल्यामुळे ग्राहकांना दिलासा
मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, शिरीष चंद्र मुर्मु यांची भारतीय रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर या पदावर
नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. शिरीष चंद्र मुर्मू सध्या
रिझर्व्ह बँकेत कार्यकरी संचालक पदावर कार्यरत आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होत आहेत. संघाचा वारसा, सांस्कृतिक योगदान आणि देशाच्या एकतेप्रति संघाची भूमिका याबद्दल या सोहळ्यात
माहिती विषद करण्यात येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देशाप्रति योगदान प्रदर्शित
करणाऱ्या विशेष टपाल तिकिटाचं तसंच नाण्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते या सोहळ्यात
करण्यात येणार आहे.
****
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई
देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, त्याप्रमाणे विभागाने गतीने कार्यवाही सुरु केली असून पुढील तीन ते चार दिवसात
नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई जमा करण्यावर विभागाचा भर असल्याचं प्रधान सचिव
विनिता सिंघल यांनी सांगितलं आहे.
दरम्यान शेतकऱ्यांसाठी पीक
पाहणीला महिनाभर मुदतवाढ देण्यात आली असून येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी करण्या
संदर्भातले आदेश महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जारी केले आहेत, या पाहणीचा रोज आढावा घ्यावा, तसंच ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी
पीक पाहणीची शंभर टक्के तपासणी करावी असं या निर्देशात म्हटलं आहे.
****
नागपूरच्या दीक्षाभूमीत एकोणसत्तराव्या
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या २ ऑक्टोबर रोजी मुख्य सोहळा होणार आहे. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या
हस्ते आज दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण करण्यात
आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार
अर्पण केला. काल ३० सप्टेंबर पासूनच दिक्षाभूमीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं आहे. अनुयायांच्या सोयीकरिता नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, मध्य रेल्वे तसंच नागपूर मेट्रो रेल्वेने देखील सुविधा सुनिश्चित केल्या आहेत.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते सार्ध शताब्दी महोत्सवाच्या 'वंदे मातरम' गीताच्या बोधचिन्हाचं अनावरण काल करण्यात आलं. देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं
प्रतीक असलेल्या 'वंदे मातरम' गीताला येत्या
७ नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने सार्ध शताब्दी महोत्सव समितीच्या
माध्यमातून देशभक्तीवर विविध कार्यक्रम होणार असून यात प्रामुख्याने 'वंदे मातरम' गीताचं प्रत्येक तालुक्यात समूहगान होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा
निर्णय घेतला असून त्यापोटी ५० लाख रुपयांचा
धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केला आहे.
****
शारदीय नवरात्रोत्सवात आज महानवमी
साजरी होत आहे. उद्या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. काल महाअष्टमीसाठी अनेक मंदिरात
महिलांची मोठी गर्दी होती. श्री तुळजाभवानी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा
काल संपन्न झाली.
उद्या साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीच्या
म्हणजे दसऱ्याच्या सणाचा उत्साह सर्वत्र बघायला मिळत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक
असलेला हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
****
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल
कर्डीले यांनी काल माहूर इथं विविध विकास कामांचा आढावा घेतला. भाविकांच्या सोयीसाठी
स्काय वॉकचं काम दिवाळीपूर्वी सुरू होणार आहे.
भाविकांच्या सुविधेसाठी व्यापारी संकुल, पार्किंग सुविधा
आणि निवास व्यवस्था यांच्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
बीड विधानसभेचे आमदार संदीप
रवींद्र क्षीरसागर यांची डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर नामनियुक्ती करण्यात आली आहे.
****
अखिल भारतीय किसान सभेच्या
वतीने काल छत्रपती संभाजीनगर इथल्या विभागीय आयुक्त कायार्लयावर मोर्चा काढण्यात आला.
अतिवृष्टीग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
****
राज्यात पावसानं काही प्रमाणात
उघडीप दिली असली, तरी धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे. मांजरा
धरणातून नदीपात्रात तीन हजार ४९४ घनफूट
प्रतिसेकंद, तर जायकवाडी धरणातून विसर्ग कमी करण्यात आला असून सध्या
३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 اکتوبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 March 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभ...