Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
· राज्य विधिमंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन-विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
· महामार्गावर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त
· सर्व पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक मिळावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग
कार्यरत
· बीड जिल्ह्यात किल्ले धारूर तालुक्यात अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्याविरोधात गुन्हा
दाखल
आणि
· आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचं न्यूझीलंडसमोर २५० धावांचं आव्हान
****
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
उद्यापासून सुरु होत आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला
सुरुवात होईल. राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही
सभागृहात मांडण्यात येईल. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारने सह्याद्री अतिथीगृहावर
चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आज संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.
****
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद असावा, मात्र
फक्त चहापानाला जाऊन संवाद होत नसतो, असं सांगत विरोधकांनी सरकारच्या
चहापानावर बहिष्कार टाकला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या
वार्ताहर परिषदेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही भूमिका जाहीर
केली.
फक्त चहापानाला जाणं, म्हणजे
संवाद होणं अशातला काही भाग नाही. खरंतर संसदीय लोकशाहीचं पालन जशी सत्ताधारी पक्षानं
करणं जबाबादारी आहे, तशीच विरोधी पक्षाची पण आहे. आणि या राज्याचं हीत व्हावं ही अपेक्षा
जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे. विरोधी पक्षाला सातत्यानं
सापत्नतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो. मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य प्रश्न
असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहीत धरलं जात नाही म्हणून आज
आम्ही या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा
झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, तसंच पुण्यातल्या लैगिंक अत्याचार
प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य असंवेदशील असून त्यांना मंत्रिमंडळात
राहण्याचा अधिकार नाही,
असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्यातील महिला अत्याचारांच्या
घटना पाहता,
कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे
अपयशी ठरले आहेत. त्यांनी तत्काळ गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रदेश
काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे
यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढल्याचा प्रकार आज घडला, त्या
पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी ही मागणी केली आहे.
****
महामार्गावर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत वरळी इथं
परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नियोजित ‘परिवहन भवन’ इमारतीचं
भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. महामार्गांवर स्वयंचलित वाहतुक नियंत्रण यंत्रणा कार्यरत
असून, अपघात कमी होण्यात या यंत्रणेचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं, ते
म्हणाले –
ॲक्सिडेंट कमी करण्याकरता
ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत, त्याही अत्यंत चांगल्या आहेत. विशेषतः मुंबई पुणे
एक्सप्रेस वे वर एकोणातीस टक्के आणि समृद्धीवर जवळपास पस्तीस टक्के ॲक्सिडेंट कमी झालेले
आहेत, ती खरोखर अतिशय समाधानाची बाब आहे. कारण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे, की
आपण काहीही नियम मोडला, तर इमिजीयेट कॅमेरा कॅप्चर करतोय. आणि कॅप्चर करून जो काही
आपला दंड आहे, तो आपल्या घरीच पाठवतोय. दंड होत असल्यामुळे एक दोन वेळा दंड भरल्यामुळे
लोकांच्या लक्षात येतं की आता या रस्त्यावर ऑटोमेटेड सिस्टीम असल्यामुळे आपण कुठलंही
उल्लंघन करू नये.
या कार्यक्रमाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी वाहन चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर
आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळातर्फे, ६५
वर्षांवरील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी परवाना धारकांना ‘निवृत्ती
सन्मान’ योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान निधीचं वितरण करण्यात आलं.
दरम्यान, रायगड इथं उच्च न्यायालयाच्या
नूतन इमारतीचा कोनशीला समारंभही आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला, सर्वोच्च
न्यायलयातले न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित
होते. उच्च न्यायालयाकडून राज्य शासनाकडे येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांना
वेगाने मान्यता देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
सर्व पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक
मिळावा यासाठी निवडणूक आयोग काम करत केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. दोन
वेगळ्या राज्यांमधल्या दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक दिला गेल्याचं वृत्त काही माध्यमांमधून
पसरलं असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ही माहिती दिली. मात्र, दोन
मतदारांना एकच एपिक क्रमांक असला तरी या मतदारांचं नाव वेगळ्या राज्यात, वेगळ्या
विधानसभा मतदारसंघात,
आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रावर नोंदलेलं आहे. यापूर्वी मतदार
नोंदणीची प्रक्रिया विकेंद्रीत असल्याने असे क्रमांक दिले गेल्याचं, आयोगाच्या
प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. मात्र हे एपिक नंबर आयोगानेच एकाच वेळी दोन मतदारांना
दिलेले असल्यास,
बनावट मतदार तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा खुलासाही
आयोगाने केला आहे.
****
देशभरातल्या वेगवेगळ्या १२ प्रकरणातल्या
२९ अंमली पदार्थ तस्करांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे, केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अंमली पदार्थांच्या
सेवनामुळे देशातल्या युवकांचे आयुष्य खराब होत असल्यानं अंमली पदार्थांच्या तस्करांना
कडक शासन करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर तालुक्यात
एका शेतकऱ्याने तीन गुंठे जमिनीवर अफूची शेती पिकवल्याचं निदर्शनास आलं आहे. पिंपरवाडा, चोंडी
तसंच जहागीर मोहा या तीन गावाच्या केंद्रस्थानी असलेल्या पिंपरवाडा शिवारातल्या या
शेतावर पोलिस पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत
भारताने न्यूझीलंडला २५० धावांचं आव्हान दिलं आहे. दुबईत होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण
स्वीकारत,
भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र भारताचे सलामीचे फलंदाज
समाधानकारक खेळ न करता झटपट बाद झाले. कर्णधार रोहित शर्मा १५, विराट
कोहली ११ तर शुभमन गिल अवघ्या दोन धावांवर तंबूत परतले. श्रेयस अय्यरच्या ७९, हार्दिक
पंड्याच्या ४५ आणि अक्षर पटेलच्या ४२ धावांनी भारताच्या धावसंख्येला आकार दिला. भारतीय
संघ निर्धारित षटकांत नऊ बाद २४९ धावा करू शकला. स्पर्धेच्या अ गटातील हे दोन्ही संघ
उपांत्य फेरीतही दाखल झाले आहेत.
****
वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं एका कुक्कुटपालन
केंद्रात बर्ड फ्ल्यूची या पक्षांना होणाऱ्या विषाणुजन्य संसर्गाची बाधा झाल्याचं आढळलं
आहे. इथल्या मृत कोंबड्यांच्या तपासणीतून आजाराची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश
दिले आहेत. त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा परिषदेनेनं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बर्ड
फ्ल्यू विषयी जनजागरण करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये
दवंडी देऊन माहिती नागरिकांना दिली असून सतर्कता बाळगण्याचे उपायही याद्वारे सांगितले
जात आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातर्फे सॉफ्टवेअरचा वापर करून प्रगत सांख्यिकीय
डेटा विश्लेषण कार्यशाळेचं तीन मार्च ते आठ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. पीएम
उषा अंतर्गत होणाऱ्या या कार्यशाळेत डेटा-केंद्रित जगात डेटा विश्लेषण कौशल्यांच्या
वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी हे सहा दिवसीय प्रशिक्षण देण्यात येत आहे. उद्योगातील
गरजा पूर्ण करणे,
निर्णयक्षमता सुधारणे आणि व्यावसायिक प्रगतीसाठी स्पर्धात्मकता
करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते या कार्यशाळेचं
उद्या सकाळी उद्घाटन होणार आहे. या कार्यशाळेत आत्तापर्यंत दिडशेहून अधिक संशोधकांनी
नोंदणी केली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या
पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी
आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हा
आदेश जारी केला. येमाई,
मंगरुळ, आरळी, केमवाडी या चार प्रकल्पांमध्ये
जलसाठा जोता पातळीच्या खाली गेल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. जलसाठा
नियंत्रित वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी
प्रकल्पांवरील पाणीसंवर्धनावर लक्ष ठेवावं, असेही निर्देश देण्यात आल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी इथं ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीनं
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं. यात सुमारे १३० विज्ञान
प्रकल्प तसंच पोस्टरचं सादरीकरण करण्यात आलं
****
लातुर इथं सिध्देश्वर आणि रत्नेश्वर देवालय
परिसरात ७ मार्च रोजी पशुपक्षी प्रदर्शनाचं तर, ८ मार्च रोजी अश्व आणि श्वान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात
आलं आहे. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत नोंदणी
करावी, त्यानंतर निवड प्रक्रिया होणार असल्याचं. लातूर पंचायत समितीमार्फत कळवण्यात आलं
आहे. पशु प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांचं स्वास्थ दाखला प्रमाणपत्र
तसंच संबंधित पशुधनांच्या कानात १२ अंकी पशु आधार क्रमांक असणं बंधनकारक राहणार आहे.
****
No comments:
Post a Comment