Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 05 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधल्या संभाव्य
दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, कृषी सौर
पंपाचा विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा
·
बालविवाहमुक्त भारत या शंभर दिवसांच्या जागरुकता राष्ट्रीय
अभियानाला प्रारंभ
आणि
·
अहिल्यानगर-बीड डेमू रेल्वेचं सुधारित वेळापत्रक आठ डिसेंबरपासून
लागू होणार
****
महानगरपालिका
निवडणुकांच्या मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे निर्देश
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून सर्व महानगरपालिका आयुक्तांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी
ते बोलत होते. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दुबार मतदारांबाबत दक्षता घ्यावी,
प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती तसंच सूचनांची पडताळणी करून
वेळेवर निपटारा करावा, प्रभागनिहाय मतदार यादीत काही त्रुटी असल्यास,
त्या दूर कराव्यात, आदी सूचनाही निवडणूक आयुक्तांनी
केल्या आहेत.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महावितरणने
एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवला, या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शेंद्रा
औद्योगिक परिसरातल्या ऑरिक सिटी मैदानावर, आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा होणार आहे.
****
केंद्रीय
उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेत परवा संमत झालेलं
हे विधेयक काल राज्यसभेनंही मंजूर केलं. यामुळे तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थांवर
जीएसटी अधिभार रद्द झाल्यावर अतिरीक्त उत्पादन शुल्क आकारता येणार आहे. हा अतिरीक्त
महसूल वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांनाही दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत या विधेयकावरच्या चर्चेच्या उत्तरात दिलं. शेतकऱ्यांनी
तंबाखू ऐवजी इतर पिकांची लागवड करावी यासाठी सरकारनं विविध योजना आणल्या आहेत. यामुळे
महाराष्ट्रासह विविध राज्यातल्या शेतकऱ्यांनी एक लाख हेक्टरहून अधिक जागेवर इतर पीकं
घेण्यास सुरुवात केल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
**
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरुळच्या लेण्यांमध्ये पर्यटकांना स्थानिक गाईडकडून चुकीची
माहिती दिल्याचा मुद्दा, खासदार डॉ भागवत कराड यांनी काल राज्यसभेत उपस्थित केला. अशा गाईडसाठी
व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची तसंच पर्यटन स्थळी असे प्रशिक्षित गाईड
नेमण्याच्या आवश्यकतेकडे डॉ कराड यांनी सदनाचं लक्ष वेधलं.
**
देशभरातल्या
विमानतळांची संख्या गेल्या ११ वर्षांत ७४ वरून १६४ झाली आहे. नागरी उड्डयन राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
देशातल्या
इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगाची उलाढाल पुढच्या पाच वर्षांत २० लाख कोटी रुपयांपर्यंत
पोहोचेल, असं केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं
आहे. ते काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. सध्या देशात ५७ लाख इलेक्ट्रीक
वाहनांची नोंदणी झाल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.
जल जीवन
अभियानांतर्गत १५ कोटींहून अधिक घरांना नळाच्या पाण्याची जोडणी देण्यात आल्याचं जलशक्ती
मंत्री सी. आर. पाटील यांनी लोकसभेत सांगितलं.
****
बालविवाहमुक्त
भारतासाठी शंभर दिवसांच्या सखोल जागरुकता राष्ट्रीय अभियानाला कालपासून प्रारंभ झाला.
केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री अन्नपूर्णादेवी यांनी नवी दिल्लीत या अभियानाच्या
पहिल्या वर्धापनदिनी, या मोहिमेचं उद्घाटन केलं. बालविवाह प्रथेचं समूळ उच्चाटन करण्यासाठीच्या
कटिबद्धतेची शपथही यावेळी उपस्थितांना देण्यात आली. पुढच्या पाच वर्षांत देश बालविवाहमुक्त
करण्याचं उद्दीष्ट सरकारने निर्धारित केल्याचं अन्नपूर्णा देवी यांनी सांगितलं. वर्षभर
चालणाऱ्या या अभियानांतर्गत देशभरातल्या शैक्षणिक संस्था तसंच पंचायतींमध्ये प्रबोधनपर
विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
****
नौदल दिन
काल साजरा करण्यात आला. यानिमित्त समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी, राष्ट्राच्या सुरक्षेसह जागतिक पातळीवरही भारतीय नौदल महत्त्वाची
भूमिका बजावत असल्याचं नमूद केलं.
मुंबईत
नेव्हल डॉकयार्ड इथं पश्चिम विभागाच्या कार्मिक विभागाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल राहुल
गोखले यांनी गौरव स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
मिझोरामचे
माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ७३ वर्षांचे
होते. त्यांच्या कन्या खासदार बांसुरी स्वराज यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली.
१९८६ साली मिझोराममधला सुमारे दोन दशकांचा संघर्ष संपवून शांतता प्रस्थापित करण्यात
महत्त्वाची भूमिका बजावलेले कौशल यांनी, प्रथम मिझोरामचे महाधिवक्ता
म्हणून आणि १९९० ते १९९५ दरम्यान राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. राज्यपाल पदाची
जबाबदारी सांभाळणारे ते देशातले सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरले. १९९८ ते २००४ दरम्यान
ते राज्यसभेचे खासदार म्हणूनही कार्यरत होते. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज
यांचे ते पती होत.
****
भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसाठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादरच्या
चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिका
सज्ज झाली आहे. सर्व आवश्यक सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी सुमारे आठ हजारांहून अधिक
अधिकारी-कर्मचारी तैनात असून, चैत्यभूमीतल्या आदरांजलीचं मोठ्या पडद्यांवर,
तसंच विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.
****
महसूल विभागाच्या
भूलेख डॉट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाटवरुन डिजिटल सातबारा काढता येणार
आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश
दिले आहेत. डिजिटल स्वाक्षरीने मिळणारा गावनमुना सातबारा, आठ–अ आणि
फेरफार उतारे हे सर्व शासकीय, निमशासकीय तसंच बँकिंग,
कर्जप्रक्रिया, न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे
वैध असतील. यासाठी १५ रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.
****
गोपीनाथ
मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा
होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. पूर्वी ऑफलाइन स्वीकारल्या
जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
चौसष्टाव्या
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे विविध विभागांमधले निकाल जाहीर झाले.
मराठवाड्यात नांदेड केंद्रातून ‘संपूर्ण’ या नाटकाने, तर लातूर
केंद्रातून ‘दास्ताँ’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावलं आहे.
****
मराठवाडा
असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो
२०२६’ चं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या आठ
ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान ऑरिक सिटीमध्ये हे प्रदर्शन भरवलं जाणार आहे. या चार दिवसीय
प्रदर्शनात हजारो उद्योजक, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.
****
सत्ताविसाव्या
राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ला नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठात कालपासून सुरुवात झाली. राज्यभरातल्या २४ विद्यापीठांच्या संघांनी या महोत्सवात
भाग घेतला आहे. कबड्डी क्रीडा प्रकारात काल चुरशीचे अनेक सामने खेळवण्यात आले. खो-खो, बास्केटबॉल,
व्हॉलीबॉल, टेबल टेनिस तसंच बॅडमिंटनचे रोमांचक
सामनेही काल पहायला मिळाले.
****
दत्तजयंती
सोहळा काल साजरा झाला. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूरगडावरच्या दत्तमंदिरात यानिमित्तानं
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. इतरही सर्वच ठिकाणच्या दत्तमंदिरात भाविकांनी
दर्शनासाठी मोठी गर्दी होती.
****
अहिल्यानगर-बीड
डेमू रेल्वेचं सुधारित वेळापत्रक येत्या आठ डिसेंबरपासून लागू होणार आहे. त्यानुसार
ही गाडी अहिल्यानगरहून सकाळी पावणे आठ वाजता निघेल, तर बीडहून दुपारी
एक वाजता निघेल. दरम्यान, बीड-परळी रेल्वेमार्गावर, बीड ते वडवणी दरम्यान उद्या सहा तारखेला इंजिन चाचणी होणार आहे. यावेळी नागरिकांनी
सावध राहण्याचं आवाहन रेल्वे विभागाने केलं आहे. या चाचणीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून
१० आणि ११ डिसेंबरला सखोल तपासणी आणि हाय-स्पीड चाचण्या घेण्यात येणार आहेत.
****
लातूर महानगरपालिकेनं
मालमत्ताकर वसुली साठी आता थेट धडक जप्ती मोहिमेला सुरवात केली आहे. त्याकरता आठ पथकं
नेमण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मालमत्ताधारकांनी मुदतीत कर भरणा न केल्यास लिलाव
प्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यामूळे थकबाकीदारांनी कर भरणा करण्याचं
आवाहन महानगरपालिका आयुक्त मानसी यांनी केलं आहे.
****
राज्यात
काल सर्वात कमी १० पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल
मालेगाव इथ अकरा पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिव इथं १२
पूर्णांक दोन, छत्रपती संभाजीनगर इथं १३ पूर्णांक दोन, बीड इथं १३ पूर्णांक नऊ तर परभणी इथं १४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment