Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 December 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
समृद्ध भारताची भावना वंदे
मातरम् मुळे फलद्रुप होईल-लोकसभेतल्या चर्चेत पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त
·
हवाई प्रवासाच्या
सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
·
राज्य विधीमंडळ अधिवेशनात
७५ हजार २८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
आणि
·
पुण्याच्या सावित्रीबाई
फुले विद्यापीठाला आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं
सर्वसाधारण विजेतेपद
****
समृद्ध भारताची भावना वंदे मातरम् मुळे फलद्रुप होईल, असा
विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्तवला आहे. वंदे मातरम् गीताच्या शतकोत्तर
सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज लोकसभेत यासंदर्भातल्या चर्चेला प्रारंभ करतांना
पंतप्रधानांनी देशासमोरच्या अनेक आव्हानांवर मात करण्याचं सामर्थ्य वंदे मातरमने
दिल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
ज्या वंदे मातरम् मंत्राने स्वातंत्र लढ्यासाठी प्रेरणा
दिली, तोच मंत्र समृद्धतेचीही प्रेरणा देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी
व्यक्त केला. वंदे मातरम् ही फक्त स्मरण करण्याची बाब नव्हे तर संस्कृतीच्या अखंड
प्रवाहाचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. आपल्यावर वंदे मातरम् चं
ऋण असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं, ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अनुरागसिंह ठाकूर, काँग्रेसचे
गौरव गोगोई,
समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, यांच्यासह
भास्कर भगरे,
अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, आदी
सदस्यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी
वंदे मातरम् गीतावर चर्चेच्या आवश्यकतेवर प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या -
बाईट – खासदार
प्रियंका गांधी
****
आरोग्य सुरक्षा ते राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयकावर आज
राज्यसभेत चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांनी हे विधेयक सदनासमोर ठेवलं. खासदार फौजिया खान, मिलिंद
देवरा, यांच्यासह अनेक खासदारांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेत आपली मतं
मांडली.
****
हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार
नसल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका उत्तरात बोलत होते. इंडिगो विमानाची उड्डाणं
रद्द होण्याच्या कारणांचा सरकार तपास करत असून, याबाबत सरकारच्या
मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यास, कठोर कारवाईचा इशारा नायडू
यांनी दिला. सरकारची ही भूमिका म्हणजे सगळ्या विमान सेवा कंपन्यांसाठी एक उदाहरण
ठरेल, असंही नायडू यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, या प्रकरणी राममोहन नायडू आणि
डीजीसीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत
होते. इंडिगोच्या मालकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला देणगी दिल्यामुळे, नियमांना
बगल देण्याची मुभा त्यांना दिल्याचा आरोपही, चव्हाण यांनी केला.
****
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज ७५ हजार २८६ कोटी
रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये अतिवृष्टीग्रस्त
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी १५ हजार ६४८ कोटी, लाडकी बहीण
योजनेसाठी ६ हजार कोटींहून अधिक तर मनरेगासाठीच्या साडे ३ हजार कोटी रुपयांचा
समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्यासाठी ३ हजार कोटी, एसटी
महामंडळासाठी २ हजार कोटी,
आयुष्मान भारतासाठी सव्वा ३ हजार कोटी, तर
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ हजार २०० कोटी रुपयांच्या मागणीचा यात समावेश आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी या
अधिवेशनाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. कामकाज घाईघाईनं उरकलं
जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर बोलतांना, कामकाज
सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वसंमतीनं हा निर्णय झाल्यामुळे त्यावर चर्चा होणार
नसल्याचं सांगितलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आचारसंहितेमुळे
हे अधिवेशन अल्पकालीन असल्याचं स्पष्ट करून हा कालावधी पुढील अधिवेशनात भरून काढू, अशी
ग्वाही दिली.
यानंतर विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण
करून सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
विधानपरिषदेतही विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात
आले. त्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी तहकूब
करण्यात आलं. दोन्ही सदनांच्या तालिका अध्यक्षांची नियुक्तीही आज जाहीर करण्यात
आली.
दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास
आघाडीची आज बैठक झाली,
या बैठकीत अधिवेशनाच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली.
****
नक्षली संघटनेच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य रामाधर माज्जी
याच्यासह बारा नक्षलवाद्यांनी छत्तीसगड पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं. नक्षल
चळवळीचं निर्मुलन करण्याच्या प्रयत्नांचं हे मोठं यश मानलं जात आहे. रामाधर माज्जी
याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं.
****
भटक्या कुत्र्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या
निर्णयासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी कालबद्ध
कार्यक्रम राबवण्याची सूचना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी
केली आहे. ते आज यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. भटक्या कुत्र्यांचे आश्रय, निवारे
तसंच त्यांना खाद्य देण्याचं ठिकाणही जाहीर करण्याची सूचना स्वामी यांनी केली.
त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. हेल्पलाईन क्रमांक विकसित करुन तो
नागरिकांसाठी जाहीर करावा,
असे निर्देश स्वामी यांनी दिले.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात
झालेल्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठानं पटकावलं आहे. आज या महोत्सवाचा समारोप झाला. मुंबई विद्यापीठाने
उपविजेतेपद पटकावलं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला तिसरा क्रमांक
मिळाला. ॲथलेटिक्स प्रकारात मुलांच्या गटात सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर विद्यापीठाने तर मुलींच्या गटात पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने
प्रथम क्रमांक मिळवला आहे.
****
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यभरात
अनेक ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं. नागपूर इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या उपस्थितीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचे
नाव देण्यात आलं. परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी जगनाडे
महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शिवनी शिवारात नारायण
गजानन आडे या शेतकऱ्याच्या तुरीच्या शेतात लागवड केलेला साडे सोळा किलो गांजा आज
नांदेड पोलीसांनी जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
कापूस आणि सोयाबीनच्या दर वाढीसंदर्भात बीड तालुक्यातल्या
पाली इथे शिवसंग्राम किसान आघाडीचे जिल्हाप्रमुख राजेंद्र आमटे तसंच आम आदमी
पार्टीचे जिल्हाप्रमुख अशोक येडे यांनी आज बैठक घेतली. कापसाला दहा हजार रुपये तर
सोयाबीनला सात हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्याची मागणी या बैठकीत करण्यात
आली.
****
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या कृषीदर्शन आणि आमची माती
आमची माणसं या कार्यक्रम सल्लागार समितीची त्रैमासिक बैठक हिंगोली जिल्ह्यातल्या
तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आज घेण्यात झाली. अनेक विषयांवर चर्चा
झालेल्या या बैठकीला शेतकरी तसंच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच टी ट्वेंटी क्रिकेट
सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. मालिकेतला पहिला सामना उद्या
कटक इथं होणार आहे.
****
राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमान
यवतमाळ इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल गोंदिया तसंच मालेगाव इथं नऊ, जळगाव
इथं नऊ पूर्णांक चार,
तर अहिल्यानगर इथं नऊ पूर्णांक पाच अंश तापमानाची नोंद
झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं १० अंश, बीड इथं साडे दहा
अंश तर परभणी इथं १० पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment