Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 December
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
राष्ट्रउभारणीत संसद खेल महोत्सवाची भूमिका महत्त्वाची - पंतप्रधानांचं
प्रतिपादन
·
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन
·
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
·
नाताळचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा-कॅरोल गायनांसह विविध कार्यक्रम साजरे
आणि
·
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला प्रारंभ
****
देशाच्या उभारणीत संसद खेल महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत
असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसद खेल महोत्सवाचं
दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. खेळामुळे जय-पराजयाच्या
पलीकडे जात तरुणांमधे खिलाडूवृत्ती रुजत असल्यामुळे सक्षम आणि शिस्तबद्ध तरूण घडत
आहेत, हेच तरूण पुढे राष्ट्र उभारणीत योगदान देणार असल्याचं
पंतप्रधानांनी सांगितलं ते म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
२०३० मधे भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं
जाणार असून २०३६ ला ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचं
पंतप्रधानांनी सांगितलं. दरम्यान, देशभरातल्या खासदार
क्रीडामहोत्सवांचा समारोप आज झाला.
****
वीर बाल दिनानिमित्त उद्या नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार
आहेत. यावर्षी १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विविध क्षेत्रात उत्कृष्ट
कामगिरी केलेल्या २० मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
****
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला आज २५ वर्षे पूर्ण होत
आहेत. २५ डिसेंबर २००० रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत पूर्वी संपर्क
नसलेल्या ग्रामीण वस्त्यांशी कशाही परिस्थितीत संपर्क सुनिश्चित करणं हे ध्येय
आहे.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या
जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी नवी दिल्लीतल्या सदैव अटल या अटलजींच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली
वाहिली. अटलजींनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्रनिर्माण आणि सुशासनासाठी समर्पित केलं, त्यांचं व्यक्तिमत्व, कार्य आणि नेतृत्व
राष्ट्रविकासाच्या कार्यात सदैव मार्गदर्शक राहील, असं पंतप्रधानांनी
समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम
बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, यांच्यासह अनेक मान्यवरांनीही
सदैव अटल इथं आदरांजली अर्पण केली. विविध संसद सदस्यांनी संविधान सदनात वाजपेयी
यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत अटल बिहारी
वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रनायक यांचा जीवन प्रवास’ या
चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन केलं. मुंबईत राज्यपालांचं निवासस्थान महाराष्ट्र लोकभवन
इथंही वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आलं. आरोग्य
विज्ञान विद्यापीठातही वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, परभणीसह मराठवाड्यात
सर्वत्र वाजपेयींना आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
राज्यातल्या २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यातली सत्ताधारी
महायुती, आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षांमधे
स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी एआयएमआयएमने आठ
उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नाशिक महानगरपालिकेसाठी ३ तर जालन्यासाठी
एक उमेदवार पक्षाने दिला आहे. धुळे, नाशिक, जालना आणि नांदेडसह
विविध ठिकाणांहून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत.
नाशिकमधे दोन माजी महापौरांसह विविध पक्षांच्या ज्येष्ठ
नेत्यांनी आज भाजपामधे प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक
पांडे, आणि यतिन वाघ, मनसेचे दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार पक्षाचे नितीन भोसले आणि काँग्रेसचे शाहू खैरे यांचा त्यात समावेश आहे. भाजपा
नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा कार्यालयात या सर्वांचं स्वागत
केलं.
महापालिका निवडणुकांचे उमेदवार निश्चित करण्यासाठी
काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक आज मुंबईत झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन
सपकाळ, विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री
सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध नेते या बैठकीला उपस्थित
होते.
****
नाताळचा सण आज सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे.
देशभरातल्या चर्चेस आणि प्रार्थनागृहांमधे काल रात्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या
जन्मोत्सवानिमित्त विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं. चर्चेसवर रोषणाई
करण्यात आली आहे. नाताळनिमित्त भेटवस्तू घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजच्या प्रतिकृती
लक्ष वेधून घेत आहेत. दुकानं, मॉल्स, उपाहारगृहं आणि
पर्यटनस्थळांवर गर्दी झाली आहे. नाताळनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आयोजित
करण्यात आले असून चर्चमध्ये येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले तसंच कॅरोल
गायनासह विविध कार्यक्रम साजरे झाले. छत्रपती संभाजीनगर, जालना आदी ठिकाणी
नाताळनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
****
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवासी
वाहतुकीसाठी खुला झाला. सध्या देशांतर्गत असलेली ही सेवा, मार्च महिन्यापर्यंत
आंतरराष्ट्रीय विमानसेवेपर्यंत विस्तारली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या
प्रतिनिधीकडून…
आज सकाळी आठ वाजता बेंगळुरूहून आलेलं पहिलं
विमान धावपट्टीवर उतरलं. या विमानाला हवेत पाण्याचे फवारे सोडून सलामी देण्यात
आली. तर सकाळी पावणे नऊ वाजता या विमानतळावरून हैदराबादच्या दिशेने पहिलं विमान
आकाशात झेपावलं. सध्या या विमानतळावरून देशभरातल्या नऊ विमानतळांवर विमान प्रवास
सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी आठ ते रात्री आठ अशी बारा तासापुरती
विमानसेवा सुरू राहील. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून टप्प्याटप्पाने हे
विमानतळ कार्यान्वित करण्यात येईल. हे विमानतळ पाच टप्प्यांमध्ये बांधण्यात येणार
आहे. त्यातला पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यासाठी १९ हजार ६५० कोटी रुपये खर्च
करण्यात आले आहेत. पाचही टप्पे पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरून दर वर्षी ९ कोटी
प्रवासी प्रवास करू शकतील.
****
कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक
यांच्या पार्थिव देहावर आज नवागाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले. राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सरकारच्या
वतीनं पुष्पचक्र अर्पण करुन सुरुपसिंग नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय
आणि सामाजिक
क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून नाईक यांना आदरांजली अर्पण
केली.
****
नांदेड जिल्ह्यात आज एकाच कुटुंबातल्या चौघांनी आत्महत्या
केल्याचं निदर्शनास आलं. मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार इथं ही घटना घडली.
कुटुंबातले पती पत्नी राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले तर त्यांच्या दोन
तरुण मुलांनी मुगट शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं आढळलं. बारड आणि मुदखेड
पोलीस या संदर्भात चौकशी करत आहेत.
****
कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांना योग्य
भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सकाळी शेतकरी
हक्क मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांनी हातात कापसाची आणि तुरीची झाडं घेऊन
शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत लक्ष वेधून घेतलं.
****
लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ५ हजार
रुपयांवर पोहचला आहे. हा या वर्षातील सर्वाधिक दर असून नव्या वर्षात यात आणखी वाढ
होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. मात्र शासनाच्या हमीभावापेक्षा
प्रतिक्विंटल चारशे ते पाचशे रूपये कमी दर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा करण्यासाठी राज्यभर
विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. राज्यस्तरीय बँकर्स समिती यांच्या वतीनं
जिल्हा अग्रणी बँकेमार्फत बीड इथं येत्या २९ डिसेंबरला हे शिबीर घेण्यात येत आहे.
****
दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती भारतीय शटलर पी.व्ही. सिंधूची
२०२६-२९ या कालावधीसाठी बॅडमिंटन जागतिक महासंघ अॅथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी
निवड करण्यात आली आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान तिसरा
टी-ट्वेंटी सामना उद्या तिरूवनंतपुरम इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात
वाजेपासून सामन्याला सुरूवात होईल. पहिले दोन सामने जिंकून पाच सामन्यांच्या
मालिकेत भारतीय महिला संघ दोन – शून्यने आघाडीवर आहे.
****
राज्यात आज अहिल्यानगर इथं सर्वात कमी साडे
आठ सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल
नाशिक तसंच पुण्यात साडे नऊ, तर जळगाव
इथं दहा अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं साडे दहा, तर परभणी इथं ११ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment